खणखणीत आवाज, अमोघ वाणी आणि रुबाबदार व्यक्तिमत्व या आयुधांनिशी रसिकांच्या मनावर राज्य करणारे चतुरस्त्र अभिनेते शरद पोंक्षे यांचा आज वाढदिवस. शरद पोंक्षे यांचं नाव उच्चारलं की नथुराम गोडसे हे ओघाने येतंच. समर्थ अभिनयाने नथुराम गोडसेंच्या भूमिकेला पोंक्षेंनी न्याय दिला. पण या नाटकामुळे त्यांना प्रचंड संघर्षाला, टोकाच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं. पण फक्त नथुराम एवढीच त्यांची ओळख नाही. चित्रपट, मालिका, नाटक अशी मुशाफिरी करणाऱ्या पोंक्षे यांच्या असंख्य भूमिका चाहत्यांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत. वादळवाटमधला देवराम खंडागळे असो किंवा अग्निहोत्रमधला महादेव. भूमिकेचं सोनं करणाऱ्या पोंक्षे यांना कर्करोगाने ग्रासलं. पण हार मानणं त्यांच्या स्वभावात नाही. विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांची कास पकडून वाटचाल करणाऱ्या पोंक्षे यांनी कर्करोगाला पुरुन उरत पुन्हा झेप घेतली. उमेदीच्या काळात नोकरी सांभाळून नाटकाची आवड जोपासणाऱ्या पोंक्षे यांचा चरित्रपट युवा कलाकारांसाठी प्रेरणादायी असाच आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पोंक्षे यांच्या कारकीर्दीचा घेतलेला धांडोळा.

शरद पोंक्षेंनी १९८९ मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं. पण, त्या काळात स्वत:मधील क्षमता सिद्ध करता येईल अशी सकस भूमिका त्यांना मिळत नव्हती. विक्रम गोखले, यशवंत दत्त, प्रभाकर पणशीकर अशा मातब्बर अभिनेत्यांकडून शरद पोंक्षेंना अभिनयाचं प्रशिक्षण मिळालं. जिथे शब्द संपतात तिथे अभिनयातून कसं बोलायचं हे कसब शरद पोंक्षे या दिग्गज कलाकारांकडून शिकले. त्याकाळात ते बेस्टमध्ये नोकरी करायचे. भाईंदरवासी असल्याने पहाटे ४ वाजता त्यांचा दिवस सुरू व्हायचा. पहाटे बरोबर ५.३० ची ट्रेन पकडून ते थेट बेस्टच्या कार्यालयात जायचे. त्यानंतर ३.३० ला कामावरून सुटले की, थेट शिवाजी मंदिर नाट्यगृह गाठायचे. दादर आणि कलाकार हे एक वेगळं समीकरण तयार झालं होतं.

devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Singer Dhvani Bhanushali acting debut
गायिका ध्वनी भानुशालीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले

हेही वाचा : “चित्रपट चालत नव्हते, काम नव्हतं…”, ‘जवान’च्या सेटवर शाहरुख खानने गिरीजा ओकला दिला ‘हा’ कानमंत्र, खुलासा करत म्हणाली…

