Anant Ambani Radhika Merchant Wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या त्यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मुकेश व नीता अंबानींचा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. १२ जुलैला अनंत-राधिकाचं हिंदू पद्धतीने लग्न होणार असून ८ जुलैला दोघांना हळद लागली. सध्या देशातच नव्हे तर जगभरात अनंत-राधिकाच्या शाही लग्नसोहळ्याची चर्चा सुरू आहे. या बहुचर्चित अशा लग्नाची पत्रिका एका मराठी अभिनेत्याला देण्यात आली आहे. याचा फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला असून “आता जावं लागेल लग्नाला” असं लिहिलं आहे.

जुलै महिना सुरू होताच अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सामूहिक विवाह सोहळा, मामेरू समारंभ, गरबा नाईट, संगीत सोहळा, ग्रह शांती पूजा आणि हळदी समारंभ हे कार्यक्रम झाले असून दोघांच्या लग्नाला अवघे दोन दिवस बाकी आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्याला अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका पोहोचली आहे.

हेही वाचा – Video: मेस्सीची जर्सी, दोन वेण्या अन् सोनाली कुलकर्णीचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “विकी कौशल तू…”

सध्या मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या ‘चारचौघी’ नाटकातला अभिनेता श्रेयस राजेला मुकेश अंबानींकडून मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यात आली आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “आता जावं लागेल लग्नाला!,” असं त्याने फोटोवर लिहिलं आहे. तसंच श्रेयसने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने अनंत-राधिकाच्या लग्नाची पत्रिका कशी त्याच्यापर्यंत पोहोचली याविषयी लिहिलं आहे.

श्रेयस राजे इन्स्टाग्राम पोस्ट

श्रेयसने लग्नाच्या पत्रिकेचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “तर ही दस्तूरखुद्द मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. ही पत्रिका माझ्यापर्यंत पोहोचावी म्हणून अंबानी मॅनेजमेंटकडून एक अख्खा माणूस अपॉइंट केला होता. जो वांद्र्याहून घोडबंदरपर्यंत फक्त ही पत्रिका द्यायला आला. क्रेझी मॅनेजमेंट.”

हेही वाचा – Video: “औक्षवंत हो…”, ऐश्वर्या नारकर यांनी पती अविनाश नारकरांचा ‘असा’ साजरा केला वाढदिवस, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

दरम्यान, श्रेयस राजेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने बऱ्याच एकांकिका, नाटक, मालिका, वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘जिगरबाज’, ‘भेटी लागी जीवा’, ‘ती परत आलीये’ या मालिकांमध्ये श्रेयसने विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. सध्या तो चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ नाटकात काम करत आहे. या नाटकात श्रेयसबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, पार्थ केतकर महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.