मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेनं नाटक, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयाच्या कौशल्याबरोबरच ती उत्तम नृत्यही करू शकते. भार्गवीच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाचे प्रयोग सध्या मुंबई, पुणे, नाशिक येथे सुरू आहेत. नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनेक गमतीजमती घडत असतात. अशीच एक घडलेली गंमत भार्गवीनं नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा पार पडला. ७ मार्चला झी मराठी वाहिनीवर या सोहळ्याचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याच्या वेळी दिलेल्या मुलाखतीत भार्गवीनं एक किस्सा सांगितला. भार्गवी म्हणाली, “नाटक म्हटल्यानंतर किस्से, आयत्या वेळी काहीतरी गडबड होणं हे स्वाभाविकच आहे. पण, ती गडबड प्रेक्षकांपर्यंत पोहोचू न देणं यातच कलाकाराच्या अभिनयाचा कस लागतो, असं मला वाटत. ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटक सध्या चालू आहे. हे कॉमेडी नाटक आहे. त्यामुळे आम्हा सगळ्यांना सतत भयंकर अलर्ट राहावं लागतं. त्यात पंच लाइन्स, टायमिंग हे सगळं विनोदी नाटकाचा एक भाग असतो. त्याच्यामुळे अनेक गोष्टींची व्यवधानं सांभाळत आम्हाला हे नाटक करावं लागतं.”

हेही वाचा… “अस्तिकाचा वध नेत्राच्या हातून…”; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या दिग्दर्शकांनी केला खुलासा

अभिनेत्री पुढे म्हणाली, “प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की, आपण त्या क्षणाला ‘ब्लॅंक’ होऊन जातो. आपल्याला त्यावेळी पुढे काय घडणार आहे, आपण कुठे आहोत, काय आहोत हे काहीच आठवत नाही. आपल्या डोळ्यांपुढे पूर्णपणे अंधारी येते. त्याला आम्ही कॉमेडी भाषेत ‘ब्लॅंक ऑफ इंडिया’ म्हणतो. परवाच्या प्रयोगाला असंच झालं होतं. मी स्टेजवर पूर्णपणे ‘ब्लॅंक ऑफ इंडिया’ झाले आणि तसं झाल्यानंतर कुठल्याही कलाकाराच्या डोळ्यांत ते दिसतं. समोरचा कलाकार जर तुमचा मित्र असेल, तर त्याला हे लगेच कळतं. वैभवलासुद्धा हे कळलं की, मला काहीच आठवत नाही. वैभवनं, माझ्याकडे बघून काय? असं विचारलं. तेव्हा मी खूप मनापासून ते वाक्य शोधत होते.”

“जसं मी म्हटलं की, कॉमेडी नाटक असल्यामुळे एकावर एक अशी वाक्यं असतात. माझी वाक्यं तो घेऊ शकत नव्हता आणि ती घेतल्याशिवाय नाटकात पुढे जाताच येत नव्हतं. नाटकात निमिष कुलकर्णी आहे आणि त्याला कळल नव्हतं की, मी विसरलीय. कारण- माझ्याकडे त्याची पाठ होती. तो वाट बघतोय- वाक्य का येत नाही आहे, मी विचार करतेय- वाक्य काय आहे आणि एका पॉईंटला वैभवनं माझ्याकडे असे डोळे मोठे करून वाक्य, असं म्हटलं आणि मग त्या क्षणाला मनात वीज चमकली आणि मला ते वाक्य आठवलं. फायनली मी ते वाक्य बोलली आणि म्हणून नाटक पुढे गेलं. नाही तर बराच वेळ नाटक तिथेच अडकून राहिलं असतं. पण, त्या दिवशी मी खरंच मनापासून रंगदेवतेची माफी मागितली की, माझ्या हातून काय चुकलं असेल, तर मला माफ कर. पण, पुन्हा कधी माझ्याच काय कुठल्याच कलाकाराच्या आयुष्यात असं होऊ नये. तेव्हा आपला सहकलाकार आपल्याला जे सांभाळून घेतो आणि आपण काहीच घडलं नाही, असं दाखवतो. या दोन गोष्टी अभिनयाचा कस दाखविण्यासाठी एका कलाकारासाठी खूप आहेत,” असंही भार्गवीनं नमूद केलं.

हेही वाचा… २० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी

दरम्यान, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटकाचे प्रयोग नाशिक, पुणे, चिंचवड, बोरिवली, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, वाशी, पार्ले येथे होणार आहेत. या नाटकात वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, सुकन्या काळण, निमिष कुलकर्णी व विकास चव्हाण असे तगडे कलाकार आहेत. मध्यंतरी हे कलाकार ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटकाच्या सेटवर ‘बटरफ्लाय बटरफ्लाय’ ट्रेंडवर थिरकताना दिसले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhargavi chirmule apologized to rangdevta during murderwale kulkarni natak dvr