Fandry Fame Somnath Awaghade And Rajeshwari Kharat : ‘फँड्री’ चित्रपटातली जब्या आणि शालूची जोडी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. चित्रपटात जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडेने तर, शालू हे पात्र अभिनेत्री राजेश्वरी खरातने साकारलं होतं. २०१४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, या दोघांना आजही त्याच नावांनी ओळखलं जातं. सोशल मीडियावर शालू-जब्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हे दोघंही एकत्र व्हिडीओ-फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात.
राजेश्वरी-सोमनाथ यांचं खऱ्या आयुष्यात जमलंय अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होत्या. अशातच साधारण पाच दिवसांपूर्वी राजेश्वरीने लग्नमंडपात हळद लागतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये राजेश्वरी आणि सोमनाथ दोघंही एकमेकांच्या बाजूला डोक्याला मुंडावळ्या बांधून बसल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दोन दिवसांआधी अभिनेत्रीने आणखी फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यामध्ये शालूने लग्नाचा शालू नेसून तर, जब्याने शेरवानी घालून कॅमेऱ्यासमोर पोज दिल्याचं पाहायला मिळत आहे.
आता जब्या आणि शालूने तिसरा फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीचा गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा, कपाळावर लाल टिकली असा लग्नानंतरचा लूक पाहायला मिळत आहे. या दोघांनी आतापर्यंत शेअर केलेल्या तिन्ही फोटोंना कॅप्शन दिलेलं नाही. त्यामुळे जब्या-शालूचं खरंच लग्न झालंय की नाही? याबद्दल सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा : Video : सूरजसह गावच्या शेतात रमली जान्हवी किल्लेकर! चक्क ट्रॅक्टरही चालवला; नेटकरी म्हणाले, “भावा-बहिणीचं नातं…”
कोणतंही कॅप्शन न देता हे फोटो शेअर केल्याने अनेकांनी हे फोटो त्यांच्या आगामी प्रोजेक्टचे असल्याचं कमेंट्समध्ये म्हटलं आहे. तर, काही नेटकऱ्यांनी यावर, “गोंधळात टाकू नकोस जब्या काय खरं आहे ते सांग एकदाच”, “जब्या भाई खरंच लग्न झालंय का?”, “खरंच यांचं लग्न झालं आहे का की, पिक्चरचं शूटींग आहे?”, “काही समजलंच नाही”, “खरं सांग भावा लग्न झालंय का” अशा कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, आता जब्या आणि शालू या लग्नाच्या फोटोंवर आणि सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या लग्नाच्या चर्चांबाबत केव्हा मौन सोडणार याची त्यांचे चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd