हल्ली लोक मालिका आणि मोबाइलच्या इतके आहारी गेले आहेत, की त्यांचं आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं भान तर हरपलं आहेच, पण आपलं रोजचं जगणं आणि मालिका यांच्यातला फरकही त्यांना जाणवेनासा झाला आहे. विशेषत: गृहिणी असलेल्या स्त्रियांना! त्यांचं सगळं जगणंच जणू छोट्या पडद्यावरच्या या मालिकांभोवती फिरताना दिसतं. नातीगोती, आपली कर्तव्यं या सगळ्या सगळ्याचा विसर त्यांना पडू लागला आहे. यामुळेच विविध वाहिन्यांवर मालिकांचं रोजचं दळण त्यांना महत्त्वाचं वाटू लागलं आहे. त्यात त्या आपलं जगणं शोधू लागल्या आहेत. या सगळ्या प्रकारातलं वैय्यर्थ्य काही सजग, संवेदनशील कलावंतांना जाणवू लागलं आहे. त्यामुळे ते अधिक अर्थपूर्ण अशा नाटक, सिनेमा आणि ओटीटीवरच्या या दळणाला पर्याय शोधू लागले आहेत. परंतु तरीही घरबसल्या मनोरंजन हवं असणाऱ्यांना मालिकांच्या या दळणाशिवाय पर्याय नाही. आणि कमी श्रमांत घराघरांत पोहोचू पाहणाऱ्याया कलाकारांनाही हे पोटार्थी दळण दळण्यावाचून पर्याय नाही. याचं अत्यंत दाहक चित्रण अभिराम भडकमकर यांच्या ‘अॅट एनी कॉस्ट’ या कादंबरीत वाचायला मिळतं. आता भाऊ कदम अभिनित, केदार आनंद देसाई लिखित-दिग्दर्शित ‘सीरियल किलर’ हे याच विषयाला उपरोधिकपणे हात घालणारं नाटक रंगमंचावर आलं आहे.

‘मीच माझी स्वामिनी’ या लोकप्रिय मालिकेतील राधिका ही घरी आपली रील बनवत असतानाच एका पत्रकाराचा फोन येतो- ह्यमला तुमची मुलाखत घ्यायचीय.ह्ण ती बिझी असल्याने त्याला टाळायचा प्रयत्न करते. पण तो खनपटीलाच बसतो. तेव्हा ती नाइलाजाने राजी होते. पण त्याचे प्रश्न ऐकून तिच्या लक्षात येतं की त्याला आपल्याबद्दल आणि आपल्या मालिकेबद्दल काहीच माहिती नाहीए. त्याबद्दल ती त्याला फैलावर घेते. तेव्हा तो रिव्हॉल्व्हर काढून तिला धमकावतो. या मालिकेचा शेवट काय आहे, असं तिला खडसावूून विचारतो. तेव्हा ती आपल्याला त्याबद्दल माहीत नसल्याचं सांगते. तेव्हा तो मालिकेच्या दिग्दर्शकाला फोन लावायला सांगतो. पण त्यालाही ते माहीत नसण्याची शक्यता ती त्याला सांगते. मग तो लेखकाला फोन लावायला सांगतो. खरं तर त्यालाही ते माहीत नसण्याची शक्यता असते. पण त्या घुसखोराच्या हट्टाग्रहाखातर ती त्याला फोन लावते. पण तोही कानावर हात ठेवतो. शेवटी त्या आगंतुकाच्या धमकावण्याला घाबरून आपल्या आईला ही माहिती हवीय असं ती त्याला कळकळून सांगते. नाइलाजाने मग लेखक, अर्ध्या तासात काय ते सांगतो, असं तिला आश्वासन देतो.

हेही वाचा : एकामागोमाग एक १० सिनेमे झाले फ्लॉप, नैराश्यात गेली अभिनेत्री; एक्स बॉयफ्रेंडने वाचवलं करिअर

तेव्हा ती त्या आगंतुकाला विचारते की, ही माहिती तुम्हाला नेमकी कशाला हवीय? तेव्हा तो म्हणतो, ‘तुम्ही आणि तुमच्या मालिकेनं माझं जिणं हैराण केलंय. माझी बायको तुमची इतकी फॅन आहे की ती तुम्हाला डिट्टो कॉपी करते. तुम्ही मालिकेत जे कराल ते ती जशीच्या तशी कॉपी करते. तुम्ही आता डहाणूला नोकरीला जाणार आहात, तर तीही नोकरी करायसाठी हटून बसलीय. आता आम्हाला तिच्या नोकरीची गरज नसताना तिने या भानगडीत का पडावं’, असा त्याचा सवाल असतो. त्यावर राधिका म्हणते, ‘तुमची बायको मूर्ख आहे, त्याला मी काय करू? मालिकेतलं सगळं काही खरं मानायचं नसतं हे तिला कळत नाही का?’ पण इथंच तर घोडं पेंड खातंय ना! ही मालिका एकदा का संपली की आपल्यामागची कटकट संपेल असं त्या गृहस्थाला वाटतं. त्यामुळेच तो राधिकाला धमकवायला आलेला असतो. अर्थात पुढे काय होतं हे प्रत्यक्ष नाटकात पाहणंच योग्य.

