छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नट्टू काका ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. काल उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी नट्टू काका यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही शेवटी इच्छा आता अपूर्ण राहिली आहे.
काही दिवसांपूर्वी घनश्याम यांनी ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपचाराबद्दल आणि करोना परिस्थितीबद्दल वक्तव्य केले होते. “मी अगदी ठीक आहे. हा इतका मोठा मुद्दा नाही. खरं तर, उद्या तुम्ही मला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एपिसोडमध्ये पाहू शकणार आहात. हा एक विशेष एपिसोड आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना माझं काम पुन्हा आवडेल,” असे घनश्याम म्हणाले होते.
पुढे ते म्हणाले होते, “गेल्या वर्षीपासून करोनामुळे परिस्थिती ही बदलली आहे आणि करोना इथेच राहणार आहे. याचा अर्थ असा नाही की मी घाबरेन आणि घरात बसेन. मी सकारात्मक विचार करणारा आहे आणि मी निराश होऊ शकतं नाही किंवा नकारात्मक विचार करत नाही. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे.”
घनश्याम नायक ‘तारक मेहता …’या मालिकेत वयाच्या ७७व्या वर्षापर्यंत काम करत होते. मात्र कॅन्सरवर उपचार सुरु असल्याने त्यांनी हा शो सोडला. ‘बेटा’, ‘लाडला’, ‘क्रांतिवीर’, ‘बरसात’, ‘घातक’, ‘चाइना गेट’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लज्जा’, ‘तेरे नाम’, ‘खाकी’ या सारख्या अनेक सिनेमांमध्ये घनश्याम नायक यांनी महत्वाच्या भूमिका साकाराल्या होत्या.