अभिनेत्री शुभांगी गोखले मराठी मनोरंजविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिका, चित्रपट नाटकच्या माध्यमातून शुभांगी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अनेक मालिकांमध्ये त्यांनी प्रेमळ आईची भूमिका साकारली आहे. शुभांगी गोखले यांची मुलगी सखी आणि जावई सुव्रत जोशीही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.
शुभांगी गोखले यांचे पती मोहन गोखले प्रसिद्ध अभिनेते होते. सखी लहान असतानाच मोहन गोखले यांच निधन झालं. नवऱ्याच्या निधनानंतर शुभांगी यांनी एकटीने मुलीचा सांभाळ केला. दरम्यान त्यांना अनेक संकटांना तोंडही द्याव लागलं.पण कुणाचीही मदत न घेता शुभांगी यांनी ही जबाबदारी नेटाने पार पाडली. पतीच्या निधनानंतर शुभांगी गोखलेंकडे दुसऱ्या लग्नाची संधीही होती. एकदा सखीनेही आईला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी दुसरं लग्न करण्यासाठी साफ नकार दिला होता. नुकत्याच एका मुलाखतीत शुभांगी यांनी दुसरं लग्न न करण्यामागंच कारण सांगितलं आहे.
हेही वाचा- “अमिताभ बच्चन, शाहरुख खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती पण…,” स्पृहा जोशीने व्यक्त केलं दुःख
शुभांगी म्हणाल्या, “मोहनचे गुण आणि त्याच्याबरोबर आलेल्या अनुभवांनी मला खूप प्रेम दिलं. त्याच्या वागण्याचा मला त्रास झाला पण त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. मोहन शूटिंगसाठी घरातून निघायचा पण तिथे गेल्यावर एखाद्या अभिनेत्रीबरोबर काम करायचं हे काळालं की तो सरळ जाणार नाही असं म्हणायचा किंवा घरी निघून यायचा. अशावेळी या माणसाला कसं आणि काय समजवायचं हा प्रश्न मला पडायचा. पण तो माझ्याबरोबर कधीच दुष्टपणे वागला नाही. मोहनच्या निधनानंतर मी पुन्हा लग्न का केलं नाही?असा प्रश्न मला खूप लोक विचारतात. पण मोहनच्या जाण्याने मला एवढं दुःख झालं होतं की, त्यानंतर कणभर दुःखही मला सहन झालं नसतं. तसेच मोहनने मला इतकं सुख दिलं आहे की, त्यापेक्षा कणभर कमी सुखही मला चालणार नव्हतं. मी स्वतंत्र्य आहे. सगळी कामं स्वतः करते. पैसे कमावते, अभिनय करते सगळं काही माझ्याकडे आहे. मला मोहनची सवय आहे म्हणजे मला केअर टेकर हवा असतो. पण मला तो कोणामध्ये दिसला नाही. मोहनचं निधन झालं तेव्हा मी ३५ वर्षांची होते. त्यावेळी माझं लग्नाचं वयही होतं. पण मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. माझ्यामध्ये तेवढं धाडस नव्हतं”.
शुभांगी पुढे म्हणाल्या “दुसऱं लग्न न करण्यामागचं आणखी एक कारण सखी होती. तिला आता ते नाही कळणार किंवा कळालंही असेल. माझ्या दुसऱ्या लग्नामुळे तिचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं असतं. ती पाच वर्षाची होती तेव्हा मोहन गेला. मी दुसरं लग्न केल्यानंतर त्या माणसाने सखीला कसं वागवलं असतं? सखीला मोहनचीही नीट माहितीही नव्हती. मला सखी अजूनही म्हणते, तुला जोडीदाराची गरज आहे. लग्नाचा विचार कर. पण मोहनची झलक मला कोणामध्ये दिसलीच नाही. आणि आता कशासाठी लग्न करु? चल आता एकत्र गोव्याला जाऊ वगैरे असं मला काही करायचं नाही. माझं सगळं जग फिरुन झालं आहे. आता लग्न करण्याचं हे वय आहे असंही मला वाटत नाही”.
शुभांगी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या त्या ‘तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजस्विनी प्रधानच्या आईची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या ‘काहे दिया परदेस’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकांमधील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या
‘मिस्टर योगी’ मालिकेपासून मोहन गोखले घराघरांत पोहोचले. यानंतर त्यांच्या ‘हिरो हिरालाल’,’ मोहन जोशी हाजीर हो’ यांसारख्या अनेक सिनेमांत भूमिका चांगल्याच गाजल्या. २९ एप्रिल १९९९ रोजी वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. यावेळी ते चेन्नईत ‘हे राम’च्या चित्रीकरणासाठी गेले होते.