‘शिवाजी जन्माला यावा, पण शेजारच्या घरात…’ असं खूपदा म्हटलं जातं. याचं कारण शिवाजीमहाराज कितीही पराक्रमी असले, त्यांना भरपूर नावलौकिक मिळाला, त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, तरी त्यांच्या असण्याने त्या घराला जे भोगावं लागतं, त्या घरातल्यांची जी ससेहोलपट होते ती कुणालाच नको असते. ती असह्य असते. म्हणूनच मोठ्या महापुरुषांचे गोडवे गायले जातात, पण त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या कार्यापोटी काय काय भोगलं, त्यांच्या घरादाराची काय राखरांगोळी झाली याबद्दल लोकांना फारशी कल्पना नसते. त्यांच्या बायका-मुलांचे काय हाल झाले हे फारसं उजेडात येत नाही. गांधीजींचे चिरंजीव हरीलाल यांनी आपल्या वडिलांबद्दल जो राग व्यक्त केला, तो पाहता अशा महापुरुषांच्या घरातील गृहछिद्रं उघड होतात. अशा अनेक महापुरुषांच्या कुटुंबांच्या दर्दनाक कहाण्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. त्या महापुरुषांचं कर्तृत्व सर्वांमुखी असतं, पण त्यांच्या कुटुंबीयांचं पुढे काय झालं, त्यांना कोणकोणत्या संकटांतून जावं लागलं हे अज्ञातच राहतं. गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्याबद्दल तरी बरंच साहित्य उपलब्ध आहे. पण सावरकर कुटुंबीय, बयो कर्वे, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मात्र तितकीशी माहिती उपलब्ध नाही. त्यांनी घरातल्या कर्त्या पुरुषांच्या राष्ट्रकार्यात कशा प्रकारे त्यांना साथ दिली, काय हालअपेष्टा सोसल्या, संकटांचा कसा सामना केला… वगैरे गोष्टी फारच अत्यल्प लोकांपर्यंत पोहोचल्यात. त्यांच्याप्रति समाजाची कृतज्ञता कधीच व्यक्त झाली नाही. ‘नाही चिरा, नाही पणती’ अशीच त्यांची अवस्था झालेली दिसते.

या सामाजिक औदासीन्याबद्दल कुणीतरी आवाज उठवायला हवा. पण आपली स्मृती इतकी तकलादू, की त्याबद्दलही कुणाला काही वाटत नाही. अपर्णा चोथे या तरुण, संवेदनशील कलावतीस ही गोष्ट खूपच खटकत होती. त्यात सावरकर कुटुंबीयांबद्दल काही गोष्टी त्यांच्या वाचनात आल्या. आणि त्यांचं कुतूहल चाळवलं. सावरकर बंधूंनी क्रांतिकार्यात केलेलं योगदान सर्वश्रुत आहे. पण त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी काय काय सोसलं हे कालौघात कुणापर्यंत पोहोचलंच नाही. ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करावं असं अपर्णा चोथे यांनी ठरवलं. त्यासाठी तिन्ही सावरकर बंधूंच्या पत्नींचं आयुष्य नाटकाद्वारे लोकांसमोर मांडावं असं योजलं. त्यातूनच त्यांनी ‘त्या तिघी’ या एकपात्री प्रयोगाचा घाट घातला.

हेही वाचा >>> आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुचित्रपट महोत्सव गोव्यात

गणेश तथा बाबाराव सावरकर यांच्या पत्नी यशोदा, विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई आणि डॉ. नारायण सावरकर यांच्या पत्नी शांताबाई सावरकर या तिघी जणींच्या आयुष्याचा आलेख त्यांनी या प्रयोगात मांडलाय.

तिघी तीन भिन्न पार्श्वभूमीतून आलेल्या. त्यांच्यावरील संस्कार, त्यांचं जगणं भिन्न. पण भारतीय पतिव्रता नारीचं जगणं त्यांनी बुद्ध्याच स्वीकारलं. तिघींपैकी यशोदा तथा येसूवहिनी प्रथम सावरकर कुटुंबात लग्न होऊन आल्या. अतिशय धीरोदात्त, करारी, पण तितक्याच सोशीक. त्यांनी योगी बनू इच्छिणारे आणि पुढे प्लेगच्या साथीत सापडलेल्या बाबारावांना अथक कष्टांनी वाचवलं. धाकट्या दिरांच्या शालेय शिक्षणासाठी प्रसंगी दागिनेही मोडले. दोन अपत्यांचा वियोग सहन केला. बाबाराव क्रांतिकार्यात मग्न. त्यांच्या तुरुंगवासात त्यांनी घरदार सांभाळलं. वनवास, हालअपेष्टा पत्करल्या. पण त्या मागे हटल्या नाहीत. शेवटी पतीची गाठ न पडताच त्यांनी ईहलोकीची यात्रा संपवली.

