नागपूरकर, पुणेकर आणि मुंबईकर अशा राज्यातल्या तीन शहरातल्या माणसांचं यथार्थ वर्णन ज्येष्ठ लेखक पु. ल. देशपांडे यांनी करुन ठेवलं आहे. नागपूरकर वैभवने पुणेमार्गे मुंबई गाठली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज, जाहिराती अशा विविध माध्यमांमध्ये वैभवने समृद्ध मुशाफिरी करत ठसा उमटवला. नागपुरी लहेजा, पुणेकरी वळण आणि मुंबईची सर्वसमावेशकता असं सगळं लेवून वैभव नवनवी शिखरं सर करतो आहे. चॉकलेट बॉय प्रतिमेपल्याड जात विविधांगी काम करण्याचा त्याचा प्रयत्न आवर्जून दिसतो. सौंदर्याच्या साचेबद्ध ठोकताळ्यांना बाजूला सारत वैभवने नवा पायंडा पाडला आहे. अभिनयापल्याड उर्दू भाषेचा अभ्यास, फिटनेस जपणाऱ्या वैभवचा आजवरचा प्रवास जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले, दोघांचा पहिला फोटो समोर; साधेपणाचं चाहते करताहेत कौतुक

मै शायर तो नही…

“तुम मिटा सकते नही दिल से मेरा नाम कभी
फिर किताबोसें मिटाने की जरूरत क्या हैं”

अभिनयाबरोबरचं वैभव उत्तम शायरी सुद्धा करतो. त्याचे शायरीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दहावीत असताना एका हिंदी नाटकासाठी वैभवने उर्दू भाषेचा थोडाफार अभ्यास केला होता. कालांतराने वाचन सुरु केल्यावर त्याला या भाषेबद्दल आवड निर्माण झाली. उच्च शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर वैभवने शायरीची आवड आवर्जून जोपासली. सुरेशचंद्र नाडकर्णी, अमिन शायनी अशा मोठ्या व्यक्तिमत्त्वांकडून अभिनेत्यावर उर्दू भाषेचे संस्कार झाले आणि हळुहळू वैभवचा शायरीवर जम बसला.

वैभवचा जन्म अमरावतीमध्ये झाला. नागपूरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून पुण्यात आल्यावर अभिनेत्याला दोन्हीकडच्या भाषेतील फरक जाणवला. वैभवच्या बोलण्यात पूर्णपणे नागपुरी टच असायचा, तर याउलट पुण्याची मराठी ही शुद्ध होती. अशातच त्याला पुण्यातील ‘फिरोदिया करंडक’ स्पर्धेत मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळाली. या स्पर्धेत तो अभि परांजपे हे भूमिका साकारत होता. वैभव मूळचा नागपूरचा अन् अभि परांजपे हे पात्र सदाशिव पेठेमध्ये राहणारं होतं…दोघांच्या बोलीभाषेत फार मोठी दरी होती. एकिकडे नागपुरी भाषा, तर दुसरीकडे सदाशिव पेठेमधील मराठी या दोन्हीचा मेळ साधणं वैभवला फारचं कठीण जात होतं. नाटकाच्या तालमीला त्याला ‘ळ’चा उच्चार करता येत नव्हता. यावेळी नाटकाच्या लेखिकने “अरे आता सगळ्या वाक्यांमधून मी ‘ळ’ कसा काढू? काही वाक्य फार मार्मिक आहेत, ती बदलता येणार नाहीत.” असं थेट सांगितलं होतं. अशावेळी तोंडात पेन्सिल धरून जीभेचे व्यायाम करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. त्या एका ‘ळ’अक्षरामुळे ऐन नाटकाच्या रंगीत तालमीला वैभव सगळे संवाद विसरला होता. अगदी नशीबाने प्रयोग व्यवस्थित पार पडला आणि त्याच्या कॉलेजला पहिलं बक्षीस मिळालं होतं.

‘पळापळी हा रताळ्याचा खेळ नसून केळ्याचा खेळ आहे.’ हे वाक्य रोज पुन्हा-पुन्हा बोलून, सराव करून आता वैभवला ‘ळ’अक्षर व्यवस्थित उच्चारता येतं. या एका घटनेमुळे आजतागायत वैभव सेटवर त्याच्या संवादांची यादी आधीच मागून घेतो. हा किस्सा त्याने ‘राजश्री मराठी’च्या मुलाखतीत सांगितला होता.

हेही वाचा : करुणेची मात्रा वाढायला हवी! ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये पंकज त्रिपाठींचे प्रतिपादन

मुंबईतील संघर्ष

पुण्यात शिक्षण पूर्ण झाल्यावर वैभव अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मायानगरीत आला. त्याने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत अभिनयाच्या दुनियेला सुरुवात केली. ‘फक्त लढ म्हणा’ या चित्रपटामुळे त्याला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. पण, मुंबईत आल्यावर सुरुवातीला त्याला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता.

