Sharad Ponkshe Reacts in Abu Azmi Statement: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं म्हटलं आहे. त्यांच्या विधानावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आता मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीही अबू आझमींच्या या वक्तव्यासंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अबू आझमी काय म्हणाले होते?
“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती राज्य कारभाराची होती आणि हिंदू व मुस्लिम अशी नव्हती”, असं अबू आझमी म्हणाले.
औरंगजेबाच्या काळात जीडीपी २४ टक्के होता, असं विधानही त्यांनी केलं. “मी असं मानतो की औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती. त्या काळात आपला जीडीपी २४ टक्के एवढा होता. तेव्हा भारताला सोने की चिड़िया म्हटलं जायचं. मग मी याला चुकीचं म्हणू का? तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई ही धर्माची होती असं मी मानत नाही”, असं अबू आझमी म्हणाले.
शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया
शरद पोंक्षे यांनी एक उपहासात्मक व्हिडीओ शेअर करत अबू आझमींच्या विधानाचा समाचार घेतला. “अबू आझमी नावाचे एक थोर राजकीय नेते आहेत, ते म्हणाले की औरंगजेब हा क्रूर नव्हता. त्याने धर्माची लढाई कधीच केली नाही आणि त्याने खूप मंदिरं बांधली, असं खूप काही ते म्हणाले. खरोखरंच आहे ओ. इतक्या वर्षांनंतर आम्हाला या अबू आझमी नावाच्या गृहस्थाने खरा इतिहास सांगितला, आम्ही खूप आभारी आहोत त्यांचे. खरोखरंच औरंगजेब खूप चांगला माणूस होता. त्याच्या चांगुलपणाची वर्णनं मी करायची म्हटल्यास तर कशी करता येतील बघा… एक एक मंदिर त्याने उद्ध्वस्त केलं छानपैकी, अशी हजारो मंदिरं त्याने तोडफोड करून टाकली, आणि हिंदूंच्या मूर्तींचं त्याने असं वाट लावून टाकली. हो औरंगजेब खूप चांगला माणूस होता. हजारो बायका त्याने पळवल्या, हजारो बायकांवर बलात्कार केले, छत्रपती शिवाजी महाराज त्याच्याविरोधात उगीचच लढले, एवढ्या चांगल्या माणसाच्या विरोधात आमचे महाराज का बरं लढले असतील? असा मला प्रश्न पडतो. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना जसं सिनेमात दाखवलंय, आम्ही जे इतिहासात वाचलं की त्यांना औरंगजेबाने हाल हाल करून मारलं ते खरोखरंच चुकीचं होतं, अबू आझमी जे सांगतात तेच बरोबर आहे,” अशी खोचक टीका शरद पोंक्षे यांनी अबू आझमींवर केली आहे.
“संभाजीनगरमध्ये..सॉरी.. संभाजीनगर का म्हटलं मी.. औरंगाबादमध्ये औरंगजेबाचं मोठं मंदिर उभं करायला पाहिजे. सॉरी सॉरी..मंदिर नाही खूप मोठी मस्जिद उभी राहिली पाहिजे. जगातील सर्वात भव्यदिव्य औरंगाबादमध्ये बांधा. संभाजीनगर उगाच नाव ठेवलंय असं कुठे असतं का. अबू आझमी द ग्रेट. आमचेच मुख्य पदांवर आरुढ झालेले नेते म्हणतात की त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे वगैरे. बरोबरच आहे. खटला आम्हीच भरणार ना. राज्यकर्ते कसे खटला भरणार? राज्यकर्ते त्यांच्याविरोधात कारवाई कसे करणार? केतकी चितळेला त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी कसं उचलून तुरुंगात टाकलं, सोलापूरकरांच्या घरावरती खूप मोर्चे निघतात. पण आमचे एक आंबेडकर आडनाव असलेले नेते एकदा औरंगजेबाच्या थडग्यावर फुलं वाहायला जाऊन आले होते, हे सगळं योग्य आहे. यात काय चुकीचं आहे. आपण जे अफजल खान, शाहिस्ते खान, टिपू सुल्तान ही खरंतर दैवतं आहेत. राम मंदिराचं जे आंदोलन उभं राहिलं तो सगळा वेडेपणा आहे. राम मंदिर बाबरने थोडीच उद्ध्वस्त केलंय, काशी विश्वनाथ, मथुरेतील कृष्णाचं मंदिर..अशी हजारो मंदिरं त्यांनी नाही उद्ध्वस्त केली.. ती आम्हीच हिंदूंनी वेड्यासारखी उद्ध्वस्त केली आणि त्यांच्यावर नाव टाकलं,” अशी उपहासात्मक टीका शरद पोंक्षे यांनी अबू आझमींवर केली.