यमुनाबाई सावरकर श्रीमंत घराण्यातील. पण विनायकरावांशी विवाह होऊन सावरकरांच्या घरात आल्यावर थोरल्या जाऊबाईंच्या मार्गदर्शनाखाली संसार करू लागल्या. विनायकरावांचं शिक्षण एकीकडे सुरू होतं आणि अभिनव भारतमधून क्रांतिकार्यही. पुढे विलायतेला शिक्षण घेण्यासाठी ते निघाले तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. आता उज्ज्वल भविष्याची स्वप्नं त्यांना पडू लागली होती. दरम्यान प्रभाकरचा जन्म झाला होता. सुख ओसंडून वाहत होतं. पण तिथे विलायतेेत आपल्या यजमानांनी क्रांतिकार्याचं रण छेडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि त्यांच्या भवितव्यावर काजळी धरली. पाठोपाठ ब्रिटिश सरकारची वक्र नजर सावरकर कुटुंबावर पडली आणि झडत्या आणि जप्तीसत्र सुरू झालं. राहत्या घराला सरकारने टाळे ठोकलं. रस्त्यावर येण्याची नौबत आली. प्रभाकरच्या अपमृत्यूने यमुनाबाई खचल्या. तशात सावरकरांना पकडून हिंदुस्थानात आणलं जात असल्याची खबर आली. मार्सेलिस बंदरात बोटीतून उडी मारल्यानंतर तर ब्रिटिशांनी कडेकोट बंदोबस्तात त्यांना हिंदुस्थानात आणलं. डोंगरीच्या तुरुंगात त्यांची आणि यमुनाबाईंची भेट झाली. खरं तर दृष्टीभेटच. पण तिथंही सावरकर त्यांना आपल्या जीवनाचं तत्त्वज्ञान ऐकवतात. त्यांना पन्नास वर्षांची अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात येते. याचा अर्थ त्यांच्याशी पुन्हा गाठभेट होणं शक्यच नाही. सावरकर कुटुंबाचं आयुष्य अंध:कारमय होतं. पतीविरह, सरकारी रोष, भवितव्याची चिंता, आर्थिक विवंचना या सगळ्याने सर्व घरच उद्ध्वस्त होतं. तरीही त्याग, समर्पण वृत्ती, धैर्य, सहनशीलता यांच्या आधारे तिघी जावा एकमेकींना सांभाळत मार्गक्रमणा करतात. ‘आत्मनिष्ठ युवती संघा’च्या मार्फत आपल्या पतींचं कार्य पुढे नेतात. डॉ. नारायण सावरकरांच्या विवाहाने तिसरी जाऊ शांता त्या घरात येते. आपलं दु:ख बाजूला सारून मोठ्या दोघी जावा तिचं स्वागत करतात. तीही त्यांच्यात एकजीव होऊन जाते. पुढे सावरकर बंधूंची कारावासातून सुटका होते खरी, पण तोवर येसूवहिनी कालवश झालेल्या असतात. वि. दा. सावरकर पुन्हा नव्याने सामाजिक सुधारणेचे जंग छेडतात.

अपर्णा चोथे यांनी सावरकर कुटुंबातील तिन्ही जावांचं खडतर, कष्टमय आयुष्य एकपात्री रूपात उत्कटतेनं बांधलं आहे. तीन वेगवेगळ्या संस्कारांतून, घरांतून आलेल्या तिघींचं एकमेकींशी एकरूप होणं, प्राप्त परिस्थितीशी झुंज देणं… तेही न डगमगता- हे फारच प्रत्ययकारीतेनं त्यांनी दाखवलं आहे. संकल्पना, संहितालेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा, सादरीकरण, निर्मिती अशा सगळ्या जबाबर्दा या खांद्यावर समर्थपणे सांभाळत त्यांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. आजची पिढी स्वमग्न आहे, व्यक्तिवादी आहे असं म्हटलं जात असताना एका जाज्ज्वल्य क्रांतिकार्यात आयुष्य झोकून दिलेल्या महापुरुषांच्या कुटुंबीयांची त्यातली ससेहोलपट, त्यांची समर्पितता, संकटांना सामोरे जाताना त्यांची होणारी कुतरओढ, त्यांचा त्याग, संयम, धैर्योदात्त वृत्ती लोकांसमोर आणण्याची आच अपर्णा चोथे ही युवती दाखवते तेव्हा नव्या पिढीबद्दलच्या आपल्या आकलनाचा पुनर्विचार करावा लागतो. इतकंच नाही तर त्याला कलात्मक रूप देणंही अपर्णा चोथे यांना तितकंच महत्त्वाचं वाटतं, हे विशेष. या सगळ्यात कुठंही अभिनिवेश नाही, उदात्तीकरण करण्याचा अट्टहास नाही. तीन सर्वसामान्य स्त्रिया परिस्थितीच्या रेट्यात कसकशा बदलत, घडत जातात याचं आरस्पानी दर्शन अपर्णा चोथे यांनी या प्रयोगात घडवलं आहे. आजच्या राजकीय, सामाजिक प्रदूषणात हे असं काही पाहायला मिळणं दुष्करच. त्याबद्दल अपर्णा चोथे यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.

या तिघींचा जीवनपट एका सलग प्रयोगात उभं करण्याची त्यांची मनिषा त्यांनी ताकदीनं पेलली आहे. त्यासाठी प्रयोगाची बांधणी, सादरीकरण, नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा, संगीत आदींचा सखोल विचार त्यांनी केला आहे. तिघीजणींची तीन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं त्यांनी प्रत्येकीच्या वृत्ती-प्रवृत्तीच्या वेगळेपणासह साकारली आहेत. काळा-वेळाचा विचारही त्यात प्रकर्षानं जाणवतो. अजित यशवंत यांचं प्रसंगानुरूप संगीत आणि संकेत पारखे यांच्या प्रकाशयोजनेनं काळाचे संकेत अधोरेखित केले आहेत.

एक दृष्ट लागण्याजोगा प्रयोग पाहिल्याचं समाधान अपर्णा चोथे ह्यत्या तिघीह्णमध्ये आपल्याला नक्कीच देतात.