पहिल्यांदा मुंबईत आल्यावर वैभव अगदी लहानशा घरात राहायचा. पावसाळ्यात त्या घरात उंदीर यायचे. छतातून पावसाचं पाणी घरात पडायचं या परिस्थितीतही अभिनेता खचला नाही…यातून मार्ग काढत त्याने अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु ठेवला. सुरुवातीला वैभवला मुंबईच्या लोकलचा अजिबातच अनुभव नव्हता. अशावेळी तीन-तीन लोकल सोडून वैभव रेल्वे स्थानकावर असाच उभा राहायचा. पैशांचं पाकिट, मोबाइल चोरी होईल याची भीती त्याच्या मनात असायची. त्यावेळी एका जवळच्या मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने ट्रेनमध्ये चढताना समोर बॅग धरायला सुरुवात केली. मित्रांच्या टिप्सने माझं आयुष्य सावरलं असं वैभव अनेकदा सांगतो.

हेही वाचा : पैशांसाठी नव्हे तर ‘या’ गोष्टीमुळे सोडली ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मालिका; शैलेश लोढांनी प्रथमच दिलं स्पष्टीकरण

शहरातील राहणीमानाविषयी वैभव एका मुलाखतीत सांगतो, “नागपूर, पुणे आणि मुंबई ही तिन्ही शहरं एकमेकांपेक्षा फारच वेगळी आहेत. मुंबईवर माझं प्रचंड प्रेम आहे. पण, अजूनही जेव्हा मी छोट्या शहरांमध्ये शूटिंगला जातो तेव्हा माझ्या मनात जास्त आपुलकीची भावना असते. त्या छोट्या शहरांना मी जास्त कनेक्ट होतो.”

‘अमरप्रेम’, ‘हंटर’, ‘निर्मल पाठक की घर वापसी’ आणि बरंच काही…

`डिस्कव्हर महाराष्ट्र’ या कार्यक्रमामुळे वैभवला एक नवी ओळख मिळाली. २०११ मध्ये त्याला झी मराठी वाहिनीवरील अमरप्रेम मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेमुळे वैभव घराघरांत लोकप्रिय झाला. पुढे सिनेमा आणि मालिका विश्वासह वैभव अनेक जाहिरातींमध्ये झळकला. ‘पिंजरा’ या मालिकेमुळे त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला एक वेगळी कलाटणी मिळाली. भूषण आणि वैभवच्या मैत्रीला याच मालिकेपासून सुरुवात झाली. याचदरम्यान त्याने नव्या रुपात आलेल्या ‘ऑल द बेस्ट’ नाटकात काम केलं होतं. कालांतराने वैभव हिंदी सीरिज आणि चित्रपटांकडे वळू लागला.

२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हंटर’ चित्रपटात वैभव महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या सिनेमातील अभिनयासाठी त्याला उत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून फिल्मफेअर मॅगझिनमध्ये नावाजलं गेलं. याच वर्षाच्या अखेरीस वैभवने आणखी एका बिग बजेट हिंदी सिनेमात काम केलं. तो चित्रपट म्हणजे संजय लीला भन्साळी यांचा ‘बाजीराव मस्तानी’. हिंदी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व असल्याने त्याला अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

बिहारमधील एका लहान शहराची कथा ‘निर्मल पाठक की घर वापसी’ या सीरिजमध्ये मांडण्यात आली होती. या सीरिजमध्ये वैभवने मुख्य अभिनेत्याने भूमिका साकारली होती. मनोरंजनाच्‍या माध्‍यमातून या सीरिजने प्रेक्षकांना वास्‍तविकतेची जाणीव करून दिली. २४ वर्षांचा मुलगा मूळ गावी परतल्यावर त्याचं मूळ अस्तित्व शोधू लागतो. या भूमिकेविषयी सांगताना अभिनेता म्हणतो, “माझ्या खऱ्या आयुष्यात मी निर्मल पाठकसारखा आहे. हे पात्र माझ्या स्वभावाप्रमाणे अत्यंत लाजाळू आणि कमी बोलणारं होतं. त्यामुळे या पात्राशी मी सहज संलग्न होऊ शकलो.”

२०१५ मध्ये थेट रणवीर सिंहच्या लहान भावाची भूमिका

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात वैभवने त्याच्या अभिनयाची एक वेगळी छाप प्रेक्षकांवर पाडली. संजय लीला भन्साळींसारख्या मोठ्या दिग्दर्शकासह काम करणं ही अभिनेत्यासाठी फार मोठी गोष्ट होती. चित्रपटात बाजीराव पेशव्यांचे धाकले बंधू चिमाजी अप्पा यांची भूमिका वैभवने साकारली होती. याबद्दल अभिनेता सांगतो, “ऐतिहासिक भूमिका करणं मला फार अवघड वाटतं. त्यांचे कपडे, पात्र, भाषा काहीच सोपं नसतं…अभिनेत्यावर एक मोठी जबाबदारी असते. एखादी ऐतिहासिक भूमिका अनेकांचं दैवत असतं. त्यामुळे अशा भूमिका फार काळजीपूर्वक कराव्या लागतात.”

वैभवने अभिनय क्षेत्रातील जवळपास १३ वर्षांच्या प्रवासात अनेक चढउतार पाहिले. त्याचे सुरुवातीपासूनचे सगळेच चित्रपट चालले असं नाही परंतु, त्याचं अभिनयावरचं प्रेम, सामाजिक संदेश आणि तरुणाईला रिलेट होतील असे चित्रपट यामुळे एक सच्चा कलावंत म्हणून लोक वैभवला नावाजू लागले. अशा या मराठी कलाविश्वाच्या लाडक्या चॉकलेट बॉय वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav tatwawadi birthday special article his journey from marathi cinema to bollywood sva 00