काही दिवसांपूर्वी ५७वा ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट’ पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आलं. यानिमित्ताने उषा नाईक यांनी विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलला मुलाखती दिल्या. ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये उषा नाईक यांनी त्यांच्याबरोबर पुरस्कारांचं राजकारण कसं झालं? याविषयी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उषा नाईक म्हणाल्या, “माझ्याबाबतील सांगायचं म्हटलं तर, प्रत्येक पारितोषिक घेताना एक विक्रम घडला आहे; जो कोणाच्याबाबतीत घडला नाहीये. पूर्ण इंडस्ट्रीचा इतिहास काढला तरी असं नाही झालंय. मी ‘हळदी कुंकू’ नावाचा चित्रपट केला होता आणि त्याच वेळी ‘कलावंतीण’ केला होता; ज्यामध्ये ‘पिकल्या पानाचा’ हे माझं गाणं होतं. तर या चित्रपटासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सर्व पत्रकारांनी माझी निवड केली होती. माझा इंडस्ट्रीत गॉडफादर नव्हता किंवा मंत्री, राजकीय मंडळी ओळखीचे नव्हते. त्यावेळी दादा कोंडके व उषा चव्हाण यांच्यामध्ये एक टाय झाला होता. उषा चव्हाण यांचं म्हणणं होतं की, तुमच्या (दादा कोंडके) चित्रपटासाठी मला कुठे पुरस्कार मिळतो? असा हा त्यांच्यामधला वाद होता. त्यामुळे दादांची इच्छा होती की, माझा कुठलाही चित्रपट असू दे त्यासाठी उषा चव्हाणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द्यायचा.”

हेही वाचा – मराठी, हिंदी मालिकाविश्व गाजवल्यानंतर लाडकी मायरा वायकुळ आता मोठ्या पडद्यावर, स्वप्नील जोशीच्या ‘या’ चित्रपटात झळकणार

“त्यावेळी सगळे पत्रकार माझ्या बाजूने होते. माझ्या पाठीमागे दादा कोंडके वगैरे कोणी नव्हतं. असा तो काळ होता. पत्रकारांनी ठरवलं की, आम्ही उषा नाईक यांनाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवडणार उषा चव्हाण यांना नाही. तिला ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ चित्रपटासाठी सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यागराज पेंढाकर यांच्यासारखे मोठी मंडळी माझ्या मागे होती. ते मला म्हणाले, ‘आम्ही तुझ्यासाठी भांडतोय.’ पण मला काही ही गोष्ट कळाली नाही. काम करणं, एवढंच मला माहित होतं. १९८९सालची ही गोष्ट आहे. मला त्यावेळी पुरस्कार मिळणं वगैरे या गोष्टी काहीच माहित नव्हत्या. त्यागराज पेंढारकरांनी सांगितलं, ‘जर तुम्हाला त्या मुलीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द्यायचा नसेल तर आम्ही यावर बहिष्कार टाकणार. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जर पुरस्कार द्यायचे असतील तर तुम्ही द्या.’ त्यावेळेस इतका मोठा वाद झाला होता. जी माणसं माझी कोणीच नव्हती ती माणसं त्यावेळेस माझ्यासाठी उभी राहिली. यावेळी पुरस्कार लवकर जाहीरच होतं नव्हते. मग मंत्र्यांची आणि परीक्षकांची बैठक झाली. तेव्हा आम्हाला उषा चव्हाण यांना पुरस्कार द्यायचा आहे असा तगादा धरला. मग पत्रकार म्हणाले, ‘तुम्ही पुरस्कार द्या. पण त्या मुलीचा सहाय्यक अभिनेत्री म्हणून अपमान करायचा नाही.’ यावर सर्व पत्रकार अडून बसले आणि त्यावर्षी विशेष अभिनेत्री हा पुरस्कार सुरू झाला. हा पहिला पुरस्कार मला मिळाला, असा हा विक्रम झाला. तसंच विशेष अभिनेता म्हणून अशोकला देखील पुरस्कार मिळाला होता.”

पुढे उषा नाईक म्हणाल्या, “‘देवा शप्पथ’ या चित्रपटासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन जाहीर झालं होतं. त्यानंतर मला सांस्कृतिक खात्यातून फोन आला की, तुम्ही नेहमीच चांगली काम करता. तुम्हाला नेहमीच चांगले पुरस्कार मिळतात. अजूनही तुम्ही काम कराल, अजूनही तुम्ही पुरस्कार मिळवाल. मला सुरुवातीला कळलं नाही हा कशासाठी मला फोन आलाय. मी म्हटलं, ‘ठीक आहे. तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे?’ ते म्हणाले, ‘यावेळी आपण ‘स्त्रीधन’ चित्रपटासाठी अलका कुबलला पुरस्कार देऊ. नवोदितांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. तुम्ही तिच्याबरोबर बरीच काम केली आहेत. आम्हाला तिला यंदाचा पुरस्कार देण्याची इच्छा आहे.’ मी म्हटलं, ‘द्या.’ त्यानंतर म्हणाले, ‘सगळ्यांनी तुमचं नाव सुचवलं. सगळे पत्रकार म्हणतायत की, तुमची परवानगी घ्या.’ मी म्हटलं, ‘मला त्याबद्दल काही हरकत नाही. तुम्ही जरूर द्या.’ पण मला खरंच खूप त्यावेळी वाईट वाटलं. घरचीच लोकं कशी अन्याय करतात ना. कारण मला कोणीची गॉडफादर नव्हतं. तसंच मला त्याचं जास्त कौतुकही नव्हतं. माझ्याबरोबर पहिल्यांदाच असं काही घडलं नव्हतं. मी याचा विचार केला नाही.”

हेही वाचा – २४ वर्षांची ‘मिस वर्ल्ड २०२४’ क्रिस्टिना पिस्कोव्हा कोण आहे? काय काम करते? जाणून घ्या…

“पण दुसऱ्या दिवशीच मला त्याच चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला. पण मला इतकं वाईट वाटलं होतं की, मी ते पुरस्कार घ्यायला गेले नाही. त्यावेळी मराठीला फक्त चारचं पुरस्कार द्यायचे. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट. मी काही घ्यायला गेले नाही. ते म्हणाले, ‘काय हे मराठी कलाकार आम्ही यांना इतकं प्रेमाने देतो. पण हे कोणी येत नाही. हे लोकं अपमान करतात.’ तेव्हापासून त्यांनी मराठीसाठी फिल्मफेअर पुरस्कार देण्याचं बंद केलं. पण बऱ्याच काळानंतर ‘एक हजाराची नोट’च्या वेळेला रितेश देशमुखने मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा सुरू केला. तेव्हा पहिल्यांदा मलाच ‘एक हजाराची नोट’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. मी त्यादिवशी बोलले पण, माझ्यामुळेच बंद पडलं आणि माझ्यामुळेच सुरू झालं,” असे किस्से उषा नाईक यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress usha naik talk about awards and dada kondke usha chavan deal pps
First published on: 10-03-2024 at 16:53 IST