अभिनय आणि दिग्दर्शनाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्नेहल तरडे(Snehal Tarde). अभिनेत्री असण्याबरोबरच त्यांनी अध्यात्म, वेद यांचादेखील अभ्यास केला आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, वेदांचा अभ्यास करायला कशी सुरुवात झाली, त्या अधात्माकडे कशा वळल्या आणि कलाकृतीमधून धर्म, संस्कृती दाखविण्याबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे.

स्नेहल तरडेंनी नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत भारतीय संस्कृतीचा तुम्ही वेगळ्या पद्धतीने अभ्यास करता, तो नक्की काय आहे? यावर उत्तर देताना स्नेहल तरडेंनी म्हटले, “हे सांगण्याआधी मी अभ्यासाची सुरुवात कशी झाली, हे मला सांगायला आवडेल. सगळ्यांना माहीत आहे की, आम्हाला जेव्हा बाळ झालं तेव्हा काही वर्षं मी ब्रेक घेतला होता. प्रवीण हे अत्यंत अभिमानानं सांगतो की, तिनं ब्रेक घेतला होता आणि ती परत काम करीत आहे. याची जाणीव त्याला आहे हे मला नेहमी जाणवतं. तर हा ब्रेक घेण्याचा निर्णय माझा होता; मात्र तरीही हा निर्णय घेणं आणि त्यावर ठाम राहणं कठीण होतं.”

“याचं कुठेतरी दु:ख व्हायचं…”

“ज्यांच्याबरोबर मी एकांकिकेत काम करायचे, त्या मुलींना मी स्पर्धेत असताना कधी बक्षीस घेऊ नाही दिलं आणि त्या मुली आता मोठमोठे प्रोजेक्ट, फिल्म करीत आहेत आणि आपण घरी बसलो आहे. याचं कुठेतरी दु:ख व्हायचं. वय निघून चाललंय, याची जाणीव असायची. मला त्रास व्हायचा. प्रवीणसुद्धा त्यावेळी संघर्ष करीत होता. तो घरी नसायचा. हा निर्णय तर आपण घेतलेला आहे; पण मी हे सांगू कोणाला की, मला हे दु:ख होतंय, काय करू मी त्या दु:खाचं? या प्रश्नातून मिळालेला मार्ग म्हणजे अध्यात्म”, असे स्नेहल तरडे यांनी म्हटले आहे.

या मुलाखतीत स्नेहल तरडेंनी म्हटले, “हल्लीच्या मुलांमध्ये शांतता नाही. कारण- ते त्यांच्या मूळांना धरून नाहीयेत. ते मूळांना धरून नाहीयेत. याचं कारण त्यांचे पालक मूळांना धरून नाहीयेत. काही पालक असतीलही. पण, आजच्या जगण्याला अध्यात्म, वेद हे संबंधित कसे असेल, याचा अभ्यास पालकांचा नाहीये. याला पालकही दोषी नाहीयेत. इंग्रजांनी व्यवस्थाच तशी उखडून ठेवली आहे.”

त्यांनी ही बाब अधिक स्पष्ट करून सांगताना म्हटले, “भारतीय संस्कृतीला समांतर अनेक संस्कृती होत्या अस्तित्वात, त्या हळूहळू सगळ्या लयाला गेल्या; पण भारतीय संस्कृती अजूनही जिवंत आहे. ती जिवंत आहे म्हणजे ती श्रेष्ठ आहे. सगळ्या कालानुरूप तिनं स्वत:ला सिद्ध केलेलं आहे. ती आधीपासून होती, ती सनातन होती. जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत ही संस्कृती राहील. इतकं श्रेष्ठत्व तिच्यात आहे. मग हे असं श्रेष्ठत्व मूळापासून नष्ट करा या विचाराने या संस्कृतीपासून अनेक पिढ्या तोडल्या गेल्या. अनेक तुकडे झाले हिंदू धर्माचे. हिंदू धर्म हा शब्द मी वापरतेय. खरं तर आपल्या धर्माचं नाव सनातन आहे. हा शब्दही नकळतपणे निघून गेला आहे.”

हेही वाचा: “मी जिवंत आहे”, निधनाची अफवा पसरल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची पोस्ट, म्हणाल्या…

आता आपण हे वेगळेपण साजरं करायला शिकलं पाहिजे

“आपल्याला वेगवेगळ्या जातींमध्ये हे धोरणात्मकरीत्या तोडलं गेलेलं आहे. त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण झाला आहे. माझी अत्यंत मनापासून इच्छा आहे की, हिंदू धर्मात प्रत्येक जातीने एक व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये वेगळेपण आहे. दैनंदिन जगण्यात वेगळेपणा हा निश्चित आहे. पण, आता आपण हे वेगळेपण साजरं करायला शिकलं पाहिजे. ते वेगळेपण धरून त्यात भांडणं केली नाही पाहिजेत. तू वेगळा आणि मी वेगळा म्हणून भांडण केलं नाही पाहिजे. तर तुझं वेगळेपण आणि माझं वेगळेपण आपण मिळून साजरं केलं पाहिजे. तर, हिंदू धर्म टिकून राहील आणि तो पुढे जाईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

“धर्म, संस्कृती आणि त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करीन”

चित्रपटाच्या माध्यमातून या सगळ्या तुमच्या ज्ञानाचा, धर्माचा, संस्कृतीचा तुम्ही त्यात काही विचार मांडता का? यावर उत्तर देताना स्नेहल तरडे यांनी म्हटले, “दिग्दर्शिका म्हणून ही माझी सुरुवात आहे. पण इथून पुढे जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल, त्या प्रत्येक संधीमध्ये, चित्रपटामध्ये माझा धर्म, संस्कृती आणि त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन. मी माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे मी माझ्या कलाकृतीमधून दाखवणार आणि अत्यंत अभिमानाने दाखवणार. आपली संस्कृती कशी श्रेष्ठ आहे आणि आपणच त्याची कशी वाट लावलेली आहे. म्हणून त्याचं श्रेष्ठत्व कमी होत नाही, हे मी दाखवत राहणार. जिथे मला संधी मिळेल तिथे मी हे करणार.”

दरम्यान, स्नेहल तरडे यांनी दिग्दर्शित केलेला फुलंवती हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.