क्षितिश दातेने ‘बन मस्का’, ‘लोकमान्य टिळक’ या मालिकांतून घराघरांत पोहोचला. पण ‘धर्मवीर’ चित्रपटात त्याने एकनाथ शिंदेंची साकारलेली भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. या भूमिकेला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केले आहे. आता क्षितिश दातेने प्रवीण तरडेंबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
क्षितिश दातेने नुकतीच लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रवीण तरडेंबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत क्षितिश म्हणाला, “प्रवीण तरडेंबरोबर काम केलेला नट सांगेल की भारतातल्या कुठल्याही सेटवर काम करू शकतो. कारण- त्यांच्या सेटवरील वातावरण इतकं उत्तम असतं. ते डिमांडिंग दिग्दर्शक आहेत. त्यांना माहित असतं की त्यांना काय हवं आहे. प्रवीण तरडेंच्या सेटवर तुमचा फॉर्म जाऊ शकत नाही. तुम्ही आऊट ऑफ फॉर्म जाऊच शकत नाही. तुमचा स्ट्राईक रेट बरोबर बसतो. कारण- ते त्यांना जे हवं ते मिळत नाही, तोपर्यंत ते थांबत नाहीत. उगाच नाही त्यांनी मोठ्या बजेटचे भारी चित्रपट केलेत. त्यांना वाटलं की नरिमन पॉइन्टला शूटिंग तर तिथे शूटिंग झालं. त्यांना वाटलं खूप कटिंग करून एक सीन आठ आठ तास करायचा आहे. तर तो केला जातो. गाड्यांचा ताफा जातोय, त्याचा सी लिंकवर एरिअल शॉट हवाय, तर आम्ही हे परवानगी काढून हे शूट केलं आहे. आम्ही मंत्रालयाच्या आसपास, दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये शूट केलं आहे. एखादा अॅक्शन सीन खरा दिसेपर्यंत ते शूट करतात. त्यामुळे त्यांचे सिनेमे मोठे होतात. मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीररावसारखे चित्रपट पाहायला मिळतात.
पुढे अभिनेता प्रवीण तरडेंच्या सेटवर रागवण्याबाबत म्हणाला, “ते सतत चिडतात. पण, एका पॉइन्टला माहित असतं की ते त्या क्षणापुरतं आहे. सुरूवातीला मला किंवा सगळ्याच नटांना असं होतं की सर चिडलेत. अजूनही भीती आहेच. त्यांची जहाल नजर बघून वाटतं, मला आता या माणसाच्या तावडीतून वाचवा.मात्र, तुम्ही शॉट चांगला दिला तर ते तुमचं मनापासून कौतुक करतात. त्यांचं सगळं टोकाचं असतं. त्याचं असं आहे की जितकं तुम्ही त्यांच्याबरोबर काम कराल, तेवढे ते जास्तीत जास्त कळू लागतात.
पुढे तो म्हणाला की शूटिंग करताना त्यांना अनेक गोष्टी सुचतात. त्यांनी अप्रतिम लिहिलेलं असतं. आपल्याला वाटतं की यापेक्षा जास्त असू शकत नाही. मात्र,तसे सीन शूटिंग करताना अजून समृद्ध होतात. अनेकदा सीन वेगळे लिहिलेलं असतात आणि शूटिंग करताना ते वेगळे करून घेतात. मला त्यांचं फार कौतुक वाटतं. मला आनंद आहे की मी त्यांच्याबरोबर काम करू शकलो. दुनियादारी जास्त कळायला लागली. आपलं गोड विश्व असतं, त्या भिंती तोडून घुसण्याची माझ्यामध्ये वृत्ती तयार झाली, असे वक्तव्य क्षितीशने या मुलाखतीत केले आहे.