गेल्या काही दशकांमध्ये अनेक उत्कृष्ट मराठी नाटकांची निर्मिती झाली. त्यापैकी एक नाटक म्हणजे ‘संगीत देवबाभळी’. २२ डिसेंबर २०१७ रोजी हे नाटक मराठी रंगभूमीवर आले. गेल्या पाच वर्षांत या नाटकाला राज्यभरातील प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. आता लवकरच हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कार्तिक एकादशीच्या मुहूर्तावर नाटकाचा शेवटचा प्रयोग रंगणार असल्याची घोषणा नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील शालिनी-मल्हार परत एकत्र येणार? अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “लवकरच…”

‘देवबाभळी’ हे लोकप्रिय नाटक लवकरच नाट्यरसिकांचा निरोप घेणार आहे. उद्या म्हणजेच २२ नोव्हेंबरला या नाटकाचा शेवटाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. दरम्यान नाटकाचे लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्त देशमुख यांनी लिहिलं…

“निरोपाचं पत्र

बये , निघालीस? ये ! जाणा-याला थांब म्हणू नये. जाणा-याला कुठं निघालीस विचारू नये. अवचित आलीस. पण जातांना मात्र सतत जाणार, निघणार, निघते, गेलेच असं सांगत राहिलीस आणि आता हा निरोपाचा क्षण. तू माया लावलीस. आपण बीज लावतो. झाड वाढवतो. झाडाला हवं नको ते पुरवतो. पण एका क्षणी कळतं की आपण नसतोच झाड वाढवत. ते वाढतं. उलट त्यानं कल्पवृक्ष होऊन पोटाशी धरावं. तुमच्याच इच्छा पूर्ण करतं. “बये, नाटक का थांबवताय, हा प्रश्न चहुबाजूने आला. काय सांगू त्यांना? नाटकवाल्यांचं ठरलेलं खोटं पण सत्याची शपथ घातलेलं उत्तर देऊ? ‘लवकरच’. पण आता तेही नकोच. निग्रहाने जाणा-याला पाय अडकेल असंही बोलू नये. मी बाहेर सांगतोय की दोन भेटीत अंतर असलं की आवेगानं भेटता येतं. म्हणून जातेय तू. नव्या रूपात, नव्या नाटकातून भेटी होतीलंच. पण नाटक खरंच थांबत असतं का?

हेही वाचा- लग्नानंतर अमृता देशमुखचा सासरी गृहप्रवेश! जोडीने केली सत्यनारायण पूजा, सासूबाईंनी शेअर केला फोटो…

खरं तर नाहीच. एखादा दीनानाथचा किंवा कालिदासचा, बहुतेक बालगंधर्वचा किंवा यशवंतचा, बहुदा घोरपडेचा. एखादा गडकरीचा.. सांगणा-यांच्या सांगण्यात नाटकाचा प्रयोग चालु राहतो. न पाहिलेल्यांच्या कुतूहलात तो प्रयोग चालु राहतो.” तू कुणाच्या लेखणीतून आलीस म्हणून त्याची नव्हती, नी कुणी तुला सादर केलं म्हणून तू त्यांची नव्हती.”

लेखकाने पुढे लिहिलं “तूच धारण केलं होतंस आम्हाला आणि आता निघाली आहेस. हेच खरं. बरं महाराष्ट्राचा निरोप म्हणजे बाहेर भेटणार का? माहिती नाही. मग कुठे, कधी भेटणार? माहिती नाही. कशाचंच उत्तर माहिती नाहीए तर निरोपच ना हा? मी समजून घेतो. गेल्यावेळी फसवलंस. सांगून निरोप घेतल्यावर त्रास कमी होतो असं तुकाराम बीजेला खोटं सांगितलंस. अचानक निरोप घेतला की एकच निरोप ठरतो. पण तारीख सांगून घेतला की रोजची पानगळ. पण एक एक पान खुडत जावं तर झाड बोडखं होतं. इथं बहर आलाय. दुपटीनं. खोटं तरी कसं म्हणावं. जाऊ देतो, पण मी जेव्हा जेव्हा नवं काही रंगमंचावर करेन ते ह्याच तादात्म्याने करेन. तेव्हा तू येऊन धारण करशील हा शब्द दे.

हेही वाचा- “ऑस्ट्रेलियाने आपल्याला हरवलं…”, सिडनी दौऱ्यावर जाणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार, म्हणाले…

बरं ऐक..तुझ्याकडून उत्तर येणार नाहीच हे माहीती आहे म्हणून गाथा उघडून ठेवलीय मी माझ्या खिडकीपाशी. खिडकीही उघडी ठेवलीय. आता बावीस तारखेला वारं येईल. पानं फडफडतील. तेव्हा कोणत्या पानावर हे वारं थांबलेलं असेल तेही मला आताच ठाऊक आहे.

तुमची आमची हेचि भेटी ।
येथुनिया जन्मतुटी ॥
आता असो द्यावी दया ।
तुमच्या लागतसे पाया ॥
आम्ही जातो अमुच्या गावा
अमुचा राम राम घ्यावा ॥
बये,
निघालीस? ये !
आठवणीत तेवढी ओळख देत रहा मात्र.
तुझा
प्राजक्त”

मुंबईतील सायनमधील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे उद्या (२२ नोव्हेंबरला) सायंकाळी ६.३० वाजता या नाटकाच्या शेवटच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या शेवटच्या प्रयोगाला सर्वांना आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती लेखकाने या पोस्टमधून केलेली आहे.