९०च्या दशकातील मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ऐश्वर्या नारकर. त्या काळात जितक्या ऐश्वर्या लोकप्रिय होत्या तितक्याच आजही आहेत. त्यांच्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. ऐश्वर्या यांनी जरी पन्नाशी ओलांडली असली तरी त्यांच्यातील तारुण्य आणि ऊर्जा ही आजच्या पिढीला लाजवेल अशी आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्या सोशल मीडियावर पोस्टमुळे खूप चर्चेत आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐश्वर्या नारकर या इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. योगा, डान्सचे रील्स सतत शेअर करत असतात. पण यामुळे त्या बऱ्याचदा ट्रोल होतात. त्यांच्या वयावरून ट्रोल केलं जातं. पण याला ऐश्वर्या सडेतोड उत्तर देऊन ट्रोलर्सची तोंडं बंद करतात. याविषयी त्या नुकत्याच ‘इट्स मज्जा’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी बोलल्या. तेव्हा देखील त्यांनी ट्रोलर्सना चांगलंच उत्तर दिलं.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी इन्स्टाग्रामवर कोणाला फॉलो का करत नाहीत? कारण सांगत म्हणाले, “मी….”

ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मला असं वाटतं प्रत्येक माणसाला महत्त्व आहे. आपण खरंतर सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी, एकमेकांकडून काहीतरी घेण्यासाठी केला पाहिजे. ज्यावेळी मी कुठल्याही गोष्टी पोस्ट करते, रील्स पोस्ट करते, त्याच्या खालची कॅप्शन कोणीच वाचत नाही. जे मला म्हणायचं आहे, ते मी कॅप्शनमध्ये खूप लिहिलेलं असतं. असे काहीतरी विचार देणं, तुमच्या रिलेशनशिपबद्दल काहीतरी बोलणं किंवा आजकाल जे ट्रोल करतात, त्यांचे रिलेशनशिप किती हेल्थी आहेत? काय आहेत? हे आपल्याला या पिढीचं माहित आहे. इतकी वर्ष आम्ही दोघं एकमेकांबरोबर राहतोय, आनंदाने राहतोय, तर त्यानिमित्ताने आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरी गोष्टी मला असं वाटतं, आपण आदर केला पाहिजे. सोशल मीडियावरील गोष्टी आवडल्या नाहीत, तर तुम्ही बघू नका किंवा अनफॉलो करा. मला ही करता येत मी ही ब्लॉक करू शकते. पण मला असं होतं की, आपण माणूस म्हणून एकमेकांचा आदर का करू शकतं नाही? आपल्याला नाही आवडलंय तर आपण नाही आवडलं एवढ्या शब्दात म्हणू शकता. पण नाही, तुम्ही त्यांचं वय आणता. त्याच्यात हा मुद्दा कधी आला कळालं नाही की, रील्समुळे पैसे मिळतात. प्लीज खरंच पैसे मिळत असतील तर मला सांगा काय स्कीम आहेत? ती मी घेईन. परंतु असं नाहीये. माणूस प्रत्येक गोष्ट पैशांसाठी नाही करत.”

हेही वाचा – अभिनेते मकरंद अनासपुरे यांना दहावीत किती टक्के मिळाले होते? जाणून घ्या…

पुढे ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की, “आम्ही पैशांसाठी बारा-बारा तास काम करतो. ती आमची आवड आहे. त्याच्यासाठी या बाकी गोष्टी करत बसण्याच काही कारण नाहीये. बरं इतक्या उथळ विचाराने नका वागू आणि एखाद्याला बोलायचं म्हणून नका बोलू, असं मला वाटतं. त्याने किती फरक पडतो आणि किती फरक पडतं नाही, हा वेगळा मुद्दा आहे. एकमेकांचा आदर करणं ही मला प्राथमिक गोष्ट वाटते. त्यात मला असं वाटतं की, याच्यात आई-वडिलांचा खूप सहभाग आहे. आपण आपल्या मुलाला कसे संस्कार देतो. आपली मुलं कोणाला काय बोलतात, हे सगळे संस्कार आपल्या घरात होतात. त्यामुळे जे विकृत बोलतात, त्यांच्या घरातल्या वातावरणावर मला शंका येते की, आई-वडिलांनी संस्कार केले की नाही केले? किंवा त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती गेले? म्हणजे सगळे असे प्रश्न अनुत्तरित राहतात. फक्त माझी एकच विनंती आहे, एकमेकांचा आपण आदर केला पाहिजे. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. प्राणी सुद्धा एकमेकांना छान प्रेमाने वागवतात. पण आपण माणूस आहोत, प्राण्यांच्या वरचढ आपल्याला बुद्धी दिलीये त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करायला हवा.”

हेही वाचा – Video: “आई तू कधीच देव बाप्पाच्या घरी जाऊ नकोस…”, क्रांती रेडकरने शेअर केला लेकीचा गोड व्हिडीओ, म्हणाली…

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. शिवाय त्या ‘स्टार प्लस’वरील हिंदी मालिका ‘बातें कुछ अनकही सी’मध्ये सुद्धा काम करत आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ताली’ वेब सीरिजमध्ये त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress aishwarya narkar answer to trollers pps
Show comments