मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष लोकांना कळावं यासाठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांच्या जीवनावर बेतलेला ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केल्यावर खूप उत्साह पाहायला मिळाला होता, पण चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संघर्ष करावा लागत आहे. या चित्रपटाने एका आठवड्यात किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.

मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील उपोषण करत असताना काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर लगेच सिनेमाचं शूटिंग झालं आणि रिलीजची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचा ट्रेलर मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते लाँच करण्यात आला होता.

‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर निराशा, सहा दिवसांत कमावले फक्त…

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने या चित्रपटाच्या सात दिवसांच्या कमाईचे आकडे सांगितले आहेत. रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी या चित्रपटाने ८ लाख रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी ९ लाख, तिसऱ्या दिवशी १६ लाख, चौथ्या दिवशी ९ लाख, पाचव्या दिवशी चार लाख व सहाव्या दिवशी चार लाख आणि सातव्या दिवशी सिनेमाने ३ लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे सात दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन ५३ लाख रुपये झाले आहे.

“गोळीबाराचा आदेश कोणी दिला? हे देशाला समजलंच पाहिजे”, मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते ‘संघर्षयोद्धा’चा ट्रेलर

या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे, श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ

शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.