लहानपणी शरद पोंक्षेंचं मन काही केल्या अभ्यासात रमेना…शेवटी त्यांनी डिझेल मॅकेनिकचा कोर्स करण्याकडे मोर्चा वळवला. परीक्षा यशस्वीरित्या पास होऊन ते नोकरी करू लागले. त्याकाळात चार मॅकेनिकला मिळून एका बेस्ट बसची देखभाल करण्यास सांगितलं जायचं. इतर सहकाऱ्यांबरोबर जुळवून घेऊन ते नोकरी आणि नाटक याचा उत्तम मेळ साधायचे. सहकाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी अनेकदा शरद पोंक्षेंनी त्यांना नाटकं दाखवली, दुपारी जेवताना ते न चुकता ७ रुपयांचं श्रीखंड घेऊन जायचे. आता त्याकाळी ७ रुपये म्हणजे थोडेथोडके नव्हते. पण, या ७ रुपयांच्या श्रीखंडाच्या बदल्यात शरद पोंक्षेंना डबल डेकरमध्ये विश्रांती मिळू लागली. नाटकामुळे त्यांचं रोज जागरण व्हायचं अशावेळी सकाळी कामावर काम करणं अनेकदा त्यांना शक्य व्हायचं. अशावेळी त्यांचे इतर सहकारी त्यांच्या वाट्याचं सगळं काम करायचे. बेस्ट कर्मचारी ऑनड्युटी असताना झोपतोय हा खरंतर कायद्याने गुन्हा होता परंतु, एके दिवशी वरिष्ठांच्या कोर्टात पोंक्षेंना उभं केल्यावर त्यांनी प्रांजळपणे घडलेला सगळा प्रकार सांगितला. बेस्टमध्ये एक-एक दिवस सरत होता पण, आयुष्यात टर्निंग पॉंईंट देणारी साजेशी भूमिका त्यांना मिळाली नव्हती.

पुढे, ६ मार्च १९९८ हा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस ठरला कारण, नथुराम नाटकामधील विविध भूमिकांसाठी ऑडिशन घेतल्या जात होत्या आणि त्यांच्या जवळच्या मित्राने त्यांचं नाव या ऑडिशनसाठी सुचवलं. नाटकाचं दिग्दर्शन तेव्हा विनय आपटे यांनी केलं होतं. ‘विनय आपटे म्हणजे नारळासारखा माणूस वरून कडक पण, आतून तेवढाचं मऊ’ त्यांचं असं वर्णन शरद पोंक्षेंनी ‘मी आणि नथूराम’ या पुस्तकात केलं आहे.

हेही वाचा : फक्त ९९ रुपयात थिएटरमध्ये पाहता येणार सिनेमा, राष्ट्रीय चित्रपट दिन म्हणजे काय? तो का साजरा केला जातो? जाणून घ्या

‘मी नथुराम…’ या नाटकाच्या ऑडिशन गेल्यावर विनय आपटेंनी शरद पोंक्षेंना थोडावेळ बसवलं आणि त्यानंतर वाचन सुरू करण्यास सांगितलं. शरद पोंक्षेंचा भारदस्त आवाज, वाचनाची लकब, त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व पाहून त वरून ताकभात ओळखणाऱ्या विनय आपटेंना नथुरामच्या भूमिकेसाठी योग्य नायक मिळाल्याची जाणीव मनोमन झाली होती. पण, शरद पोंक्षे यांनी ऑडिशन देण्यापूर्वी मंगेश भिडे आणि प्रसाद ओक या दोन कलाकारांची नावं नथुरामच्या भूमिकेसाठी चर्चेत होती. शरद पोंक्षेंचं प्रभावी वाचन ऐकून प्रसाद ओकने तेव्हा स्वत:हून माघार घेतली होती. शेवटी नथुराम कोण साकारणार? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्कंठा निर्माण झाली असताना, आठ ते दहा दिवसांनी नथुरामच्या भूमिकेसाठी शरद पोंक्षे यांचं नाव जाहीर करण्यात आलं.

शरद पोंक्षे विनय आपटेंबद्दल सांगतात, “मी विनय आपटेंचा आयुष्यभर ऋणी आहे, ते ऋण मी कधीच विसणार नाही, फेडू शकणार नाही. कुठलीही ओळख नसताना, माझं कोणतंही काम पाहिलेलं नसताना, त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला.” १९८८ पासून जवळपास १० वर्ष सेन्सॉरच्या कात्रीत सापडलेल्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १९९८ मध्ये पार पाडला आणि नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे शरद पोंक्षेंचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं.

