चॅनेलवरील एका शोचा अ‍ॅन्कर शेखर याच्या कार्यक्रमाचा टीआरपी उत्तम असूनही आणि तो स्वत:ही त्या शोमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असूनदेखील मनोरंजन जगतातील अ‍ॅवार्ड फंक्शनमध्ये मात्र गेली दोन वर्षे पुरस्कारावर आपली मोहोर उमटत नसल्याने तो वैफल्यग्रस्त आहे. यंदाही त्याचं पुरस्कारासाठी नामांकन झालंय. फंक्शनला जाण्यासाठी तो निघायच्या तयारीत आहे. पण त्याची पत्नी कांचन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनुराधा बर्वेकडे गेलीय. तिच्यावर मानसोपचार सुरू आहेत. कारण  ती नैराश्याने ग्रासली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, त्यांच्या शेजारी राहणारी नेहा ही तरुणी शेखरच्या घरी आलीय. तिच्याशी त्याचे संबंध आहेत. ती त्याची जबरदस्त फॅन आहे. त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला ती तयार आहे.

..आणि अचानक कांचन घरी येते. नेहाला तिथे पाहून तिचं माथं सणकतं. शेखरचे हे धंदे तिला माहीत असले तरी आपल्या परोक्ष तो ते करत असल्यानं ती थयथयाट करण्याखेरीज काही करू शकत नसते. परंतु आता प्रत्यक्षच त्याला नेहाबरोबर रंगेहात पकडल्याने ती भयंकर संतापते. त्याच्यावर चांगलंच तोंडसुख घेते. तो नेहाशी आपले ‘तसले’ संबंध असल्याचा साफ इन्कार करतो. ‘ती अ‍ॅवार्ड फंक् शनसाठी मला शुभेच्छा द्यायला आली होती. बस्स!’ असा खुलासा करतो. पण त्यावर कांचनचा विश्वास बसणं शक्यच नसतं. ती सगळं घर डोक्यावर घेते. तोही चिडतो. ‘तू पिऊन आणि अकारण संशयाचं पिशाच्च डोक्यात घेऊन नको तो तमाशा करत्येयस,’ असं म्हणून तिलाच  फैलावर घेतो. तीही एकेकाळी टीव्ही अभिनेत्री होती. त्याच्यासारखीच लोकप्रियता तिनं अनुभवली होती. परंतु आता तिच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागल्याने तिला कामं मिळणं कमी झालं होतं. त्यामुळे घरबसल्या कुढत ती शेखरवर त्याचा राग काढत असते. तशात शेखर लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेला तिला पाहवत नाही. त्याचाही तिला त्रास होत असतो. त्यात आणखीन त्याची ही बायकांची ‘प्रकरणं’ तिच्या संतापात अधिकच भर घालत असतात.

तो तिला फंक्शनला येणार आहेस का, म्हणून अखेरचं विचारतो आणि तयारी करायला जातो. तेवढय़ात कुणाचा तरी कॉल येतो. ‘मी सोनिया चव्हाण बोलतेय.. मला वाचवा..’ म्हणून ती रडत विनवणी करत असते. त्या फोनने कांचन घाबरते. तेवढय़ात शेखर येतो. त्याला ती त्या फोनबद्दल सांगते. ‘तुला काहीतरी भ्रम झालाय..’ असं म्हणून तो तिला उडवून लावतो. पण ती त्याला कळकळून सांगते, की खरंच, असा फोन आला होता. यापूर्वीही अनेकदा असे फोन आले होते. मात्र, त्याचा तिच्यावर विश्वास बसत नाही. चार वर्षांपूर्वी आपल्या गाडीची ठोकर बसून मेलेली सोनिया  कशी काय फोन करू शकते? हा कांचनच्याच मनाचा काहीतरी खेळ आहे याबद्दल त्याच्या मनात शंका उरत नाही. तिच्या मनोरुग्णाईत अवस्थेमुळे तिला असे भास होताहेत असं त्याला वाटतं. तो तिची समजून काढून तिला फंक्शनला घेऊन जातो. परंतु ते परत येतात तेव्हा घर अस्ताव्यस्त झालेलं असतं. कुणीतरी चोर घरात घुसले असावेत म्हणून शेखर पोलीस स्टेशनला फोन करतो. परंतु पोलीस येण्यापूर्वीच एक फोन येतो. सोनियाचा. ‘मी तुमचा सूड घेणार आहे..’ अशी धमकी ती देते. आता मात्र शेखरची पाचावर धारण बसते. कुणाला त्या अपघाताबद्दल कसं काय कळलं? कारण कांचन आणि त्याच्याखेरीज कुणालाच त्या अपघाताची माहिती नसते. आणि त्यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांचीही योग्य ती विल्हेवाट लावलेली असते. त्यामुळे पोलिसांना काहीच धागेदोरे न सापडल्याने त्यांनी ती केस बंदही केलेली असते. आणि आता अकस्मात असं कसं काय हे  प्रकरण पुन्हा उपटलं? बहुधा कांचनच मद्याच्या अमलाखाली कुणाकडे तरी याबद्दल बरळली असणार याबद्दल शेखरची खात्री पटते. तो तसा आरोप तिच्यावर करतो. परंतु कांचन तो साफ फेटाळून लावते.

