चार दशकांपेक्षा अधिक काळ मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका या माध्यमांमध्ये अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते म्हणजे विजय चव्हाण. ‘मोरूची मावशी’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांसारख्या नाटकातून विजय चव्हाण यांनी रंगभूमी गाजवली. तसेच त्यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. पण फुफ्फुसाच्या आजाराने २४ ऑगस्ट २०१८ साली त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याआधीच्या शेवटच्या आठवणींना उजाळा पत्नी विभावरी चव्हाण व लेक वरद चव्हाण यांनी दिला. दोघं सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलवरील ‘स्मृतीचित्र’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळेस त्यांनी विजय चव्हाण यांचे शेवटचे दिवस सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मुलाखतीमध्ये विभावरी चव्हाण यांना सूनबाई प्रज्ञाविषयी विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या, “विजय आजारी पडल्यापासून घरामध्ये कळायला लागलं की, आता यांचं आयुष्य कमी आहे. २०१०पासून विजय यांची तब्येत हळूहळू खालावतं होती. पण ते काम जमेल तेवढं करत होते. त्यामुळे आम्ही मुली बघायचं ठरवलं. पण मध्येच वरदकडे काम नसेल तर तो सांगायचा नको हा. माझ्याकडे काही काम नाही. मुलगी वगैरे बघू नकोस. उगीच घरात एखादी मुलगी आणायची आणि काम नाही असं नको.”

हेही वाचा – …म्हणून विजय चव्हाणांच्या पत्नीने सोडलं अभिनय क्षेत्र, विभावरी चव्हाण म्हणाल्या….

पुढे वरद म्हणाला, “२०१६ साली बाबांची प्रकृती गंभीर झाली होती. तेव्हा मी ‘रुंजी’ नावाची मालिका करत होतो. त्यावेळेस मी जव्हारला चित्रीकरण करत होतो. तर डॉक्टरांनी घरच्यांना सांगितलं होतं, बाबा जाणार आहेत. मुलाला बोलवून घ्या. मला केदार शिंदे सर, भरत जाधव सर यांचा फोन येत होता. तेव्हा मी बसमधून प्रवास करत होतो. या लोकांनी मला फोन करून सांगितलं, तू लवकरात लवकर ये. आम्ही निर्मात्यांशी बोलतो. मी आई, आत्या, मावशी यांना फोन केला. तर या सगळ्या म्हणाल्या, बाबा ठीक आहेत. बरं तेव्हा आतासारखे व्हिडीओ कॉल नव्हते. मला दाखवा, तुम्ही खोटं बोलताय, असं पण विचारू शकत नव्हतो. त्यामुळे काही कळतं नव्हतं. तितक्यात निर्मात्यांचा फोन आला. त्यांनी पण सांगितलं, उद्या ये. आपण स्टोरीमध्ये काहीतरी मॅनेज करू.”

“तेव्हा मी सतत आईला फोन करत होतो. बाबा एवढे शुद्धीत नव्हते. प्रतिसाद देत नव्हते. पण माझ्याशी ते तेवढंच बोलले की, चित्रीकरण संपवून ये. मी आहे. बाबांचं हे बोलणं ऐकून मी निर्मात्यांना सांगितलं, मी चित्रीकरण करतोय. बाबांना ते आवडणार नाही. चार दिवसांच ते चित्रीकरण होतं. जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा ते फोर्टिस हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळेस मला कळलं बाबांची स्थिती फारच गंभीर आहे. आधी ते धन्वंतरी नावाच्या हॉस्पिटलमध्ये होते तिथून त्यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. एका हॉस्पिटमधून दुसऱ्या हॉस्पिटमध्ये नेताना त्यांना थोडा त्रास झाला होता.”

