अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेही अनेकदा चर्चेत असते. आता तिने मराठी मनोरंजन सृष्टीतील गटबाजीबद्दल भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी सिनेसृष्टीत काही कलाकार एकाच दिग्दर्शकाचे चित्रपट वारंवार करताना दिसतात. संजय जाधव यांचा चित्रपट असेल तर ते अमुक कलाकारांनाच कास्ट करणार, महेश कोठारे यांच्या चित्रपटात काही ठराविक कलाकार दिसणार असा प्रेक्षकांचा समज आहे. त्यामुळे खरोखरच मराठी सिनेसृष्टीत तशी गटबाजी आहे का? हे तेजस्विनीने तिच्या निरीक्षणातून सांगितलं आहे.

आणखी वाचा : सई ताम्हणकरचा खोलीइतका मोठा वॉर्डरोब पाहिलात का? फोटो पाहून व्हाल थक्क

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी कधी कोणाच्या गटात नव्हतेच. लोक उगाच म्हणतात की मी संजय जाधव यांच्या गटात आहे. पण सईने संजय दादाकडे माझ्यापेक्षा जास्त काम केलं आहे. मी ऑफस्क्रीन संजय दादाची खूप चांगली मैत्रीण आहे. पण मी त्याच्याबरोबर फक्त ‘तू ही रे’ आणि ‘येरे येरे पैसा’ हे दोनच चित्रपट केले आहेत. बाकी मी त्याच्याबरोबर काम केलेलं नाही. त्यामुळे मला माहीत नाही की नक्की गटबाजी कशामुळे म्हटली जाते.”

पुढे ती म्हणाली, “त्याला आपण गटबाजीपेक्षा एक वेगळा शब्द देऊया तो म्हणजे कम्फर्ट लेव्हल. जर एखादा दिग्दर्शक एखाद्या कलाकाराला वारंवार त्याच्या चित्रपटात कास्ट करतो तर त्या दिग्दर्शकाला हे माहीत असतं की हा कलाकार आपलं ऐकेल, आपल्याला ऑफसेट त्रास देणार नाही, तो उत्तम कलाकार आहे, आर्थिक दृष्टीने परवडणारा आहे आणि बॉक्स ऑफिसवरही त्याचं नाव आहे. या सगळ्या गोष्टी जर एखादा दिग्दर्शक कलाकारांना कास्ट करताना विचारात घेत असेल तर का कोण जाणे त्याला गटबाजी म्हटली जाते. माझ्या दृष्टीने हा कम्फर्ट लेव्हल आहे. म्हणून ती कास्ट रिपीट झालेली असते.”

हेही वाचा : “सहा महिने एकत्र राहतो आणि सहा महिने वेगळं, कारण…,” आईबरोबरच्या नात्याबद्दल सई ताम्हणकरचा मोठा खुलासा

शेवटी ती म्हणाली, “त्यानंतर जर प्रेक्षकांनाच असं वाटायला लागलं की आता आम्हाला चित्रपटांमध्ये हे त्रिकूट बघायचं नाहीये ते मलाही कळत गेलं, संजय दादालाही ते कळत गेलं आणि त्याने चित्रपटात वेगळ्या कलाकारांना कास्ट केलं आणि तो वेगळ्या कलाकारांबरोबर काम करायला लागला. काम करण्याच्या दोन पद्धती असतात एकतर लोकांना कसं वाटतंय त्याप्रमाणे मी काम करायचं किंवा मला जसं हवंय, मला जे वाटतं त्याप्रमाणे मी काम करायचं. त्यामुळे तुम्ही तुमचे मार्ग निवडून त्याप्रमाणे काम करायचं असतं.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejaswini pandit expresses her views about groupism in marathi film industry rnv
Show comments