मराठीतील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं जुलै महिन्यात निधन झालं. ते १५ जुलै रोजी मृतावस्थेत आढळले होते. ते पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील राहत्या घरात मृत सापडले होते. त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांचा तीन दिवसाआधीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
रवींद्र महाजनींच्या निधनाबद्दल तीन दिवस कुणालाच कसं कळलं नाही, याबाबत गश्मीरने भाष्य केलं आहे. “आमचं नातं एकतर्फी होतं. जेव्हा त्यांना आम्हाला भेटायची इच्छा असायची, तेव्हा ते यायचे. जेव्हा त्यांना एकटं राहावं वाटायचं, तेव्हा ते निघून जायचे. माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते बराच काळ आमच्यासोबत राहिले होते. ते मूडी होते आणि त्यांना एकटं राहायला आवडायचं. त्यांना त्यांची कामं इतरांनी केलेली त्यांना आवडत नसे. त्यांच्याजवळ आम्ही केअरटेकर पाठवायचो, पण एक-दोन दिवसांत त्यांना कामावरून काढून टाकायचे. गेल्या तीन वर्षापासून त्यांनी आम्ही, आमचे जवळचे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मित्रांसह लोकांशी मर्यादित संपर्क ठेवण्यास सुरुवात केली होती,” असं गश्मीरने ‘इ-टाइम्स’ला सांगितलं.
“मी स्मार्ट आहे, पण बाबा…”, देखण्या रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरने केलेलं वक्तव्य
पुढे तो म्हणाला, “ते शेजार्यांशी संवाद साधणारे किंवा ते जिथे राहायचे तिथे मॉर्निंग वॉक ग्रुपचा भाग बनणारे नव्हते. त्यांच्या मृत्यूबद्दल आम्हाला उशिरा कळण्यामागे हे देखील एक मुख्य कारण होते. सर्वांना मी स्पष्टीकरण देतोय असं वाटू शकतं. मी जे काही बोलतो त्याचे वेगवेगळे अर्थही काढले जातील, पण हरकत नाही.”
Photos: रवींद्र महाजनींनी लेक गश्मीरबरोबर ‘या’ चित्रपटांमध्ये केलं होतं काम; हिंदी सिनेमाचाही समावेश
दरम्यान, रवींद्र महाजनी ७-८ महिन्यांपासून आंबी गावात एकटेच राहत होते, अशी माहिती समोर आली होती. आता गश्मीरनेही वडिलांना एकटं राहायला आवडायचं असं म्हटलं आहे. ते त्यांना हवं तिथे ते राहायचे, स्वतःची कामं स्वतःच करायचे, असंही गश्मीरने सांगितलं.