त्यानंतर अशा काही चक्रावणाऱ्या घटना एकापाठोपाठ घडत जातात, की हे प्रकरण नेमकं काय आहे? मेलेली सोनिया पुन्हा कुठून उपटली? कांचन खरोखरच मनोरुग्ण असते का? की शेखरनेच आपल्या गैरकृत्यांवर पांघरून घालण्यासाठी ही चाल खेळलेली असते?.. असे अनेक प्रश्न प्रेक्षकाला पडत जातात. प्रश्नांची गुंतवळ प्रसंगागणिक वाढतच जाते. आणि यातला नेमका कोण अपराधी आहे, हेच कळेनासं होतं. बऱ्याच गुंत्यांनंतर अकस्मात सगळ्याची निरगाठ सुटल्यासारखी वाटते. पण तेही काही खरं नसतं. शेवटपर्यंत या घडामोडींमागचा खरा सूत्रधार कोण, हे प्रेक्षकाला कळतच नाही. आणि जेव्हा कळतं, तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसतो.

सुरेश जयराम हे फार्स आणि रहस्यप्रधान नाटकांचे हुकमी लेखक म्हणून परिचित आहेत. हे त्यांचं आणखीन एक रहस्यमय नाटक. सहसा अशा नाटकांत संशयित व्यक्ती सतत बदलत राहते. आणि जिच्यावर कुणीही संशय घेणार नाही अशी व्यक्ती प्रत्यक्षात गुन्हेगार आहे असं अखेरीस निष्पन्न होतं. यातही तसंच घडतं. परंतु ते आत्यंतिक  गुंगवणाऱ्या गतिमान घटना-प्रसंगांतून प्रेक्षकाला रोलरकोस्टर राइड घडवीत लेखकानं साधलं आहे. नाटकाची रचना गूढकथेसारखी भयचकित करणारी आहे. यातली पात्रं, त्यांचं वागणं-बोलणं, त्यांचा वावर सगळंच रहस्यमय आहे. त्यांचे परस्परसंबंध आणि त्यांतले ताणतणाव यांतून नाटकाला मनोविश्लेषणाचीही जोड मिळते.

दिग्दर्शक मंगेश कदम यांनी रंजनप्रधान नाटकांबरोबरच आपण रहस्यमय नाटकंही तितक्याच लीलया हाताळू शकतो हे आता सिद्धच केलेलं आहे. यातली पात्रं, त्यांचे आपापसातील संबंध, त्यातले पेच, गाठी-निरगाठी, त्यातून निर्माण होणारे ताणतणाव आणि घडणाऱ्या घटना यांचा खिळवणारा आलेख ते सफाईनं मांडतात. प्रेक्षकाला किंचितही ढिलं सोडायचं नाही, हे त्यांचं तत्त्व. ते त्यांनी या नाटकात इतक्या सफाईनं खेळवलं आहे, की ज्याचं नाव ते. प्रेक्षकाच्या तर्काला मधेच अकस्मात सुई लावून तो फुस्स करण्याची त्यांची क्लृप्तीही तेच करू जाणोत. परिणामी खुर्चीला खिळलेला प्रेक्षक श्वास घ्यायचंही विसरतो. कलाकारांकडून आपल्याला अपेक्षित गूढ परिणाम काढून घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. रहस्यमय नाटकात कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव महत्त्वाचा असतो. तो पटण्याजोगा देता आला नाही तर नाटक कोसळतं. ‘छडा’च्या बाबतीत प्रत्येक बारकाव्याला, तपशिलाला त्यांनी तर्काची सुयोग्य जोड दिली आहे.

प्रदीप मुळ्ये यांनी शेखरचं आलिशान घर कथानकाच्या मागणीनुसार बनवलं आहे. घरात आणि घराबाहेर घडणाऱ्या घटना त्यातून नेमकेपणानं प्रस्थापित होतील याची दक्षता त्यांनी घेतली आहे. रहस्यमय नाटकात प्रकाशयोजनाही तितकीच महत्त्वाची ठरते. मुळ्ये यांनी ही जबाबदारीसुद्धा यशस्वीरीत्या पेलली आहे. नाटकाचा आघाती परिणाम वाढविण्यात त्यांच्या प्रकाशयोजनेचा मोलाचा सहभाग आहे. राहुल रानडे यांचं पाश्र्वसंगीत हा परिणाम अधिकच गडद करतं. उलेश खंदारे यांची रंगभूषा आणि पौर्णिमा ओक यांची वेशभूषा पात्रांना अस्सलता प्राप्त करून देते.

चार पात्रांचं हे नाटक कलाकारांच्या कसदार अभिनयानं उत्तम तोललं आहे.   शेखरच्या भूमिकेतील सौरभ गोखले यांनी दुहेरी मुखवटय़ाचं आयुष्य कंठणारा नायक त्याच्या सूक्ष्म छटांसह साकारला आहे. विशेषत: त्याची कटकारस्थानं आणि ती करताना त्याला वाटणारी सकारण भीती त्यांनी नेमकेपणी दाखवली आहे. कांचनचं मनोरुग्णाईत असणं, आणि तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अतक्र्य घटनांनी तिनं अस्वस्थ होणं, नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा आणि आपलं नैराश्य यांच्याशी झगडतानाची तिची मनोवस्था रेश्मा रामचंद्र यांनी प्रत्ययकारीतेनं दर्शविली आहे. मानसी कुलकर्णी यांनी साकारलेली डॉ. अनुराधा बर्वे ही मनोविश्लेषणात्मक भूमिकेचा अर्क वाटावा अशी आहे. तिच्या व्यक्तित्वातल्या अंधाऱ्या गुहा शेवटपर्यंत समोर येत नाहीत. वेदांगी कुळकर्णी यांनी अल्लड नेहा तिच्या निरागसतेसह साकारली आहे.

 

 

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi drama natak
Show comments