इतिहास म्हंटल की अनेकजण नाक मुरडतात मात्र तोच इतिहास जर छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल तर अगदी लहानग्यांपासून तर आबाल वृद्धांपर्यंत सगळेचजण आवडीने हा इतिहास वाचतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. कोवळ्या वयात घेतलेली स्वराज्याची शपथ ते आदिलशाही, मुघलशाही यांसारख्या बलाढ्य साम्राज्याना दिलेली टक्कर. मराठे मुघल आणि यांच्यात बरीच वर्ष संघर्ष सुरू होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिदीर्तील लक्षणीय ठरलेली घटना म्हणजे ‘आग्रा भेट’. औरंगजेबाच्या भूमीतून त्याच्याच हातावर तुरी देऊन महाराज स्वराज्यात परतले होते. हीच घटना अभिनेते अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजवर अमोल कोल्हे यांनी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज साकारले होते. या चित्रपटात अगदी सुरवातीपासून अमोल कोल्हे यांनी आपली छाप पाडली आहे. शाहिस्तेखानला पळवून लावले, त्यात सुरत लुटल्याने महाराजांची जरब औरंगजेबपर्यंत पोहचली होती. पेटून उठलेला औरंगजेब महाराजांना धडा शिकवण्यासाठी यावेळी एक वेगळी चाल खेळतो. मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांच्याबरोबर आणखिन एक सरदार असे स्वराज्यावर चालून येतात. मोठी फौज असल्याने साहजिक महाराज वाटाघाटीसाठी प्रयत्न करतात. मिर्झा राजे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यात त्यांना यश येत नाही. उलट मिर्झा राजे त्यांना आग्र्याचे निमंत्रण देतात आणि आपल्या शब्दाखातर ते महाराजांना आग्र्याकडे रवाना होण्यास सांगतात. इथून खरी या घटनेची सुरवात होते.

चित्रपटाची गती मध्यंतरापर्यंत जलद आहे. मिर्झा राजे आणि महाराज यांच्यातील आग्रा भेटीबाबतची चर्चा आणखीन दाखवता आली असती तसेच महाराजांनी आग्रा भेटीस काय योजना आखल्या होत्या यादेखील अधोरेखित करायला हव्या होत्या. मध्यंतरानंतर महाराजांचा दरबारात होणार अपमान आणि त्यानंतरचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहेच. महाराजांच्या अपमानाचा प्रसंग जमून आला आहे. त्यानंतर महाराजांना नजरकैदेत ठेवले जाते. महाराज सुटकेसाठी जी आखणी करतात ती चित्रपटात दाखवताना जमून आली आहे.

चित्रपटातील गोष्ट आपण सगळेच जाणून आहोत पण हीच गोष्ट पडद्यावर दाखवण्या धाडस दिग्दर्शक कार्तिक केंडे आणि दोन दोन जबाबदाऱ्या खांद्यावर असणारे अभिनेते, निर्माते अमोल कोल्हे यांना यश आले आहे. महाराजांची सुटका होईपर्यंतची उत्कंठता ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. चित्रपटातील संवाद जमून आले आहेत. महाराजांचे एक, एक संवाद चित्रपटगृहात टाळ्या पडतील असे आहेत. अमोल कोल्हे यांनी चित्रपटात महाराज अप्रतिम साकारले आहेत. प्रसंगी कठोर, कधी संयमी, कधी मुलावर चांगले संस्कार घडवणारे वडील, अशा अनेक छटा त्यांनी उत्तमरित्या दाखवल्या आहेत. औरंगजेबाच्या भूमिकेत यतीन कार्येकर यांनी कमाल केली आहे. डोळ्यातून क्रूरता दाखवता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. कलाकार हरीश दुधाणे, प्रतीक्षा लोणकर आणि इतर कलाकारांनी आपापल्या भुमिका उत्तमरित्या पार पाडल्या आहेत. बऱ्याच वर्षांनंतर संजय जाधव यांच्या कॅमेऱ्याची जादू दिसली आहे. आजकाल चित्रपटात वापरणारे VFX देखील माफक आणि योग्य ठिकाणी वापरले गेले आहेत. ‘जय भवानी जय शिवराय गाणे’ शेवटी जाता जाता मनात घर करून जात.

ऐतिहासिक चित्रपट हे आजवरच्या इतिहासकारांनी संशोधन केलेल्या पुस्तकांच्या आधारावर तयार केले जातात. चित्रपटाच्या सुरवातीलाच हे नमूद केले गेले आहे. एकूणच अमोल कोल्हे यांनी महाराजांचा इतिहास नाटक, मालिका यानंतर चित्रपटाच्या माध्यमात घेतलेली ही ‘झेप’ यशस्वी ठरली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review of actor amol kolhes marathi film shivpratap garudzep spg