नेटफ्लिक्सवर प्रसारित होणारा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सध्या एका स्किटमुळे वादात अडकला आहे. एका भागात रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील शब्द बदलून विनोद केल्यामुळे बंगाली लोक नाराज झाले आहे. एपिसोड प्रसारित झाल्यावर बोंगो भाषी महासभा फाउंडेशनने कपिल शर्माला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी सलमान खानलाही नोटीस पाठवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र यावर सलमानच्या टीमने स्पष्टीकरण दिले असून त्याचा या शोबरोबर काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, “माध्यमांमध्ये असे वृत्त आहे की सलमान खान/SKTV ला देखील नोटीस मिळाली आहे, मात्र हे वृत्त चुकीचे आहे, कारण सलमान खान नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शोशी संबंधित नाही,” असं सलमान खानच्या टीमने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – सत्य घटनांवर आधारित ‘हे’ बॉलीवूड चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, तुम्ही पाहिलेत का?

नेमकं काय घडलं?

‘दो पत्ती’मधील कलाकार काजोल क्रिती सेनॉन यांनी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कृष्णा अभिषेकने एक स्किट सादर केले. त्यात त्याने रवींद्रनाथ टागोर यांचं ‘एकला चलो रे’ हे आयकॉनिक गाणं बदललं. कृष्णाने विनोद करताना “एकला” या शब्दाच्या जागी “पाचला” शब्द टाकला, ज्याचा अर्थ पाच लोकांबरोबर चालणे असा होतो. त्याने पुढे विनोद करत म्हटलं की रस्त्यावर एकटं चालल्याने कुत्रे मागे लागतात. या त्याच्या विनोदावर उपस्थित प्रेक्षकांनी हसून दाद दिली; मात्र बंगाली लोक नाराज झाले आहेत. इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलंय.

हेही वाचा – अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित

“विनोद आणि खिल्ली उडवणे यात किंचित फरक” – बंगाली कवी सृजतो बंद्योपाध्याय

बंगाली कवी सृजतो बंद्योपाध्याय यांनी फेसबुकवर या विनोदाचा निषेध केला होता. त्यांनी लिहिलं, “विनोद आणि खिल्ली उडवणे यात किंचित फरक असतो. तो फरक विसरणं धोक्याचं ठरू शकतं. जास्त रेटिंग्स मिळवण्याच्या आणि लोकांना हसवण्याच्या नादात बऱ्याचदा आपण कोणाची खिल्ली उडवत आहोत आणि काय बोलत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. हे सगळं कुठे थांबवायचं याचा त्यांना विसर पडतो.”

हेही वाचा – घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध

प्रसिद्ध बंगाली संगीत दिग्दर्शक इंद्रदीप दासगुप्ता, गायक इमान चक्रवर्ती आणि चित्रपट निर्माते सुमन मुखोपाध्याय यांनीही या शोमध्ये घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. बोंगो भाषी महासभा फाऊंडेशनने आपल्या कायदेशीर नोटीसमध्ये दावा केला आहे की बंगाली लोकांसाठी आदरणीय असलेल्या रवींद्रनाथ टागोरांच्या ‘एकला चलो रे’ या गाण्याची खिल्ली उडवून शोने सांस्कृतिक आणि धार्मिक मर्यादा ओलांडल्या आहेत. दरम्यान, शोचे निर्माते आणि कपिल शर्मा यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The great indian kapil show after it receives legal notice for hurting sentiments salman khan denies association hrc