अभिनेत्री हेमल इंगळे(Hemal Ingle) ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. स्वप्नील जोशीबरोबर अभिनेत्रीने स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर हे दिग्गज कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसले होते. आता हेमल इंगळे ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग(Pushkar Jog) प्रमुख भूमिकेत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री हेमल इंगळेने पुष्कर जोगबद्दल वक्तव्य केले आहे.
संपूर्ण जग त्याचं…
अभिनेता पुष्कर जोग व हेमल इंगळे यांनी नुकतीच ‘नवशक्ती’ला मुलाखत दिली. यावेळी हेमल इंगळेने पुष्कर जोगचे कौतुक करत म्हटले, “दुबईला मी याआधी गेले होते, पण यावेळी पुष्करबरोबर गेले होते, म्हणून इतक्या लोकांना भेटले. संपूर्ण जग त्याचं माहेर आहे. अख्ख्या जगातल्या मराठी माणसांना त्याने जोडून ठेवले आहे. कुठेही जा, तिथल्या मराठी लोकांच्या तो संपर्कात आहे. ते लोकं त्याच्या मदतीला धावून येतात. त्यामुळे शूटिंगवेळी पॅरिस, अॅमस्टरडॅम, दुबई अशा ठिकाणची मराठी मंडळं तिथल्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली. मला त्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. पुष्करचंदेखील कौतुक आहे की त्याच्यासाठी ती लोकं मदतीला आली.”
हेमल इंगळेच्या या बोलण्यावर पुष्कर जोग म्हणाला, “माणसं कमवणं ही खूप चांगली गोष्ट आहे. माणसं कमवायला आपण विसरतो. प्रेम अशी गोष्ट आहे की, तुम्ही प्रेम दिलं तर लोकही तुम्हाला प्रेम देतील. माझे सगळीकडे मित्र आहेत.” तसेच पॅरिस, अॅमस्टरडॅम या ठिकाणी पहिल्यांदाच चित्रपटाचे शूटिंग केल्याचे म्हटले. ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
पु्ष्कर जोग हा त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीदेखील ओळखला जातो. तो त्याच्या परखड वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. मराठी इंडस्ट्रीने मराठी चित्रपटांसाठी एकत्र आलं पाहिजे, असेही पुष्करने अनेक मुलाखतींमध्ये म्हटले आहे. आता तो ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोगने केले आहे. सहलेखन नमिष चापेकर यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.