बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व आता शेवटच्या टप्प्यात असून लवकरच या पर्वाचा विजेता कोण असेल हे समजणार आहे. ग्रँड फिनाले जवळ आलेला असताना अरमान मलिक आणि लवकेश कटारिया बिग बॉस(Bigg Boss OTT 3) च्या घरातून बाहेर पडले आहेत.

बिग बॉसच्या घरात टॉर्चर टास्क घेण्यात आला. त्यामध्ये कृतिका मलिक, रणवीर शौरी आणि नॅझी यांनी हा टास्क जिंकला तर सना मकबूल, लवकेश कटारिया आणि साई केतन हे टास्क जिंकू न शकल्याने बिग बॉसमधून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. या यादित अरमान मलिकचेदेखील नाव होते. कारण विशाल पांड्येला कानाखाली मारल्यानंतर बिग बॉसने शिक्षा म्हणून त्याला संपूर्ण पर्वासाठी नॉमिनेट केले होते. आता अरमान मलिक आणि लवकेश कटारिया बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. दरम्यान, या संपूर्ण पर्वात अरमान मलिक विविध कारणांमुळे मोठ्या चर्चेत राहिला आहे.

‘या’ कारणांमुळे अरमान मलिकची चर्चा

युट्यूबर अरमान मलिक हा बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून मोठ्या चर्चेत आहे. तो आणि त्याच्या दोन्ही पत्नी असे तिघेही सातत्याने चर्चेत असतात. तो त्याच्या दोन्ही पत्नींबरोबर बिग बॉसमध्ये गेल्यानंतर सोशल मीडियावर बहुपत्नीत्वाचा वाद चांगलाच रंगला होता. त्याची पहिली पत्नी पायल मलिक जेव्हा घराबाहेर पडली तेव्हा आम्ही तिघे एकत्र खूश आहोत, असे तिने म्हटले होते. मात्र काही दिवसांनंतर, तिने युट्यूब व्हिडीओमध्ये, जेव्हा अरमान आणि क्रितिका बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतील तेव्हा मी त्यांच्याशी बोलून अरमानपासून वेगळी होईन. ते बिग बॉसच्या घरात आहेत, त्यांना माहीत नाही की बाहेरच्या जगात काय चालू आहे. लोक किती वाईट प्रकारे बोलत आहेत. तिरस्कार करीत आहेत. एक घरात दोन बायका असतील, तिघांचा संसार असेल, तर ते लोकांना पटत नाही. याचा आता मला त्रास होतोय आणि पुढे मुलांना होईल. लोक त्यांना वाटेल ते बोलतील. मला ते सगळं नको आहे. त्यामुळे जेव्हा क्रितिका आणि अरमान बाहेर येतील, तेव्हा आम्ही वेगळे राहू, असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना अरमान मलिकने म्हटले होते की, “ती तिची निवड आहे. तिची मर्जी आहे. जर तिला घटस्फोट हवा असेल, तर मी तिच्या निर्णयाला पाठिंबा देईन. पण आम्ही जेव्हा बाहेर जाऊ, त्यानंतर या गोष्टी बघू. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. कारण- आमच्या तिघांचे नाते खूप मजबूत आहे. देव जरी खाली आला तरी तो आम्हाला वेगळे करू शकत नाही”, असे त्याने म्हटले होते.

दरम्यान, कृतिका मलिकने मुन्नवर फारुकीसोबत संवाद साधताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मुन्नवरबरोबर बोलताना तिने म्हटले आहे की, जो कठीण काळ आम्ही तिघांनी बघितला आहे, तो मला परत बघायचा नाही. मला माहित नाही, बाहेर काय चालले आहे. मला पायल आणि मुलांची काळजी वाटत आहे. असे तिने म्हटले होते.

हेही वाचा: “विकी कौशल-कतरिनाच्या कैफ यांच्या लग्नात फोन आणण्यास बंदी होती कारण…”, सनी कौशलने केला खुलासा

आता लवकेश कटारिया आणि अरमान मलिक बाहेर पडल्यानंतर बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाच्या ट्रॉफीवर कोणता स्पर्धक आपले नाव कोरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.