Prajakta Mali Personal Life: प्राजक्ता माळी ही मराठीतील आघाडीची व चाहत्यांची लाडकी अभिनेत्री आहे. प्राजक्ताचा चाहतावर्ग मोठा आहे. ती तिच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ३५ वर्षीय प्राजक्ता माळी सिंगल आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एका मुलाखतीत आईला लग्नासाठी मुलगा शोधण्यास सांगितलंय असं विधान केलं होतं. पण एकदा प्राजक्ताने तिचे लग्नाबाबतचे विचार सांगितले होते. तसेच तिने काही वर्षांपूर्वीच्या तिच्या एका नात्याबद्दल भाष्य केलं होतं.
आपल्या सुंदर फोटोंनी चाहत्यांना भुरळ घालणारी प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तसेच तिच्या कामाबद्दल अपडेटही देत असते. स्पष्टवक्ती प्राजक्ता एकदा ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल तिचे विचार काय आहेत, याबद्दल व्यक्त झाली होती.
…तर लग्न नको – प्राजक्ता माळी
“डोक्याची मंडई होणार असेल तर लग्न नको. कारण मानसिक शांतता हिच माझी आयुष्यभरासाठी प्राथमिकता आहे. एक जोडीदार तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. तुमचं रोजचं जगणं, तुमचं भविष्य, तुमची आर्थिक गणितं, तुमचे मानसिक आरोग्य, तुमचे आरोग्य या सगळ्या गोष्टी. लग्न ही खूप मोठी जोखीम आहे,” असं प्राजक्ता म्हणाली होती.

अध्यात्मामुळे माझ्या गरजा खूप कमी – प्राजक्ता
“काहींना शारिरीक, भावनिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक गरज असतात, त्यांच्यासाठी लग्न ही गोष्ट खूप सोपी आहे. अध्यात्मामुळे माझ्या या गरजा खूप कमी झाल्या आहेत. त्यामुळे जर या गरजाच संपल्या तर कशाच्या जीवावर ते नातं तरणार? फक्त प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा. पण याची गॅरंटी या कलियुगात कोण देणार. नातं खरं असेल तरंच ते टिकेल. या गोष्टी मी आईला समजवतेय आणि तिलाही कळतंय,” असं तिने म्हटलं होतं.
मी प्रेमात पडते पण…
“मी मधेमधे प्रेमात पडते, पण नंतर मला कळतं की हा शेवटपर्यंत नसणार, मग मी सांगते की ऐक मित्रा, सगळं छान आहे पण हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तू घरी जा. (हसते) आपण थांबूया. हे मी पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं. तू खोटं बोलतोस माझ्याशी, मी तुला पकडलं आहे, हे त्याचे पुरावे आहेत. रितसर जय महाराष्ट्र करण्यात आलाय त्याला. कारण तो सतत खोटं बोलत होता आणि ते मान्यही करत नव्हता. तुमच्यामध्ये खरं बोलण्याची हिंमत पाहिजे, कारण तीच सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. मी चुकलो हे तरी मान्य करायला हवं. त्यासाठी माफी मागून मार्ग काढायला हवा, पण नाही. सारखं खोटं बोलायचं. जो खोटं बोलतो ना तो सर्वात आधी बाद होतो,” असं प्राजक्ताने सांगितलं होतं.