हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर रितेश देशमुख मराठी चित्रपटांकडे वळला. काही महिन्यांपूर्वीच त्याचा प्रदर्शित झालेला ‘वेड’ चित्रपट सुपरहिट ठरला. ७० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई या चित्रपटाने केली. मराठी चित्रपटांवर त्याचं खूप प्रेम आहे हे याआधीही त्याने बऱ्याच मुलाखतींमध्ये म्हटलं. पण मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर का चालत नाहीत? याबाबत आता रितेशने उघडपणे भाष्य केलं आहे.
रितेशने ‘लय भारी’, ‘माऊली’ सारखे मराठी चित्रपट केले. त्याच्या या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाला. पण बरेच मराठी चित्रपट का चालत नाहीत? याबाबत ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. “मराठी चित्रपट न चालण्यामागे नेमकी काय अडचण आहे?” असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला.
यावेळी रितेश म्हणाला, “उत्तम कंटेंटशिवाय कोणतीही चित्रपटसृष्टी ही चालत नाही. कंटेंटचा आदर आपण केलाच पाहिजे. पण सगळ्यात मोठी गोष्टी म्हणजे बजेट असणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही चित्रपटसृष्टीमध्ये बजेट हा महत्त्वाचा भाग असतो. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो चित्रपटगृहामध्ये जाऊन आपण पाहावा असं प्रेक्षकांना वाटलं पाहिजे. दुर्देवाने आपल्या मराठीमध्ये असं घडत नाही”.
“एखादा मराठी चित्रपट जर प्रदर्शित झाला तर पुढच्या आठवड्यात जाऊन आपण पाहिला पाहिजे असं प्रेक्षक विचार करतात. पण पुढच्या आठवड्यात तो मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये नसतो. हिंदी चित्रपटांचा प्रोमो पाहिला की, प्रेक्षक म्हणतात आम्हाला हा चित्रपट बघायचा आहे. पण हेच अनुभवायची संधी आपण मराठी चित्रपटाला देत नाही. कोणीतरी एखाद्या मराठी चित्रपटाबाबत सांगितलं तरच तो चित्रपट बघायला जायचं की नाही हे प्रेक्षक ठरवतात. हिंदी चित्रपटासारखा मराठी चित्रपटाबाबत प्रेक्षक विचार करत नाहीत. हे कुठेतरी प्रेक्षकांनी बदलायला हवं. पण एखादा चित्रपट जर प्रेक्षकांना आवडला तर तो चित्रपट तुफान चालतो”.