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाबरोबरच शरद पोंक्षेंनी मराठी मालिका विश्वातही आपला दबदबा निर्माण केला होता. ‘दामिनी’ ही त्यांची पहिली मालिका. यात त्यांनी साधा, सरळ आणि सज्जन अशा उदय कारखानीसचं पात्र साकारलं. मालिकेच्या जवळपास १ हजार ४०० भागांपर्यंत त्यांनी हे पात्र रंगवलं. पण, छोट्या पडद्यावर खऱ्या अर्थाने शरद पोंक्षे नावाचं वादळ देवराम खंडागळेच्या रुपात धडकलं. २००३ मध्ये त्यांनी वादळवाटमध्ये एन्ट्री घेतली. मालिकेत जवळपास ६० ते ७० भागांनंतर आलेला देवराम खलनायक असूनही अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या भूमिकेसाठी शरद पोंक्षे यांना सलग तीन वर्ष ‘उत्कृष्ट खलनायका’चा पुरस्कार मिळाला होता. देवराममुळे त्यांना अनेक वर्ष खलनायकाच्या भूमिकांसाठी ऑफर्स येऊ लागल्या. देवरामच्या साथीने ‘कुंकू’ मालिकेमधील परशुरामदेखील विशेष लक्षात राहतो.

‘वादळवाट’, ‘कुंकू’, ‘भैरोबा’च्या यशानंतर शरद पोक्षेंच्या वाट्याला छोट्या पडद्यावर अजरामर ठरलेली ‘अग्निहोत्र’ ही मालिका आली. या मालिकेमुळे अनेक नवोदित कलाकार घडले. खऱ्या आयुष्यात त्यांच्या आक्रमक स्वभावाविरूद्ध असलेला कोकणातील घाबरट ‘महादेव’ पोक्षेंनी अगदी सहज साकारला. याशिवाय आजच्या तरूणपिढीशी संलग्न असणाऱ्या ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत त्यांनी काम केलं. शरद पोंक्षे यांनी साकारलेली कठोर पण, लेकीसाठी मन मोठं करणाऱ्या बापाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिल यात काहीच शंका नाही.

शरद पोंक्षे एकीकडे मालिका विश्व गाजवत होते, तर दुसरीकडे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचा प्रवास अविरतपणे सुरू होता. अर्थात हा प्रवास सोपा अजिबातचं नव्हता. ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकात नाटकाच्या दौऱ्यादरम्यान आलेल्या अनेक थरारक अनुभवांचं वर्णन शरद पोंक्षे यांनी केलं आहे. सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही प्रयोगादरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण व्हायचा. हे अनुभव सांगताना शरद पोंक्षे लिहितात, “सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाल्यावर १० जुलै १९९८ पासून आमच्या नाटकाचे प्रयोग सुरु झाले आणि कोणीही विचार करू शकणार नाही असे अनुभव आम्हाला येऊ लागले. एखाद्या नटाने या नाट्यसृष्टीत ४० ते ५० वर्ष काम केल्यावर त्याला जे अनुभव येतात ते सगळे अनुभव मला या एकाच भूमिकेने दिले. पेट्रोल बॉम्ब टाकून जाळण्यापासून ते आमच्या नाटकाची संपूर्ण बस जाळण्यापर्यंत सगळं काही मी पाहिलं. एवढंच नव्हेतर एके दिवशी चंद्रपुरात रात्री ९.३० च्या प्रयोगाला रंगमंचावर नाटक सुरु असताना कॉंग्रेसचे १०० ते १५० लोक एकदम धडाधड वर आले आणि त्या लोकांनी मला घेराव घातला. विंगेत उभे असलेले पोलीस घडला प्रकार शांतपणे बघत होते. शेवटी मी ओळखीच्या डीएसपींना फोन केल्यावर या लोकांना बाहेर काढण्यात आलं. रात्री ९.३० ला सुरू झालेला प्रयोग पहाटे ४ वाजता संपला…एवढा दंगा सुरू असताना एकही प्रेक्षक जागेवरून उठला नाही हे विशेष!”

