‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार नेहमी चर्चेत असतात. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या विनोदी शैलीच्या जोरदारावर हास्यजत्रेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच जितका मोठा चाहता वर्ग ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा आहे, तितकाच चाहता वर्ग आता या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांचा झाला आहे. सध्या हास्यजत्रामधील कलाकारांचे नवनवीन चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. नुकताच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने नम्रता संभेरावने खास पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री नम्रता संभेरावने प्रसाद खांडेकरबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “अभिनंदन पश्या…मला तुझा अभिमान आहे. आपला दुसरा सिनेमा ‘चिकी चिकी बुबूम बूम’ हा चित्रपटगृहात अतिशय उदंड प्रतिसादात चालू आहे. काही भागात तर हाउसफुल्ल होतोय हे ऐकून खूपच भारी वाटतंय. कारण ‘अरे ते थिएटर हाउसफुल्ल झालंय, प्रेक्षक गर्दी करतायत’ हे ऐकायला आपले कान आसुसलेले असतात. प्रेक्षकांना सिनेमा प्रचंड आवडतोय. ते चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटतायत आणि तोच आनंद तुझ्या चेहऱ्यावर पूर्णपणे झळकतोय. जे, जे रसिक आमच्यावर प्रेम करतात त्यांना मी खात्रीने सांगू शकते दोन तास चेहऱ्यावर निखळ हास्य हवं असेल तर हा चित्रपट नक्की पाहा. आपल्या कुटुंबासह, मित्रांबरोबर हा सिनेमा तुम्ही अजून जास्त एन्जॉय करू शकता.”
“रसिकहो, नाटकाला तुम्ही जसा उदंड प्रतिसाद देता. तसाच उत्साह चित्रपटगृहात देखील आम्हाला बघायचा आहे. हाउसफुल्लच्या पाट्यांचा आनंद तुमच्यामुळेच अनुभवता येतो आणि अधिकाधिक उत्तम काम करण्याचा, तुमचं मनोरंजन करण्याचा उत्साहदेखील तुमच्यामुळेच निर्माण होतो. १७ कलाकार एका गोष्टीत गुंफले गेलेत, त्यात ते काय धमाल करू शकतात हे बघण्याची मज्जा तुम्हाला मोठ्या पडद्यावर लुटता येईल. त्यामुळे कळकळीची विनंती चित्रपटगृहात जाऊनच सिनेमा बघा. आपल्या चित्रपटाला भरभरून यश मिळावं या तुला सदिच्छा, असाच मोठा हो…खुश राहा आणि उत्तम कलाकृती बनवत राहा,” असं नम्रता संभेरावने लिहिलं आहे.
दरम्यान, ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात अभिनेत्री नम्रता संभेरावचा कॅमिओ आहे. या कॅमिओबद्दल नम्रता म्हणाली होती, “‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात माझा छोटा कॅमिओ आहे. अवघ्या चार वाक्यांची भूमिका आहे. ही छोटी भूमिका खूप मोठा परिणाम करते. तर आता मी वेगळं काम केलं आहे, जे चार वाक्यात संपणार आहे. पण अत्यंत महत्त्वाचं काम केलंय. प्रसादचे मला मनापासून आभार मानायचे आहेत.”