बॉलिवूडचा ‘रॉकस्टार’ अर्थात रणबीर कपूरचा आज वाढदिवस. रणबीर त्याचे चित्रपट आणि रिलेशनशिप या दोन कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याला बॉलिवूडचा ‘कॅसिनोव्हा’ असेही म्हटले जाते. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीही तो रिलेशनशिपमध्ये होता.

कॉलेजच्या दिवसांमध्ये तो अवंतिकासोबत रिलेशनमध्ये होता. तेव्हा अवंतिकाचे लग्न झाले नसल्यामुळे दोघेही एकमेकांना डेट करत होते. त्यांचे हे नाते तब्बल ५ वर्षे टिकले. पण त्यानंतर काही कारणांमुळे दोघांमध्ये दुरावा आला आणि ते वेगळे झाले. त्यानंतर अवंतिकाने अभिनेता इम्रान खानसोबत लग्न केले.

‘साँवरिया’ या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या रणबीरचे नाव याच सिनेमातील अभिनेत्री सोनम कपूरसोबतही जोडले गेले होते. पण सोनमने एका कार्यक्रमात स्पष्ट केले की, रणबीर हा ‘बॉयफ्रेण्ड मटेरियल’ नाही. त्याच्यासोबत नात्यात राहणं तिच्यासाठी फार कठीण आहे.

यानंतर प्रसिद्ध फॅशन डिझायनर नंदिता महतानी ही रणबीरची लहानपणापासूनची क्रश होती. दोघंही बरीच वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर असल्यामुळे दोघांचे नाते फार पुढे जाऊ शकले नाही.

यानंतर रणबीरच्या आयुष्यात दीपिका पदुकोण आली. दोघांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केले. दीपिकाने त्याच्या नावाच्या अक्षराचा टॅटूही मानेवर गोंदवून घेतला होता. पण त्याच्या इतर नात्यांप्रमाणे हे नातेही फार काळ टिकले नाही. दीपिकाने एका मुलाखतीत म्हटले की, ‘एका वेगळ्या मुलीसाठी त्याने मला सोडले.’ दीपिकाचे रणबीरवर मनापासून प्रेम होते. पण रणबीरचे मात्र एकाच ठिकाणी फार वेळ मन लागत नव्हते. रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर दीपिका नैराश्यात गेली होती.


असे ही म्हटले जात होते की, नीतू कपूर यांना दीपिका आणि रणबीरचे नाते फारसे पटत नव्हते आणि रणबीर आपल्या आईची कोणतीच गोष्ट नाकारत नसल्यामुळे हे नाते संपुष्टात आले. दीपिकासोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीरने कतरिना कैफला डेट करायला सुरूवात केली. तर दीपिकाला तिच्या कठीण प्रसंगात रणवीर सिंगची साथ मिळाली. ब्रेकअपनंतरही दीपिका आणि रणबीर फार चांगले मित्र राहिले.

या सगळ्या मुलींमध्ये रणबीरच्या हृदयावर खऱ्या अर्थाने कोणी राज्य केले असेल तर ती कतरिना कैफ. या दोघांच्या प्रेमाची सुरुवात ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमाच्या सेटवरुन झाली. दोघे अनेक वर्षे लिव्ह- इनमध्येही राहत होते. पण अखेर त्याच्या इतर नात्यांप्रमाणेच या नात्यातही दुरावा आला आणि ‘जग्गा जासूस’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले.

कतरिनानंतर रणबीरचे नाव पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत जोडले गेले. दुबईतील एका कार्यक्रमात दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. पण तेव्हा त्या दोघांनीही सांगितले होते की, ते दोघे सिंगल असून आनंदी आहेत. या अभिनेत्रींव्यतिरिक्त रणबीरचे नाव नर्गिस फाकरी, श्रुती हसन यांच्यासोबतही जोडले गेले. पण कालांतराने या फक्त अफवाच होत्या हे सिद्ध झाले.

सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघंही आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर धरला आहे.