Badlapur Sexual Assault Case : बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. बदलापूरमधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे आज सकाळपासून नागरिक शाळेची तोडफोड करताना पाहायला मिळाले. तसंच रेलरोको आंदोलनही केलं. चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केलेल्या नराधमाला फासावर लटकवा असा एकच सूर नागरिकांनी लावून धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मराठी कलाकार मंडळी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर संतप्त भावना व्यक्त करत आहेत.

गेल्या आठवड्यात बदलापूर आदर्श शाळेत दोन चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार ( Badlapur Sexual Assault Case ) झाला. पण हा प्रकार घडल्यानंतर तीन दिवसांनी चिमुकल्या मुलींनी पालकांना घडलेला प्रकार सांगितला. पण धक्कादायक बाब म्हणजे जवळपास १४ तास या चिमुकल्यांच्या पालकांची तक्रारही दाखल करण्यात आली नव्हती. त्यामुळे बदलापूर नागरिकांमध्ये आज संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. याच प्रकरणावर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ( Mrunmayee Deshpande ) व अक्षय केळकर ( Akshay Kelkar ) भडकले.

हेही वाचा – “हाल हाल करून मारा”, बदलापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “काहीतरी भीषण…”

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत म्हणाली, “माणूस म्हणून नक्की कुठे जातो आहोत आपण? #बदलापूर” तसंच अक्षय केळकरनेही इन्स्टाग्राम स्टोरीवर बदलापूर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

अक्षय केळकरने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं आहे, “बंगलामध्ये ती एक डॉक्टर होती…बदलापुरात kindergarden मध्ये जाणाऱ्या लहानग्या चिमुरड्या मुली आहेत…कळव्यातली ती, एक लहान आणि गतिमंद मुलगी आहे…किती ठिकाणी आता म्हणायचं all eyes?…आणि कसं द्यायचं तिला रक्षेचं वचन?…कुठल्या तोंडाने बंधनं बांधून घ्यायची तिच्याकडून?”

हेही वाचा – “एका मुलीची आई म्हणून…”, बदलापूर अत्याचार प्रकरणावर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप; म्हणाली, “माणुसकीचा अंत…”

दरम्यान, मृण्मयी देशपांडे, अक्षय केळकर व्यतिरिक्त अनेक मराठी कलाकारांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणावर ( Badlapur Sexual Assault Case ) संताप व्यक्त केला आहे. अभिनेता प्रसाद ओक, शिवाली परब, प्रिया बापट, अभिजीत केळकर, नेहा शितोळे, सुरभी भावे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत.