लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडलं. त्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले असून त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘एनडीए’ला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला १५० ते १७०च्या आसपास जागा मिळत आहेत. मात्र, सगळ्यांचं लक्ष ४ जून रोजी होणाऱ्या निकालाकडे लागलं आहे. यातच लोकसभेच्या संभाव्य निकालावर अभिनेते आनंद इंगळे यांनी भाष्य केलं आहे.

‘तारांगण’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधताना आनंद इंगळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आपलं मत मांडलं. त्यांना विचारलं गेलं होतं की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत तुमचा अंदाज काय आहे? यावर आनंद इंगळे म्हणाले, “यावेळेला अंदाज लावणं खूप अवघड आहे आणि मीही अत्यंत सामान्य जनतेने प्रमाणे म्हणजेच गरीब किंवा अनभिज्ञ हे मी फक्त पैशाच्या अर्थाने म्हणतं नाहीये वेगळ्या अर्थाने म्हणतोय. आम्हाला माहितीच नाही कसं होईल? असा भाभडा विचार करणाऱ्या लोकांप्रमाणे झालं आहे.”

हेही वाचा – ‘मिस्टर अँड मिसेज माही’ची ओपनिंग दमदार पण दुसऱ्या दिवशी मंदावला वेग, केली ‘इतकी’ कमाई

“आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल याचा अंदाज लावू शकतोय का? मी राजकीयदृष्ट्या निरक्षर असणं असं अजिबात म्हणत नाहीये. त्याच्यासाठी सजग असलं पाहिजे. मी माझं मत दिलंच की, फक्त मला खरोखरचं या वेळेला अवघड असल्यासारखं वाटतंय. विचारधारेमधला फरक असू शकतो. तुमची एक विचारधारा, माझी एक विचारधारा. मी यावेळेस या विचारधारेला मत दिलं होतं. पण दुसरी विचारधारा निवडून आली. जास्त लोकांना ती विचारधारा निवडून यावी असं वाटतं होतं आणि त्यांनी तो राज्यकारभार केला इतकं सोप होतं. पण आता म्हणजे माझी विचारधारा आहे आणि ज्या विचारधारेला मी मत देतो आहे, त्याच्यातलं कोणीतरी दुसरीकडे जातात, पुन्हा परत येतात. काहीच कळंना झालंय. जनतेसाठी हा गोंधळ झालाय. आपल्याकडे गोंधळाचं वातावरण आहे. जे राजकीय विश्लेषक आहेत, त्यांनाही वाटतंय की यावेळेला अवघड आहे. तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना काय वेगळं वाटणार?” असं स्पष्ट मत आनंद इंगळेंनी मांडलं.

पुढे त्यांना भूमिका बदलणाऱ्या राजकारण्यांविषयी विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “मला याचा राग येण्यापेक्षा असहाय्य होतं. राग येऊन काय होणार आहे. असहाय्य होतं आणि वाटतं, बाबांनो हे कशासाठी चाललं आहे? आणि खरोखर मला हे मनापासून वाटतं की, आम्ही काय मुर्ख आहोत का? इतकंपण नका ना करू. एका अख्ख्याच्या अख्खा प्रचंड मोठा वर्ग एका विचारधारेच्या मागे असताना त्याच्या विरुद्ध विचारधारेच्या पक्षाबरोबर हातमिळवणी करता. तर तुम्हाला कधीच अरे बापरे लोक काय म्हणतील, याची भीती नाही का वाटत? ती वाटत नसेल तर आम्ही किती असहाय्य आहोत सांगा बरं. पण आता भूमिका बदलणाऱ्यांना भीती वाटत नाहीये हे स्पष्ट दिसतंय.”

हेही वाचा – “प्रत्येक जन्मी तुझ्याच पोटी जन्म मिळू दे…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची आईसाठी खास पोस्ट, म्हणाला…

“आपल्या सगळ्यांना माहितीये खरी पंचायत कार्यकर्त्यांची होते. मी काय करू? आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात लढत होतो, कधीतरी यांना मदत करत होतो. काय करायचं? तर मला असं वाटतं, सुजाण नागरिक म्हणून माझ्या हातात फक्त मत देणं एवढंच आहे. मला राजकारणाविषयी घेणं-देणं नाहीये असं म्हणू नका. लोकांना माहितीये काय पात्र आहे. खरंच आपल्या नशीबाला हेच आलं असेल तर आपापल्या हे पात्र आहे का? आणि १०० पैकी ४० लोकांना ते समजतंय ६० लोकांना ते समजत नाहीये. या सगळ्यांचा परिणाम मग लोकांना भोगायचा आहे ना. मग काय आहे ते आहे. म्हणून म्हटलं राग नाही येत, असहाय्य होतं,” असं आनंद इंगळे म्हणाले.