‘अग्निपथ’, ‘अजीब दास्तान’, ‘अर्थ’ अशा गाजलेल्या चित्रपटांतून महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रोहिणी हट्टंगडी(Rohini Hattangadi). हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू चित्रपटांतदेखील त्यांनी काम केले आहे. याबरोबरच नाटक आणि टीव्ही मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता रोहिणी हट्टंगडी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या जवळच्या मैत्रिणींनी त्यांचा एक चित्रपट पाहण्यास नकार दिला होता आणि त्यामागे काय कारण आहे, याबद्दल खुलासा केला आहे.

रोहिणी हट्टंगडी यांचा चित्रपट पाहण्यास मैत्रिणींनी का दिलेला नकार?

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलवर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ‘आता वेळ झाली’ हा तुमचा सिनेमा आला होता, तो लोकांपर्यंत इतका पोहचू शकला नाही; त्यानंतर तुमची या चित्रपटाबद्दल काय चर्चा झाली? यावर उत्तर देताना रोहिणी हट्टंगडी यांनी म्हटले, “तो चित्रपट दोन आठवडे थिएटरला होता. पुणे फेस्टिव्हलमध्येदेखील तो दाखवला गेला होता. हा चित्रपट इच्छामरण या विषयावर आधारित आहे. इच्छामरण हा तसा अजून आपल्या जवळचा विषय नाहीये. आपल्याकडे वानप्रस्थाश्रमदेखील आहे, त्यामुळे एकदम इच्छामरणापर्यंत जाणं कोणाला अजूनही पचत नाही.”

“माझ्या शाळेतील मैत्रिणी आहेत, त्यांना माहीत आहे की मी खूप चित्रपट करते आणि नेहमी कौतुक वगैरे चाललेलं असतं. त्यांना मी सांगितलं की, ‘आता वेळ झाली’ हा चित्रपट येतोय, तो तुम्ही पाहिला पाहिजे. मग त्यांनी विषय विचारला, तर मी थोडक्यात सांगितलं. त्यावर त्यांनी चित्रपट पाहणार नाही असं सांगितलं. मी त्यांना म्हटलं की, त्याच्यात असं काही नाहीये, फारच गंभीर असं नाही, त्या चित्रपटात विनोददेखील आहेत. तरीसुद्धा माझ्या आठ जवळच्या मैत्रिणींपैकी फक्त दोघींनी तो चित्रपट पाहिला आणि ज्यांनी पाहिला त्यांना खूप आवडला. त्या इतर जणींना चित्रपट पाहण्यासाठी सांगत होत्या, पण त्यांचं म्हणणं असं होतं की, आम्हाला हा विषय पाहायचाच नाही.”

हेही वाचा: “ट्रक उलटून माझा मृत्यू झाला तर…”, घोडबंदर मार्गाने प्रवास करणारा अभिनेता संतापला; म्हणाला, “घाणेरड्या रस्त्यांमुळे…”

‘आता वेळ झाली’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत आहेत. इच्छामरण या विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा असून अनंत महादेवन यांनी याचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्याही प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत.

दरम्यान, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. त्यांची प्रमुख भूमिका असलेले ‘चारचौघी’ हे नाटक प्रेक्षकांच्य़ा पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळत आहे.