दाक्षिणात्य चित्रपटांचे सुपरस्टार चिरंजीवी यांच्याशी संबंधित एक दुःखद बातमी समोर आली आहे. चिरंजीवी यांच्या मुलीच्या पहिल्या पतीचं निधन झालं आहे. शिरीष भारद्वाज असं त्याचं नाव आहे, तो चिरंजीवींचा धाकटा जावई होता. रुग्णालयात उपचारादरम्यान अवघ्या ३९ वर्षांच्या शिरीषची प्राणज्योत मालवली.

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी शिरीषने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याला फुफ्फुसाशी संबंधित समस्या होत्या. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याची प्रकृती सतत खालावत गेली आणि डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही. ३९ व्या वर्षी शिरीषचं निधन झालं. शिरीष हा चिरंजीवी यांची धाकटी लेक श्रीजा हिचा पूर्वाश्रमीचा पती आहे. दोघांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला.

“त्याने मला सोडलं आणि पुन्हा लग्न केलं”, ट्रोल करणाऱ्याला प्रसिद्ध अभिनेत्याच्या दुसऱ्या पत्नीने सुनावलं

तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डी हिने एक्सवर पोस्ट करून शिरीषच्या निधनाची माहिती दिली आहे. तिने श्रीजा, शिरीष व त्यांची लेक यांचा एक फॅमिली फोटो शेअर केला आहे.

शिरीषने चिरंजीवी यांची धाकटी मुलगी व राम चरणची बहीण श्रीजा हिच्याशी लग्न केलं होतं. शिरीष आणि श्रीजाने लग्नाआधी एकमेकांना डेट केलं होतं. कॉलेजमध्ये असताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर या नात्याचे रुपांतर प्रेमात झाले. मग दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्रीजा व शिरीष एकमेकांबरोबर खूप आनंदी होते आणि त्यांना लग्न करायचं होतं पण दोघांच्याही कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन त्यांनी २००७ साली हैदराबाद येथील आर्य समाज मंदिरात लग्न केलं.

Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ

लग्न केलं त्यावेळी श्रीजा फक्त १९ वर्षांची होती. तर शिरीषचे वय २२ वर्षे होतं. लग्नानंतर दोन वर्षांनी शिरीष आणि श्रीजा यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं. श्रीजाने मुलीला जन्म दिला. मात्र, त्यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. शिरीष आणि श्रीजा यांच्यात भांडणं होऊ लागली आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांचं नातं तुटलं. श्रीजाने पती शिरीष आणि सासू-सासऱ्यांवर हुंड्याची मागणी आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. यानंतर २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पळून जाऊन लग्न करणारं हे जोडपं अवघ्या सात वर्षांत विभक्त झालं.

ट्रेनमध्ये पहिली भेट अन् लग्नाचा निर्णय, आजही पतीपासून दूर राहतात अलका याज्ञिक; वाचा हटके लव्ह स्टोरी

श्रीजाने २०१६ मध्ये कल्याण झेव याच्याशी दुसरं लग्न केलं, पण तिचं दुसरं लग्नही फार काळ टिकलं नाही. या जोडप्याचा २०२२ मध्ये घटस्फोट झाला. त्यांना नविष्का नावाची मुलगी आहे.