‘सैराट झालं जी…’ असं म्हणत गेल्या वर्षी २९ एप्रिलला एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर काय़म आहे. असा हा चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या दोन नवख्या चेहऱ्यांना घेऊन नागराज मंजुळेंनी हा चित्रपट सादर केला. ‘सैराट’ मराठी चित्रपटसृष्टीतच एक मैलाचा दगड ठरला. आजवर विविध चित्रपटांनी प्रस्थापित केलेले विक्रम मोडीत काढत सैराट प्रदर्शनाने मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. पण, काहींनी मात्र या चित्रपटाबाबत नाराजीचा सूर आळवला. चित्रपट समीक्षकांपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत अनेकांच्याच प्रशंसेस पात्र ठररेला हा चित्रपट बऱ्याच प्रेक्षकांच्या फेव्हरिट लिस्टचा भाग काही झाला नाही. याबद्दलच काही प्रेक्षकांशी बोलून चित्रपटामध्ये नेमके काय अडले… या विषयीचा आढावा ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सैराट’च्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या बहुविध मार्गांनी या चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आढावा घेतला जातो आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांनी हा चित्रपट जरुर पाहा, असा अट्टहास केला. तर कैक प्रेक्षकांनी मात्र चित्रपटाची उगाचच हवा जात असल्याचे मत मांडले. ‘सैराट’मधील अजय-अतुलच्या संगीताने सजलेली गाणी ही एक जमेची बाजू होती. त्यासोबतच चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि सिनेमॅटोग्राफीचीही सर्वदूर प्रशंसा झाली. इथे प्रेक्षकांना खटकली ती म्हणजे रिंकू आणि परश्याची प्रेमकहाणी. हल्लीच्या काळामध्ये असे कथानक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात गैर काहीच नाही. पण या प्रकारच्या चित्रपटांच्या माध्यमातून ‘ऑनर किलिंग’सारखा गंभीर विषय प्रेमकहाणीचा आधार घेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं बऱ्याच जणांना भावलं नाही.

समाजात आजही अशा रुढी कायम आहेत. जातिवादाचेही बरेच प्रकार पाहायला मिळतात. पण, या सर्व प्रकाराचे चित्रपटांच्या माध्यमातून चित्रण करण्याची गरज नव्हती असे मत सौदामिनी यांनी मांडले. जातपात, त्यावरुन होणारे वाद, मानापमानाचे राजकारण आणि त्याला बळी जाणारा आपला समाज या सर्व पद्धती कुठेतरी थांबवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी चित्रपट हेच सर्वस्वी माध्यम नसून समाजाची मानसिकता बदलणं महत्त्वाचं आहे. इथे ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला गेला खरा… पण, तो कितपत यशस्वी ठरला याबद्दल तर खुद्द नागराज मंजुळेसुद्धा साशंक आहेत. या चित्रपटाला मिळालेल्या यशाचा फायदा समाजापेक्षा चित्रपटाशी संलग्न व्यक्तींना झाला. तसे होणे अपेक्षितही होते. पण, निदान ज्या उद्देशाने सैराट सादर करण्यात आला त्याचा परिस्थिती सुधारण्यात काही हातभार लागला का? असा प्रश्न दत्तात्रय गोडसे यांनी उपस्थित केला आहे.

#SairatMania : सहजच आलास अन् ‘सैराट’ झालास…

रिंकूचा महाविद्यालयामध्ये शिक्षकांसमोर चालणारा उद्दामपणासुद्धा अनेकांनाच खटकला. जिथे एकीकडे संस्काराच्या वार्ता करणाऱ्या आपल्या समाजामध्ये गुरुजनांचा आदर करण्याची शिकवण दिली जाते. त्याच ठिकाणी गावच्या प्रतिष्ठीत कुटुंबातील आर्चीकडून तिच्या शिक्षकांना दिली जाणारी वागणूक आभासला खटकली. ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांवर कायमची छाप उमटवण्यात यशस्वी झाला असला तरीही या चित्रपटाने काही प्रेक्षकांना मात्र नाराज केलं. पण, तरीही या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन बदलला असल्याचे मत बऱ्याचजणांनी मांडले आहे.

#SairatMania : अन् ‘उबर’चा मेसेज आला ‘मंग्या ऑन द वे….’

#SairatMainia तुम्हाला कसा वाटतोय… तुमच्या काय आठवणी आहेत… ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा… loksatta.express@gmail.com  या ईमेल आयडीवर….

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reasons behind the dislikes of sairat movie directed by nagraj manjule rinku rajguru akash thosar