लेखक-दिग्दर्शक केदार आनंद देसाई यांनी मराठी रंगभूमीवर अलीकडच्या काळात तेच ते नवरा-बायकोतील संवाद-विसंवादाच्या नाटकांचं जे पीक आलंय त्याला या नाटकात छेद दिला आहे. त्याहून लोकांच्या अधिक जवळच्या विषयाला त्यांनी या नाटकात हात घातला आहे. छोट्या पडद्याने लोकांना इतकं नादी लावलं आहे की त्यावरील मालिका पाहणाऱ्या स्त्रिया आजूबाजूच्या वास्तवाचं भानही हरवून बसल्या आहेत. ही अफूची गोळी त्यांचं जगणं नियंत्रित करते आहे. विशेषत: गृहिणी असलेल्या स्त्री-प्रेक्षकांचं! यावर वृत्तपत्रं आदी माध्यमांतून कितीही प्रबोधन केलं गेलं तरी उपड्या घड्यावर पाणीच! समाजाची ही गुंगी राज्यकर्त्यांना अर्थात हवीच असते… म्हणजे ते वाट्टेल ते करायला मोकळे. सत्तरच्या दशकांत अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा समाज आज सुस्त अजगरासारखा समोर जे घडतंय ते निमुटपणे पाहत बसतो. त्यावर काहीच व्यक्त होत नाही. हे समाज म्हणून आपण किती मृतप्राय झालो आहोत याचं निदर्शक आहे. तेव्हा इडियट बॉक्सच्या किती नादी लागायचं हे ठरवायची वेळ आता आली आहे. केदार देसाईंनी दुरान्वयाने का होईना, या विषयाला स्पर्श केला आहे. समाजाच्या बधिरावस्थेबद्दल विनोदाच्या अवगुंठनात का होईना, ते व्यक्त झालेत. हे करताना प्रेक्षकांचं मनोरंजनही होईल याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. अतिशयोक्तीच्या अंगाने त्यांनी हा विषय मांडला आहे; जेणेकरून प्रेक्षक त्यातला उपरोध समजून घेतील. विषयाच्या मांडणीत वेगळेपण आहे, परंतु तो कितपत ताणायचा याबद्दल मात्र ते संभ्रमित वाटतात. अर्कचित्रात्मक, अतिशयोक्त आणि वास्तववादी अशी पात्रयोजना त्यांनी त्याकरता केली आहे. रिपोर्टरची बायको सीमा ही अर्कचित्रात्मक रंगवली आहे. राधिका वास्तवाचा पदर धरून आहे. तर खुद्द रिपोर्टर अतिशयोक्तीचा नमुना आहे. काही वेळा नाटक रेंगाळत असलं तरी विनोदाच्या कारंज्यात ते विसरलं जातं. पात्रयोजना मात्र चपखल आहे. भाऊ कदम यांनी बावळट रिपोर्टर कम् वैतागलेल्या नवऱ्याची भूमिका समरसून केली आहे. राधिकाला पिस्तुलने धमकी देणारा हा गृहस्थ वरकरणी किती शामळू आहे, पण त्याच्या अंगी किती नाना कळा आहेत हे त्यांनी सफाईदारपणे दाखवलं आहे. त्यांच्या प्रथमदर्शनी बावळट, बेंगरूळ व्यक्तित्वाचा त्यांनी याकामी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. त्यामुळेच त्याला घाबरल्यासारखं दाखवणारी राधिका (अश्विनी कुलकर्णी) त्याला मुळीच न घाबरता प्रतिप्रश्न करू धजते. त्याच्यातल्या सहृदय माणसाला साद घालू शकते. सीमा झालेल्या श्रद्धा हांडे अर्कचित्रात्मकतेचा अर्क पेश करतात. मालिकांच्या आहारी गेलेली स्त्री कुठल्या टोकाला जाऊ शकते हे त्यांनी उत्तमरीत्या पोहोचवलं आहे. प्रद्याुम्नच्या पूरक भूमिकेत तेजस पिंगुळकर ठीक आहेत.

हेही वाचा : Zee Marathi Awards 2024 : सर्वोत्कृष्ट सासू अन् सून ठरली ‘ही’ एकच अभिनेत्री! तर, सर्वोत्कृष्ट मुलगा ठरला…

प्रदीप मुळ्यांच्या नेपथ्यातून राधिकाचं आधुनिक घर आणि रिपोर्टरची गरिबीतली खोली तपशिलात उभी राहते. श्याम चव्हाण यांनी प्रकाशयोजनेतून ताणतणावाचे प्रसंग नेमकेपणी ठळक केले आहेत. विजय गवंडेंचं पार्श्वसंगीत नाटकातील विविध मूड्स अधोरेखित करतं. कुंदन अहिरे (नृत्यं), ईशान केदार (वेशभूषा) आणि उल्हेश खंदारे (रंगभूषा) यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. एका समकालीन विषयावरचं ‘सीरियल किलर’ हे नाटक आपलं द्वयर्थी नाव सार्थ करतं.