प्रयोगादरम्यान रसिकांकडून मिळालेल्या अफाट प्रेमाबद्दल शरद पोंक्षे सांगतात, “एका बाईने प्रयोग झाल्यावर कोरा चेक आणून दिला होता. याशिवाय एकदा पुण्यात प्रयोग सुरू असताना एका माणसाने मला १० रुपयांची नोट आणून दिली होती. मला म्हणाला, ही नोट खास तुमच्यासाठी….सुरूवातीला मला कळालं नाही. पण, ती नोट व्यवस्थित पाहिली असता त्यावर १३-१०-१९६६ हा माझ्या जन्मतारखेचा क्रमांक होता.” शरद पोंक्षेंकडे आजही ती लॅमिनेट केलेली १० रुपयांची नोट आहे. कालांतराने २०१६ रोजी शरद पोंक्षे लिखित ‘हे राम नथुराम’ हे नाटक नव्या रुपात रंगभूमीवर आलं. १९९८ ते २०१८ असे २० वर्ष ११०० प्रयोग करून शरद पोंक्षे यांनी या नाटकाचे प्रयोग बंद केले. अलीकडे हे नाटक फक्त ५० प्रयोगांसाठी पुन्हा रंगभूमीवर आलं आहे. नथुराम गोडसे हे नाटक जिथे संपलं, तिथे रंगभूमीवरचं एक वादळं संपलं आणि शरद पोंक्षे यांच्या खऱ्या आयुष्यात दुसऱ्या वादळाची सुरूवात झाली. हे दुसरं वादळ म्हणजे कॅन्सर.

हेही वाचा : Video: अविनाश नारकरांच्या ‘या’ डायलॉगने वेधलं सगळ्यांचं लक्ष; पालक अन् मुलांविषयी म्हणाले….

कर्करोगाचं निदान झाल्यावर शरद पोंक्षे यांनी कोणालाही कल्पना न देता यावर उपचार घेतले. कारण, त्यांना कोणाचीही सहानुभूती नको होती असं त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितलं. जवळपास सहा महिने औषधोपचार आणि किमो थेरपी घेतल्यानंतर ते जुलै २०१९ मध्ये ठणठणीत बरे झाले. कर्करोगाची सावली पडलेल्या शरद पोंक्षेंनी २०१९ मध्ये ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन केलं. नाटकात पुनरागमन केल्यावर वीर सावरकरांच्या विचारांमुळे मी कर्करोगावर मात करू शकलो असं शरद पोंक्षे यांनी सांगितल होतं.

वीर सावरकरांच्या विचारांचा फार पूर्वीपासून शरद पोंक्षेंवर प्रचंड प्रभाव आहे. “मी जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा आदर्श किंवा त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचं आकलन केलं असेल तर ते आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर.” असं अभिनेते आवर्जून सांगतात. परखड विचारांमुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. पण, या ट्रोलर्सला ते कधीच गांभीर्याने घेत नाहीत. याविषयी ते सांगतात, “ज्याची लायकी नाही, ज्याने दोन ओळी कधी आयुष्यात वाचल्या नाहीत तो उठतो आणि ट्रोल करतो. खोट्या नावांनी अकाउंट्स उघडतात. या सगळ्याचा गोष्टींचा सामना मी नथुराम नाटक करताना केला आहे. लोकं घाणं घाणं बोलायचे, शिव्या शाप द्यायचे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत मी केवळ माझ्या कामावर प्रेम केलं.”

आयुष्यात असंख्य संकटं उभी राहिली तरी ते डगमगले नाहीत. गंभीर आजाराला हरवत खऱ्या आयुष्याच्या शर्यतीत ते जिंकले. कर्करोगमुक्त झाल्यावर त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात अन्नांची भूमिका साकारली. इतिहासातील नथुराम, ‘दामिनी’मधील सज्जन उदय, ‘वादळवाट’चा कपटी देवराम असो किंवा ‘बाईपण’मधील खाष्ट अन्ना या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे शरद पोंक्षे नेहमीच हिरोंच्या भाऊगर्दीत ‘अभिनेते’ आणि ‘नट’ म्हणून उठून दिसतात.