“३० ते ४० दिवस बाबा तसेच होते. उपचारामध्ये फार प्रगती दिसत नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं होतं, आठ दिवस जगतील. एकेदिवशी ते शुद्धीत आले. तेव्हा ते आईला म्हणाले, मला वरदचं लग्न बघायचं आहे. जो माणूस ३० ते ४० दिवस काहीही प्रतिसाद देत नव्हता. तो माणूस आठ दिवसांत बाहेर पडला. जेव्हा त्यांनी सांगितलं, मला वरदचं लग्न बघायचं आहे. ज्यावेळी ते घरी परतले तो दिवस होता, ८ फेब्रुवारीचा. यादिवशी माझा आणि बाबांचा दोघांचा वाढदिवस असतो. तो आमच्यात योगायोग झालाय, एकाच दिवशी बापलेकाचा वाढदिवस आहे. त्या दिवशी बाबांनी मला असं गिफ्ट दिलं. मग आम्ही मुलगी बघायला सुरू केलं.”

त्यानंतर विभावरी चव्हाण म्हणाल्या, “ऑनलाइन मुली बघायला सुरुवात केली. प्रज्ञाचा फोटो देखील नव्हता. फक्त आयटीवाली आहे, घोडबंदरला राहते आणि उंची वगैरे लिहिली होती. वरदला थोडी उंचच मुलगी हवी होती. त्यामुळे मग आम्ही फोटो वगैरे काही नव्हती तरी आम्ही फोन केला. तिच्याकडून लगेच होकार आला. कारण तिच्या कुटुंबात ‘१०० डेज’ ही मालिका बघितली जात होती.”

हेही वाचा – निळू फुलेंचं बालपण, शालेय शिक्षण अन् राष्ट्र सेवा दलाशी कसा आला संबंध? जाणून घ्या…

वरद म्हणाला, “‘१०० डेज’ मालिकेत मी हवालदारची भूमिका करत होतो. तेव्हा माझं आडनाव होतं शेलार. तिची आई २०१२ साली बोलून गेली होती, तुला असाच नवरा मिळाला पाहिजे उंच वगैरे. त्यामुळे हा एक योगायोग होता.”

त्यानंतर विभावरी म्हणाल्या, “जेव्हा ती मुलुंडला घरी आली. तेव्हा विजय यांना काय झालं माहित नाही. विजय यांनी गप्पांच्या ओघात थेट प्रज्ञाला सूनबाई म्हणून हाक मारली. मी म्हटलं, थांबा जरा त्यांना दोघांना ठरवू दे. सगळे पाहुणे गेल्यानंतर मी विजय यांना बोलली, तुम्ही अशी कशी हाक मारता. तर मला म्हणाले, आपलं लग्न होऊन इतके वर्ष झाले. मला तुझा चेहरा वाचता येतो. मला कळतं होतं, तू होकार देणार. त्यामुळे मी तुला लगेच विचारलं. पण माझं म्हणणं होतं, सासू-सूनचं पण जुळलं पाहिजे.”

पुढे वरद म्हणाला, “बाबांनी सूनबाई हाक मारल्यानंतर एप्रिलमध्ये आमचा साखरपुडा झाला. १७ डिसेंबर हा लग्नाचा मुहूर्त होता. जून किंवा जुलै महिन्यात प्रज्ञाने बाबांसाठी पोळ्या केल्या. बाबांनी ते जेवण जेवलं. त्यानंतर म्हणाले, ‘चला आता मी जायला मोकळा.’ मग महिन्याभरात बाबा गेले. मी बाबांना अग्नी देताना खूप रडलो. आम्ही आठ वर्षांपासून त्यांची तब्येत खालावताना बघत होतो. आम्हाला ते आवडत नव्हतं. बाबा यातून सुटू दे, असं होतं ना, तसं आमचं झालं होतं. जेव्हा मी बाबांना अग्नी देऊन स्मशानातून बाहेर आलो तेव्हा खूप मोठं ओझ गेल्यासारख वाटलं. हलक-हलक वाटलं. संध्याकाळीपर्यंत मी आणि आई खूप नॉर्मल होतो. कारण बाबाचं असं होतं की, कोणीही माणूस गेल्यानंतर तो जे आयुष्य जगून गेलाय ते सेलिब्रेट करायला हवं. त्यामुळे आम्ही त्यांच्या आठवणी अजूनही सेलिब्रेट करतो.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vibhavari chawan and varad chawan share last memories of vijay chawan pps
Show comments