टीव्हीवर दररोज प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनतात. मालिकेतील कलाकार चाहत्यांना जवळचे वाटू लागतात. काही मालिकांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जाते. त्यापैकीच एक म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे ही सुप्रसिद्ध मालिका. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ही मालिका प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी जागा निर्माण करीत मोठी प्रसिद्धी मिळवीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर हा प्रोमो व्हायरल होत आहे.

प्रोमोमध्ये काय दाखवले आहे?

‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये आकाश बनीच्या बॅगमधून पेपर काढतो आणि हे काय आहे? असे विचारतो, त्यावर बनी उद्या पेरेंट्स डे असल्याचे म्हणतो. आपल्या दोघांचा आवडता खेळ फुटबॉल आहे आणि मी उद्या येतो, असा विश्वास आकाश त्याला देतो. बनी फुटबॉल खेळण्याच्या ठिकाणी आकाशची वाट बघत असतात. त्याचे प्रशिक्षक त्याला तुझे वडील येणार होते ना, आता मॅच सुरू होईल, ते कधी येणार, असे प्रश्न विचारतात. बनी त्यांना विनवणी करतो, की फक्त पाच मिनिटे द्या, ते येतील. मात्र, त्यानंतर बनीचा चेहरा पडलेला दिसतो. प्रोमोत दाखविलेले पुढचे दृश्य हे घरातील असून, जयश्री ही बनीला आकाश आपल्या खऱ्या मुलींकडेच लक्ष देईल, असे सांगताना दिसत आहे. त्यावर बनी म्हणजे काय, असा प्रश्न विचारतो. त्यावर तो आकाशचा खरा मुलगा नाही. त्यामुळे तुला वाईट वाटू नये म्हणून तो तुला मुलगा म्हणतो, असे जयश्री त्याला सांगताना दिसत आहे. हा भाग येत्या रविवारी म्हणजेच २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. झी मराठीने महारविवारच्या या भागाचा प्रोमो इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना बनीला त्याच्या बाबांविषयी गैरसमज होईल का? अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा: माधुरी दीक्षितने बनवली गरमागरम कांदा भजी! जोडीला होते पती डॉ. नेने; शेअर केल्या खास टिप्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, मालिकेत दाखविल्याप्रमाणे आकाश आणि वसुंधरा या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. आकाशला चिनू आणि मनू या दोन मुली असून, वसुंधराला बनी नावाचा मुलगा आहे. आकाश आणि वसुंधरा मुलांमध्ये कोणताही भेदभाव करीत नाहीत. मात्र, आकाशच्या आईला बनी परका वाटतो. गेल्या काही भागांमध्ये आकाशच्या आईने म्हणजेच जयश्रीने वसुंधराच्या आई-वडिलांना बनीच्या नावावर घर करायला सांगत, त्याचा केअरटेकर म्हणून आकाशचे नाव कागदपत्रांवर लावायला सांगितले होते. ही बाब जेव्हा आकाशसमोर येते, तेव्हा त्याचे त्याच्या आईबरोबर कडाक्याचे भांडण होते. त्यावेळी जयश्री त्याचा सगळा दोष वसुंधराला देत, तिलादेखील बनीपासून दूर करण्याचे ठरवते. आता समोर आलेल्या प्रोमोनंतर मालिका कोणते वळण घेणार हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागल्याचे पाहायला मिळत आहे.