करोनानंतर प्रेक्षक चित्रपट पाहायला चित्रपटगृहापर्यंत येतील की नाही, याबाबत इतर निर्मात्यांप्रमाणेच आम्हीही साशंक होतो. मात्र ज्या पद्धतीने प्रेक्षक आत्ताही मराठी चित्रपटांना प्रतिसाद देत आहेत ते पाहता चांगला चित्रपट असेल तर प्रेक्षक कायम साथ सोबत करतील, हे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे, अशी भावना राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी व्यक्त केली. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘चॅम्पियन्स’ या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दिग्दर्शक म्हणून सातत्याने विविध सामाजिक विषयांवरील चित्रपटांची चोखंदळ वाट निवडणाऱ्या रमेश मोरे यांचा ‘साथ सोबत’ हा नवा चित्रपट सध्या राज्यभरात प्रदर्शित झाला आहे. संपूर्णपणे कोकणात चित्रित करण्यात आलेल्या चित्रपटातही लोकांच्या जिव्हाळय़ाचा मुद्दा त्यांनी हाताळला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘साथ सोबत’ हा चित्रपट हल्लीच्या काळातील नातेसंबंधांवर भाष्य करणारा चित्रपट असल्याचं ते सांगतात. मध्यंतरीच्या काळात लघुपट आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने सातत्याने कोकणात वास्तव्य झाले. त्या वास्तवादरम्यानच हा विषय सापडल्याचं त्यांनी सांगितलं. लघुपटांच्या निमित्ताने कोकणातल्या वाडय़ांमधून आम्ही चित्रीकरण करत होतो. या वाडय़ांमधील अनेक घरांतील तरुण कर्ती-सवरती मंडळी नोकरी-धंद्याच्या निमित्ताने मुंबई आणि इतर शहरांमध्ये असतात. मागे उरलेली घरातील ज्येष्ठ मंडळी वा अन्य सदस्य नाही म्हटलं तरी एकटीच असतात. त्यांचा हा एकटेपणा त्यांच्या बोलण्यातून सातत्याने जाणवत राहायचा. ऐंशी टक्के घरांमध्ये हा असा एकटेपणा भरलेला आहे. बरं हा कोकणापुरताच मर्यादित विषय नाही. म्हणजे तिथे आपली माणसं नाहीत म्हणून आलेला एकटेपणा आहे. आणि ते सोडून आपण जेव्हा आपल्या घरी परततो तेव्हा वेगळं काय असतं? नावाला आपण सगळी मंडळी घरात एकत्र एका टेबलवर जेवायला बसतो, पण आपापसात गप्पा कोणीच मारत नाही. जो तो आपल्या कामात आणि मोबाइलमध्ये हरवलेला असतो. जवळ असूनही आपण आपली नाती गमावली आहेत का? असा प्रश्न पडतो. आपली नाती इतकी पोकळ झाली आहेत का? आपल्याकडे आपल्याच माणसांसाठी वेळ नाही. खरं तर आपल्या प्रेमाच्या माणसांची जर आपल्याला साथ सोबत असेल तर कोणत्याही विचित्र, प्रतिकूल परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकतो. आपलं आयुष्य आपल्या जिव्हाळय़ाच्या माणसांच्या संगतीने अधिक आनंददायी होतं, हाच विचार या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असं रमेश मोरे यांनी सांगितलं.

‘साथ सोबत’ हा चित्रपट चिपळुणात सावर्डे येथील दहिवली गावात चित्रित झाला आहे. प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी, संग्राम समेळ आणि नवोदित अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. यात वरवर कणखर व्यक्तिमत्त्वाच्या आणि मृदू स्वभावाच्या डॉक्टरांच्या भूमिकेसाठी पहिल्यापासूनच मोहन जोशी यांचा विचार माझ्या डोक्यात होता. संग्रामची भूमिका ही शहरातून गावात आलेल्या तणावग्रस्त तरुणाची आहे, तर मृणाल कुलकर्णी या नवोदित अभिनेत्रीचा विचार करण्यामागचं एकच कारण होतं ते म्हणजे मला कुठलाही मालिका वा चित्रपटातील परिचित किंवा प्रभाव टाकू शकेल असा चेहरा नको होता. या कथेसाठी मला गावातीलच वाटतील, आपल्यापैकी एक वाटतील असे कलाकार हवे होते. त्यामुळे त्याच पद्धतीने कलाकारांची निवड केली असून यात कोकणातील नमन-दशावतार करणाऱ्या कलाकार मंडळींनीही काम केले असल्याचे मोरे यांनी सांगितले.

‘अंतर्मुख करणारे चित्रपट हवेत ’

मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला तर एकेकटे चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांना अधिक बळ मिळेल, असं मत रमेश मोरे यांनी व्यक्त केलं. मराठीत प्रयोग होत आहेतच, ते अधिकाधिक वाढतील हे जसं खरं आहे, तसंच प्रेक्षकांनी करोनानंतर चांगल्या चित्रपटांना उचलून धरलं आहे हेही खरं आहे. प्रेक्षकांना अतिभावनिक नाटय़ असलेले नव्हेत, तर अंतर्मुख करायला लावणारे चित्रपट हवे आहेत, असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National award winning director ramesh more talk about marathi movie saath sobat zws