अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने उलटले असले तरी चित्रपटाची चर्चा मात्र कायम आहे. या चित्रपटाची, त्यातील डायलॉगची चर्चा सोशल मीडियावर कायमच सुरु असते. प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ चित्रपट आणि त्यातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. नुकतचं झी मराठीवर धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या मनात अनेक वर्षांपासून ‘आनंद दिघेंवर’ चित्रपट बनवावा अशी इच्छा होती. मात्र गोष्टी जुळून येत नव्हत्या. मात्र मंगेश देसाई यांच्या मनात चित्रपटाची संकल्पना आणली ती एका राजकीय व्यक्तीने, ती राजकीय व्यक्ती म्हणजे खासदार संजय राऊत. सध्या आर्थर रोड तुरंगात असलेल्या संजय राऊत यांची इच्छा होती आनंद दिघेंवर चित्रपट व्हावा. मंगेश देसाई यांचा ‘खेळ मांडला’ हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता.

“थिएटर्समध्ये गाजला, OTT वर वाजला अन्…” प्रसाद ओकची ‘धर्मवीर’साठी खास पोस्ट

‘खेळ मांडला’ चित्रपटाच्या प्रीमियरला संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते. तेव्हा चित्रपट संपल्यानंतर संजय राऊत यांनी आपली इच्छा एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांनी लगेच मंगेश देसाईंकडे बघितले आणि त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. २०१३ पासून मंगेश देसाई या चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले होते. त्यांचे कष्ट फळास आले आणि चित्रपट यशस्वी ठरला.

धर्मवीर चित्रपटाच्याबाबतीतला हा किस्सा मंगेश देसाई यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. प्रसाद ओक यांनी धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका केली आहे. प्रवीण तरडे यांनी लेखन, दिग्दर्शन अशा दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.