लोकसभा निवडणूक २०२४चा निकाल ४ जूनला जाहीर झाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. एकूण ४८ मतदारसंघांपैकी भाजपाप्रणित महायुतीला फक्त १७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत. या निकालामुळे महायुतीला धक्का बसला असून भाजप नेते अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसने १६ जागा, शरद पवार गटाने ७ जागा तर ठाकरे गटाने ८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीचा जल्लोष सुरू आहे. महाराष्ट्रातील या विजयानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या गटाचे नेते व अभिनेते किरण माने यांना फोन केला. यासंदर्भात किरण माने यांनी नुकतीच पोस्ट केली आहे.

हेही वाचा – “लाखो लोकांची दिशाभूल…”, अयोध्येतील निकालाबद्दलच्या ‘त्या’ पोस्टवरून भडकला सोनू निगम, म्हणाला…

अभिनेते किरण माने यांनी उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो एक्सवर शेअर करत लिहिलं, “फोन सायलेंटवर होता. सहज हातात घेतला. बघतोय तर पंधरा मिनिटांपूर्वी उद्धवजींचे दोन मिस्ड कॉल्स आले होते. नंतर ‘जय महाराष्ट्र’ असा मेसेज आला. मी कॉलबॅक केला…उद्धवजींनी उचलला. मी काही बोलायच्या आधी त्यांनी बोलायला सुरुवात केली.”

“किरणजी, महाराष्ट्रातल्या विजयात तुमचाही वाटा आहे. तुम्ही जे अफाट कष्ट घेतलेत त्याबद्दल आभार. सोबत राहू कायम.” उद्धवजी बाळासाहेब ठाकरे माझ्याशी खूप काही बोलत होते…माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू…शिवबंधनाचं सार्थक व्हायला सुरुवात झाली…भाग गेला सीण केला । अवघा झाला आनंद – किरण माने”

हेही वाचा – Video: वर्कआऊट करताना धपकन पडली प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, व्हिडीओ होतोय व्हायरल

किरण मानेंच्या या पोस्टवर शिवसैनिकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “शिवबंधन योग्य मनगटावर आहे”, “किरण माने जी तुम्ही सुद्धा नक्कीच यशात वाटेकरी आहात, अभिनंदन तुमचे आणि अशीच ठोकाठोकी चालू ठेवा”, “आपण स्वत:, सुषमाताई अंधारे यांनी खरोखरच खूप कष्ट घेतले”, “अशीच उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत साथ द्या. पहिलं टार्गेट मुंबई महापालिका”, “इतक्यावरच थांबणे नाही, अवघा महाराष्ट्र तुकोबामय करायचा आहे”, अशा प्रतिक्रिया किरण मानेंच्या पोस्टवर उमटल्या आहेत.