पाकिस्तानी कलाकार अतिफ अस्लम सात वर्षांनंतर भारतीय चित्रपटात गाणं गाणार आहे. लव्ह स्टोरी ऑफ ९० या आगामी चित्रपटातील गाणं गाण्याची ऑफर अतिफ अस्लमला देण्यात आली. परंतु, भारतात पाकिस्तानी कलाकारांना अघोषित बंदी असतानाही अतिफ अस्लम बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याने राजकीय विश्वातून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसंच, पाकिस्तानी कलाकारांविरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही बॉलिवूडच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक्सवरून बॉलिवूडला इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतिफ अस्लमने ‘टायगर जिंदा है’ या सलमान खानच्या चित्रपटात शेवटचं गाणं गायलं होतं. त्यानंतर भारत-पाकिस्तानातील वाढत्या संघर्षामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारतात कला सादर करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे अतिफ अस्लमही बॉलिवूडपासून दूर होता. परंतु, आगामी बॉलिवूडमधील चित्रपटात तो गाणार असल्याने अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

अमेय खोपकर यांनी एक्सवर म्हटलं, अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलीवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय.

अमेय खोपकर यांनी इशारा दिल्याने आता अरिजीत सिंग काय भूमिका घेतो, हे गाणं गाण्यापासून अतिफ अस्लमला अडवलं जातं का हे पाहावं लागणार आहे.

पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी का हटवली?

२०१६ मध्ये उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनने सुरक्षा आणि देशभक्तीचा दाखला देत काही नियम बनवले होते. त्यानुसार सीमेपलिकडील कलाकारांना भारतात बंदी घालण्यात आली होती. यामुळे फवाद खान, माहिर खान, अली जफर आणि राहत फतेह अली खान सारखे कलाकार बॉलिवूडमध्ये काम करण्यापासून वंचित राहिले होते.

ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही बंदी हटवली. सांस्कृतिक समरसता, एकता आणि शांती प्रस्थापित करण्याकरता ही बंदी हटवण्यात आली. विदेशी आणि शेजारील देशातील कलाकारांना विरोध करणं देशभक्ती होत नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mnss direct challenge to bollywoods record the song from the pakistani artists said dare to accept the challenge sgk