आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षावर ‘पाणी’ चित्रपट आधारित आहे. आता या विषयावर का चित्रपट करावा वाटला आणि तो हनुमान केंद्रे यांच्यापर्यंत कसा पोहोचला, याचा किस्सा आदिनाथ कोठारेने एका मुलाखतीत सांगितला आहे.

काय म्हणाला आदिनाथ कोठारे?

आदिनाथ कोठारेने ‘पाणी’ चित्रपटाच्या निमित्ताने नुकतीच लोकशाही मराठी फ्रेंडली या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत हुनमान केंद्रे यांच्यापर्यंत पोहोचण्याची प्रोसेस कशी होती? या प्रश्नाचे उत्तर देताने आदिनाथने म्हटले, “२०१५ मध्ये सिनेमाचे दिग्दर्शन करायचे ठरवले. त्यासाठी मी विषय शोधत होतो. स्वत:ला विचारत होतो की अशी कोणती गोष्ट आहे, जी मला मनापासून सांगायची आहे? अशी कोणती गोष्ट आहे, जी मला अस्वस्थ करते आणि मला अंत:करणापासून, हृदयापासून सांगायची आहे? पाण्याचा विषय हा आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे, महत्वाचा आहे. पाण्याच्या टंचाईची झळ आपल्यापर्यंत अजून पोहोचली नाहीये.”

“मी रिसर्च करत होतो, त्यावेळी मी काही डॉक्युमेंटरी बघितल्या. आमिर खानने सत्यमेव जयतेची सीरीज केली होती. त्यामध्ये पाण्यावरचा एक एपिसोड त्यांनी केला होता. त्यामध्ये हनुमान केंद्रे या माणसाची मला मुलाखत सापडली आणि मला असं वाटलं की हे खूप इंटरेस्टिंग आहे. कदाचित यावर चित्रपट होऊ शकतो, असं मला त्या क्षणी वाटलं.”

“मी हनुमान केंद्रे यांचा नंबर शोधत होतो. सत्यमेव जयतेचे दिग्दर्शक सत्यजीत भटकर त्यांना मी फोन केला. त्यांनी मला हनुमान केंद्रेंचा मोबाईल नंबर दिला. मी त्या नंबरवर फोन केला. तर हा नंबर अस्तित्वात नाही, असं ऐकायला मिळालं. “

“मला माहित होतं हा व्यक्ती नागदरवाडीमध्ये राहतो. मी गुगल मॅपवर बघितलं की नागदरवाडीजवळ नांदेड आहे. मग मी नांदेडच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. तिथून मला लोहा तालुक्याचा नंबर मिळाला. तिथून मला माळाकोळीचा नंबर मिळाला. माळाकोळीशी संपर्क साधला, सुदैवाने तेव्हा ते गावाचे सरपंच झाले होते. तिथून मला त्यांचा नंबर मिळाला. मी त्यांना फोन केला. हनुमान केंद्रेंनी फोन उचलला आणि मी त्यांना म्हणालो, हनुमानजी नमस्कार, मी आदिनाथ कोठारे, मुंबईवरून बोलतोय. मी नट आणि निर्माता आहे. मी सत्यमेव जयतेमध्ये तुमची मुलाखत बघितली. तर मला असं वाटतंय की यावर आपण चित्रपट करू शकतो. मी तुम्हाला येऊन भेटू शकतो का? दोन मिनिट शांतता होती. त्यानंतर ते म्हणाले, तुम्ही इथे या मग माझा विश्वास बसेल. मी लगेच ट्रेनची तिकिट काढली आणि दुसऱ्याच दिवशी मी गेलो. तिथे ते मला भेटले. हनुमानजी मला न्यायला आले होते. त्यांनी मला गाव दाखवलं.” अशी आठवण आदिनाथ कोठारेने सांगितली आहे.

हेही वाचा: अमिताभ बच्चन यांनी फोन करून मागितलेले काम; दिग्दर्शक आठवण सांगत म्हणाले, “रात्रीच्या २ वाजेपर्यंत….”

दरम्यान, ‘पाणी’ चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, विकास पांडुरंग पाटील, रजित कपूर, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, किशोर कदम, श्रीपाद जोशी हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मिती धुरा प्रियांका चोप्रा, डॉ. मधू चोप्रा, नेहा बडजात्या यांनी केली आहे.