वसंत सबनीस यांनी लिहिलेलं ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर परतत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत दामले यांच्या फेसबुक पेजवर ६३ हा अंक लिहून एक कोडं प्रसिद्ध केलं जात होतं. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या पोस्ट चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्या ६३ चं कोडं उलगडलं आहे. कारण ६३ प्रयोगांसाठी गेला माधव कुणीकडे हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. प्रशांत दामलेंनी स्वतःच एक व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता “अरे हाय काय नी नाय काय?” या संवादाची धमाल प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे.

‘अरे हाय काय अन् नाय काय’ हा संवाद अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात

‘अरे हाय काय अन् नाय काय’ असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. या दोघांच्या अफलातून टायमिंगवर पब्लिक फुल टू फिदा झालं. या नाटकातील प्रशांत दामले यांचा ‘अरे हाय काय अन् नाय काय’ हा डायलाॅग आजही चांगलाच पाॅप्युलर आहे. सलग एक तपाहून अधिक काळ या नाटकाची लोकप्रियता वाढतच गेली.

१८०२ प्रयोगानंतर नाटकाने घेतला ब्रेक

७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर १८२२ प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने ‘ब्रेक’ घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा शुभारंभ १५ जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी ४.००वा. होणार आहे. तिकीट विक्रीचा शुभारंभ १ जून रोजी फक्त ‘तिकीटलाय’अॅप वर सुरु होईल.

नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतंय याचा मनस्वी आनंद-प्रशांत दामले

रसिकांना हसवण्याचं आपलं कर्तव्य चोख बजावत रंगभूमी हीच कर्मभूमी मानत एकापेक्षा एक सरस नाटकं देणाऱ्या प्रशांत दामले यांनी पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणत रसिकांना मनोरंजनाची अफलातून ट्रीट दिली आहे. काही नाटकांना रसिकांचं अफाट प्रेम लाभतं. ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक त्यापैकीच एक. मायबाप रसिकांसाठी ‘ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणताना अतिशय आनंद होत असल्याचे अभिनेता प्रशांत दामले यांनी सांगितले.

नाटकाची संहिता धमाकेदार

वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाची संहिताच धमाकेदार होती. दोन कलावंत आपापल्या भूमिका घेऊन अभिनयाची जी जुगलबंदी पेश करायचे त्याला तोड नाही. दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल रसिकांना हास्याची मेजवानी देणारी असायची. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रकाश योजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत.

हे पण वाचा- नव्या कलाकारांच्या संचात येत आहे ‘नकळत सारे घडले’, आनंद इंगळे ‘बटूमामां’च्या भूमिकेत

अशोक सराफांसाठी लिहिलं गेलं होतं नाटक

गेला माधव कुणीकडे हे नाटक अशोक सराफ यांना समोर ठेवून लिहिण्यात आलं होतं. मात्र हे नाटक करण्यासाठी जो वेळ हवा तो त्या काळात अशोक सराफ यांच्याकडे नव्हता. त्यानंतर हे नाटक प्रशांत दामलेंकडे आलं आणि त्यांनी नाटकातली माधवची भूमिका ज्या प्रकारे केली आहे ती पाहून प्रेक्षक आनंदी होतात. या नाटकाचे बरेच किस्सेही प्रशांत दामलेंनी सांगितले आहेत.

प्रशांत दामले १२ हजार ५०० प्रयोगांचा टप्पा ओलांडला तेव्हा विनय येडेकर आणि प्रशांत दामले या दोघांनीही या नाटकाच्या आठवणी सांगितल्या आहेत. आता हेच खास नाटक ६३ प्रयोगांसाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. प्रशांत दामलेंना ‘माधव’च्या भूमिकेत पाहण्याची पर्वणी रसिकांना पुन्हा अनुभवता येणार आहे.