बिग बॉस ओटीटीवरील तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून, दिवसेंदिवस हे पर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात आलेल्या स्पर्धकांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या पर्वात सोशल मीडियावरील अनेक इनफ्ल्युएन्सरदेखील सहभागी झाले आहेत. त्यामध्ये अधिक चर्चा आहे ती यूट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींची आहे. नेटकऱ्यांनी अरमान मलिकला दोन लग्ने केल्याबद्दल मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अरमानची पहिली पत्नी पायल आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

ज्या दोन व्यक्तींवर तुझे सर्वांत जास्त प्रेम आहे आणि त्यांच्यावर विश्वास आहे. त्याच दोन व्यक्तींनी म्हणजे तुझ्या नवऱ्याने आणि जवळच्या मैत्रिणीने कोणतीही कल्पना न देता, लग्न केले; त्यावेळी तुला विश्वासघात केल्यासारखे वाटले नाही का, असा प्रश्न मुनिषाने पायलला विचारला होता.
मुनिषा खटवाणीच्या प्रश्नाला उत्तर देताना पायल म्हणते, “एक दिवस मी घराबाहेर होते, तेव्हा क्रितिका आणि अरमान यांनी लग्न करण्याबद्दल चर्चा केली असेल. तेव्हा क्रितिकानेदेखील त्याला होकार दिला. त्यानंतर हे दोघे लग्न करून आले आणि मला अरमानने फोन केला की तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. मला त्याची प्रत्येक गोष्ट समजते, मी अरमानला विचारले, तू लग्न केले आहेस?” जेव्हा अरमानने तिच्या जवळच्या मैत्रिणीबरोबर दुसरे लग्न केल्याचे समजले तेव्हा मला धक्का बसला होता, असे पायल सांगते. हे सांगताना पायल भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अरमान तिला समजावण्याचा प्रयत्न करीत असल्याचेदेखील दिसले.

हेही वाचा: दक्षिण आफ्रिकेत पाहिली जातेय मराठी मालिका; स्वप्नील जोशीच्या ‘तू तेव्हा तशी’चा व्हिडीओ पाहून प्रेक्षक म्हणाले, “उखाणे…”

दुसरीकडे अरमान मलिकची दुसरी पत्नी क्रितिकादेखील आपल्या लग्नाबद्दल बोलताना दिसली. ती म्हणते- “आम्ही सगळे जण सुटीमध्ये फिरायला जाणार होतो; पण ते काही कारणांमुळे शक्य झाले नाही. त्यानंतर पायलने मला तिच्या घरी राहण्यासाठी बोलावले. आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी असल्याने मीदेखील तिच्याकडे राहण्यासाठी गेले. त्या आठवड्यात माझी आणि अरमानची जवळीक वाढली आणि त्याने मला लग्नासाठी विचारले. मला कळत नव्हते, काय घडत आहे. मी त्याच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे त्याच्या मागणीला नकार देऊ शकले नाही आणि आम्ही लग्न केले.”

अरमान मलिक, पायल मलिक व क्रितिका मलिक या तिघांच्या नात्याची चर्चा याआधीदेखील अनेकदा झाली आहे. मात्र, बिग बॉसच्या घरात या तिघांनी स्पर्धक म्हणून प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

दरम्यान, टीव्ही अभिनेत्री देबोलिना भट्टाचार्यनेदेखील या तिघांवर टीका केली होती. बहुपत्नीत्व ही संकल्पना समाजातून नष्ट केली पाहिजे, असे तिने म्हटले होते. तर, ऊर्फी जावेदने, जर त्या तिघांना एकमेकांबाबत अडचण नाही, तर मग आपण त्यावर बोलणारे कोणीही नाही, असे म्हणत त्यांना पाठिंबा दिला होता.