अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरदेखील तो सक्रिय असतो. आता त्याच्या आई सीमा चांदेकर यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय का घेतला, याबाबत वक्तव्य केले आहे.

काय म्हणाल्या सीमा चांदेकर?

सीमा चांदेकर यांनी ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत, मुलं मोठी झाली, सगळं झालं आहे. मग ५७ व्या तुम्हाला का वाटलं की, दुसरं लग्न करावं. त्यावर बोलताना त्यांनी म्हटले, “हा निर्णय घ्यायलादेखील मला खूप वर्षं लागली आणि असं नाहीये की, मुलं सेटल झाली, त्यांचं सगळं झालं आहे. ती माझ्याबरोबर होतीच. त्यामुळे मला एकटेपणा वाटण्याचं काही कारण नव्हतं. तीन वर्षांपूर्वी माझा अपघात झाला, त्यावेळी माझ्या उजव्या हातात प्लेट होती आणि मी कुठेही जाऊ शकत नव्हते. फोन, व्हिडीओ कॉल चालू होते. वेळ मिळाला की, सिद्धार्थ, सुमेधा सगळे येऊन भेटत होते. या वयात लग्न करण्याची काय आवश्यकता आहे, असं म्हटलं जातं. पण मला वाटतं बाकीच्या कुठल्या गरजांसाठी आपण लग्न करीत नाही.”

पुढे त्यांनी, “अपघात झाल्यानंतर मला कुठेतरी एकटेपणा जाणवला. मला आता सांगायचं आहे की, माझी बाई आज कामावर आली नाही, मला असा असा त्रास झाला, तर या गोष्टी मी सिद्धार्थला फोनवर नाही ना सांगू शकत. कुठल्याही गोष्टी अरे, आज इतकी मजा आली, आज मैत्रिणी आल्या होत्या. मुलं ऐकतात; पण त्यांना वेळ पाहिजे ना. मला ते कुठेतरी हळूहळू जाणवायला लागलं”, असे म्हटले आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: दीड लाखांचा हिरेजडीत सूट घालून केला भन्नाट डान्स; गुणरत्न सदावर्तेंचा हटके अंदाज पाहिलात का?

जेव्हा सीमा चांदेकर यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सिद्धार्थने त्यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी म्हटले होते. याआधी एका मुलाखतीत सीमा चांदेकर यांनी म्हटले, “लोक काय म्हणतील, असे मला वाटायचे; पण सिद्धार्थने मला धीर दिला. मितालीने आम्ही तुझ्याबरोबर कायम आहोत, असे म्हटले होते. या प्रवासात माझी मुले माझ्याबरोबर होती”, असे म्हणत त्यांनी आपल्या मुलांचा कायम पाठिंबा होता, असे म्हटले आहे.

दरम्यान, सीमा चांदेकर यांनी नितीन म्हसवडे यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या या निर्णयाचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. सीमा चांदेकर या ‘जिवलगा’ या मालिकेत दिसल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, यामध्ये सिद्धार्थचीदेखील महत्वाच्या भूमिकेत होता.