Atul Parchure Passed Away : मराठी कलाविश्वातील दमदार, हरहुन्नरी आणि सर्व रसिक प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन (१४ ऑक्टोबर) झालं आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

अतुल परचुरे हे अनेक मराठी कलाकारांचे जवळचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : Atul Parchure : अतुल परचुरेंना पुलंचा आशीर्वाद कसा लाभला होता? पेटीवर वाजवून दाखवलेल्या ‘कृष्ण मुरारी’ गाण्याचा किस्सा काय?

मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या आणि बालवयातच रंगभूमीवरील प्रवासाला सुरुवात करणाऱ्या अतुल परचुरेंच्या ( Atul Parchure ) निधनानंतर सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचं जाणं हे मराठी सिनेविश्वाचं मोठं नुकसान असल्याचं यावेळी अशोक सराफ यांनी सांगितलं.

अशोक सराफ म्हणाले, “मला अगदी काही वेळापूर्वी याबद्दल समजलं. आज मराठी चित्रपटसृष्टीचा विचार केला आणि आमचा वैयक्तिक मित्र म्हणून सांगायचं झालं तर, अतिशय वाईट गोष्ट घडली आहे. एक चांगला अभिनेता इंडस्ट्रीने गमावला आहे. आजवरचा त्याचा पूर्ण प्रवास मी पाहिलेला आहे. त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याने स्वत:चं असं नाव निर्माण केलं होतं आणि आता तो असा पटकन निघून गेला. ही गोष्ट सहन करण्यासारखी नाहीच आहे. हे घडायला नको होतं. तो फार छान नट आणि माझ्यासाठी फार छान मुलगा होता.”

हेही वाचा : Atul Parchure : “अतुल परचुरेंच्या चाहत्यांपैकी एक या नात्याने मी…”, एकनाथ शिंदेंची चतुरस्त्र अभिनेत्याला श्रद्धांजली

अतुल परचुरेंनी साकारलेली अशोक सराफ यांच्या बालपणीची भूमिका

“अतुलचं जाणं हे माझ्या मनाला सतत दु:ख देत राहील. या क्षणाला काय बोलावं हे देखील मला सुचत नाहीये. माझ्या दृष्टीने ही अत्यंत वाईट गोष्ट घडलीये…तो माझ्या खूप जवळ होता, माझा खूप चांगला मित्र होता. एका चित्रपटामध्ये त्याने माझ्या बालपणीची भूमिका साकारली होती. त्यामुळे ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. त्या चित्रपटाचं नाव ‘खिचडी’ होतं…आज माझा मित्र मी गमावलाय.” असं सांगताना अशोक सराफ भावुक झाले होते. त्यांना संवाद साधताना हुंदका दाटून आला होता. त्यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी अतुल परचुरेंच्या निधनाने मराठी सिनेविश्वाचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा : ५ सेमीचा ट्यूमर, डॉक्टरांकडून चुकीचे उपचार…; अतुल परचुरेंनी सांगितलेला ‘तो’ कठीण काळ, अखेर झुंज अपयशी

दरम्यान, अतुल परचुरे ( Atul Parchure ) यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली अशा अनेक मराठी नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय छोट्या पडद्यावरच्या ‘जागो मोहन प्यारे’, ‘भागो मोहन प्यारे’, ‘अळी मिळी गुपचिळी’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘माझा होशील ना’ या त्यांच्या मालिका प्रचंड गाजल्या.