व्यंकटेश माडगूळकरलिखित ‘पति गेले ग काठेवाडी’ हे नाटक १४ डिसेंबर १९६८ साली प्रथम रंगभूमीवर आलं. सुधा करमरकर दिग्दर्शित, मुंबई मराठी साहित्य संघाची निर्मिती असलेलं हे नाटक जुन्या-जाणत्या रसिकांच्या अद्यापि स्मरणात आहे. आज या गोष्टीस पन्नास वर्ष होत असताना ‘सुबक’चे निर्माते सुनील बर्वे यांच्या ‘हर्बेरियम’च्या दुसऱ्या पर्वात विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक पुनश्च एकदा मंचित होत आहे. लहानपणी या नाटकाच्या प्रयोगानं भारावलेल्या विजय केंकरे यांनी ते आता दिग्दर्शित केलेलं असल्यानं साहजिकच अधिक अपेक्षा वाढल्यास त्या अप्रस्तुत ठरू नयेत. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्या पूर्ण केल्या आहेत. लोकनाटय़ व संगीत नाटकाची शैली यांच्या सरमिसळीतून व्यंकटेश माडगूळकरांनी हे नाटक रचलं आहे. स्वाभाविकपणेच कथानक पुढे नेणारे सूत्रधार व शाहीर यांच्यातील फ्यूजनमधून नाटक पुढं सरकतं. माडगूळकरांनी त्याकाळी केलेला हा ‘प्रयोग’ नक्कीच अनवट होता. लोकशैली आणि आधुनिक रंगशैली यांना परस्परांसमोर उभं करून दोन्हींतलं माधुर्य अनुभवावयास देण्याचं नाटककार माडगूळकरांचं कसब निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. त्यांच्यातला कथाकार श्रेष्ठ आहेच; परंतु नाटकासारखा तंत्राधिष्ठित कलाप्रकारही ते लीलया हाताळू शकतात, हे ‘पति गेले ग काठेवाडी’मध्ये त्यांनी सिद्ध केलं आहे. आज मात्र अशा सिद्धहस्त लेखकांची वानवा मराठी रंगभूमीला प्रकर्षांनं जाणवते आहे. तर ते असो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा