पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़ या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर कॉमेडियन राजू श्रीवास्तवने व्हिडीओ शेअर करत कॉंग्रेसवर संताप व्यक्त केला आहे.
राजू श्रीवास्तव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे त्याचे मत मांडताना दिसतो. आता त्याने व्हिडीओ शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘नेहमी लक्षात ठेवा, जंगलातला वाघ एकदा जखमी झाला की संपूर्ण जंगल शांत होऊन जातं. अरे कॉंग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करु शकत नाही. कारण मोदीजींवर गुरु, गुरुनानक देव, बाबा विश्वनाथ, बाबा केदारनाथ, बाबा महाकाल यांचा आशिर्वाद आहे. नकली शेतकऱ्यांना पुढे करुन पंजाबची बदनामी का करता? आपल्या पंतप्रधानांना अपमानित करत आहात? तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का’ असे व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तव बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा: भर लग्नातून अनिरुद्धने आशुतोषला दिले हकलून, अरुंधती म्हणाली…
फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले होते. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंजाब दौऱ्यात मोदींच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार होता.