Manvat Murders : महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात असलेल्या मानवत या ठिकाणी १९७२ ते १९७३ या कालावधीत ठिकाणी लहान मुली, महिला, एक लहान मुलगा यांचे एकामागोमाग पडलेले खून. रमाकांत कुलकर्णींसारख्या हुशार पोलीस अधिकाऱ्याने केलेली गुन्ह्याची उकल आणि श्रद्धा, अंधश्रद्धा, नरबळी, जाणत्या, पारधी समाज या सगळ्यावर केलेलं प्रभावी भाष्य मानवत मर्डर्स ( Manvat Murders ) या वेबसीरिजमध्ये आहे. Sony Live वर ही वेबसीरिज ५ ऑक्टोबरला रिलिज झाली आहे. थंड रक्ताने घडवलेलं हत्याकांड त्यामागे होती अंधश्रद्धा, पुत्रप्राप्तीची लालसा आणि त्याशिवाय खूप काही.

७० च्या दशकात घडलेल्या हत्याकांडाने हादरला देश

७० च्या दशकात घडलेल्या या हत्याकांडाने फक्त महाराष्ट्र नाही अख्खा देश हादरला होता. एका जाणत्याच्या म्हणजेच भक्ताच्या सांगण्यावरुन नरबळी ( Manvat Murders ) देण्यात आले. त्यात लहान मुली आणि महिलांचा समावेश होता. उत्तमराव बारहाटे, रुक्मिणी बारहाटे आणि समिंद्री बारहाटे, रमाकांत कुलकर्णी या सगळ्यांच्या भोवती ही वेबसीरिज ( Manvat Murders ) फिरते. मराठीत खूप दिवसांनी आशिष बेंडे दिग्दर्शित ही एक उत्तम वेबसीरिज आली आहे यात शंका नाही. मानवत हे गाव, १९७२, ७३ चा काळ हे सगळं उत्तम वसवलं आहे. कॅमेरा टेकिंग, संवादही उत्तम आहेत.

रमाकांत कुलकर्णींनी उकलली मानवतची केस

रमाकांत कुलकर्णी यांनी रामण- राघव या मुंबईत साखळी हत्या करणाऱ्याची केस उकलली होती. त्यांच्याकडे इतरही महत्त्वाच्या केसेस होत्या. त्याचवेळी परभणीतल्या मानवतमध्ये हत्या होऊ लागल्या आणि मग रमाकांत कुलकर्णींना त्या मानवत हत्याकांडाचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली. आशुतोष गोवारीकरने रमाकांत कुलकर्णी जिवंत केले आहेत. त्याच प्रमाणे मकरंद अनासपुरेने उत्तमराव बारहाटे, सोनाली कुलकर्णीने रुक्मिणी बारहाटे आणि सई ताम्हणकरने समिंद्री उत्तम साकारली आहे. किशोर कदम शेवटच्या भागात येतो, पण तोही प्रभाव पाडून जातो.

हे पण वाचा- Manavat Murders : महाराष्ट्राला हादरवणारं मानवत हत्याकांड नेमकं होतं काय?

दोन अंधश्रद्धा आणि नाहक गेलेले बळी

निपुत्रिक म्हणून हिणवलं जाणं आणि वाड्यात असलेल्या खजिन्याचा शोध घेणं या दोन अंधश्रद्धांमधून मानवत हत्याकांड ( Manvat Murders ) घडलं. कोवळ्या मुलींची तसेच बायकांची हत्या आणि सर्वात शेवटी एका मुलाची हत्या या सगळ्या हत्यासत्रामुळे महाराष्ट्र हादरुन गेला होता. अशा प्रकारचं साखळी हत्याकांड पहिल्यांदाच महाराष्ट्रात झालं होतं. तसंच या गुन्ह्याची उकल करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. उत्तमरावाचं श्रीमंत असणं, गावावर असलेला पगडा, पोलिसांना लाच देणं, विकत घेणं, जातीतल्या लोकांना जातीबाहेर गेलास तर याद राख हे सांगणं, १५ रुपये आणि एक क्वार्टरची बाटली एवढ्यासाठी खून करायला लावणं या सगळ्या आव्हानांतून पोलिसांनी अत्यंत हुशारीने या हत्याकांडाची उकल केली. या सगळ्या हत्या का होत होत्या याची गोष्ट जेव्हा रमाकांत कुलकर्णी सांगतात तेव्हा रागही येतो, चिडही येते, वाईटही वाटतं. कुठल्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन निष्पाप जिवांचा बळी ( Manvat Murders ) गेला याचा चटकाही मनाला अस्वस्थ करतो.

वेबसीरिजचं वैशिष्ट्य काय?

रमाकांत कुलकर्णींच्या नजरेतून आपण या हत्याकांडांकडे ( Manvat Murders ) पाहतो. रमाकांत कुलकर्णी यांनी या हत्याकांडावर लिहिलेल्या ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राईम’ या पुस्तकावर वेब सीरिज ( Manvat Murders ) आधारलेली आहे. आशिष बेंडेने आठ भागांच्या या प्रभावी वेबसीरिजमधून सत्यामागचं सत्य उकलण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. भूमिका तर सगळ्याच कलाकारांनी उत्तम केल्या आहेत. खास भूमिका लक्षवेधी आहेत कारण कलाकार सगळेच कसलेले आहेत. तसंच एक आगळावेगळा प्रयोग म्हणून या मराठी वेबसीरिजकडे पाहिलं पाहिजे.

सईची समिंद्री लक्षवेधी

मानवत मर्डर्समध्ये सईची भूमिका ही लक्षवेधी ठरली आहे. ती पहिल्या भागाच्या शेवटी येते. एंट्रीच्या सीनलाच ती डोळ्यांनी जे बोलली आहे त्याला खरंच जवाब नाही. आठव्या भागापर्यंत समिंद्रीही काय आहे? ते कळत जातं आणि अकरा, बकरा उकराचं कोडंही उलगडतं. सई प्रमाणेच आशुतोष गोवारीकरने साकारलेली रमाकांत कुलकर्णींची भूमिका लक्षात राहते आणि शेवटच्या भागात येऊनही किशोर कदम एक वेगळीच छाप पाडून जातो. मकरंद अनासपुरे आणि सोनाली कुलकर्णी यांनीही भाषेचा लहेजा आणि संवादफेक उत्तम पकडली आहे. हे दोघंही अभिनयाच्या बाबतीत कसलेले आहेत यात काही शंकाच नाही. मानवत हत्याकांड काय होतं? याचं एक उत्तम डॉक्युमेंट म्हणून या वेबसीरिजकडे पाहता येईल यात शंकाच नाही.