पुणे पोलिसांनी गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी छापे टाकून हजारो कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. ललित पाटील प्रकरण चर्चेत असताना आता अल्पवयीन मुलांनी अमली पदार्थांचं सेवनं केल्याचं नवीन प्रकरण समोर आलं आहे. पुणे शहरातील सतत वर्दळीचा आणि सर्वाधिक हॉटेलची संख्या असलेल्या फर्ग्युसन रोडवरील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले दारू पिताना, तर बाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लिक्विड लेझर लाउंज ( एल ३) मधील व्हायरल व्हिडीओनंतर या प्रकरणात सात जणांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेते – दिग्दर्शक पिट्या भाई म्हणजे रमेश परदेशी यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

दिग्दर्शक रमेश परदेशी यांनी काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वेताळ टेकडीवरील नशेच्या आहारी गेलेल्या तरुणींचा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी आजची तरुणाई कशाप्रकारे नशेच्या आहारी जाऊन चुकीच्या मार्गाला जातेय यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आता एल ३ लाउंजमधील व्हायरल व्हिडीओनंतर दिग्दर्शकाने पुन्हा एकदा पुणे शहरातील तरुणाईबद्दल परखड मत मांडलं आहे.

हेही वाचा : देवावर विश्वास आहे का? विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “आठ आणे फेकून लाख रुपये मागायचे…”

“व्यसन, ड्रग्ज या गोष्टी आधी शहराच्या वेशीवर होत्या, मग टेकड्या आणि आता मध्यवस्तीत आल्या आहेत. घरापर्यंत किंवा घरात यायची वाट पाहणार का? आपण पुणेकर म्हणून काही करणार की नाही मी तर करणार तुम्ही?” असा प्रश्न पिट्या भाईने पुणेकरांना या पोस्टद्वारे विचारला आहे.

रमेश परदेशी पुढे लिहितात, “आधी ललित पाटील, आज फर्ग्युसन रस्त्यावर ड्रग्ज पार्टी आणि त्याच दिवशी एका मॉलच्या बाथरूममध्ये या तरुणींचे ड्रग्ज सेवन. हेच अशाप्रकारचं वास्तव मी काही महिन्यांपूर्वी दाखवलं (अपवाद चेहरे ब्लर करायचा) त्यांनी तर जे काही व्यसन केलं ते तर पब्लिक जागेत ते पण सर्वासमोर आणि ते करताना त्यांना काही फरक पडला नाही. आता या बाथरूममध्ये हे बिनधास्त नशा करताहेत. आणि त्यांचं सार्वजनिक आयुष्य कसं धोक्यात आणलं ही तक्रार करून मागे माझ्या कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य घालवलं असो. आपलं आपल्या शहराकडे आणि आजूबाजूला असणार्‍या मुला-मुलींकडे लक्ष आहे का? आपण लक्ष देणार आहोत का? फक्त प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यावर अवलंबून न राहता एक पालक एक नागरीक म्हणून पुढची पिढी बरबाद होऊ नये म्हणून काही करणार आहोत का? आणि करणार असाल तर डोळे, कान उघडे करून फिरा… आणि सगळे जण मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याच्या नांगरान नांगरलेल्या पवित्र पुण्यभूमीला जपू… मी पुणेकर माझं शहर माझा अभिमान… माझी जबाबदारी…!”

हेही वाचा : NEET च्या गोंधळावर संतापले किरण माने, “देश चालवणं म्हणजे मंदिर बांधणं नाही, जमत नसेल तर…”

दरम्यान, दिग्दर्शकाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी “केंद्रात आवाज उठवा उडता पुणे बंद झाला पाहिजे पुणे विद्येचे माहेरघर आहे”, “आवाज उठवावाच लागेल आता. भयंकर परिणाम होतील नाहीतर भविष्यात”, “प्रतिबंध घालणं जरुरीचं आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, काही पुणेकरांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.