Worli Hit and Run Case Update : शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाहने रविवारी (७ जुलै) पहाटे बीएमडब्ल्यू ही आलिशान गाडी बेदरकारपणे चालवत ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांना अत्यंत निर्घृणपद्धतीने चिरडून मारले. अपघात झाल्यानंतर तीन दिवसांनी आरोपी मिहिर शाहला पोलिसांनी अटक केली आहे. तीन दिवस मिहिरने मुंबई पोलिसांना गुंगारा दिल्यामुळे आता विरोधक सरकारवर टीका करत आहेत. तीन दिवसांनी आता त्याच्या रक्तात अंमली पदार्थांचा अंश मिळणार नाही, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तसेच अपघाताला बळी पडलेले कुटुंब हे मराठी कलाकार जयंत वाडकर यांचे नातेवाईक आहेत. तरीही वाडकर यांना पाठिंबा देत या घटनेचा निषेध करण्यासाठी मराठी कलाकार पुढे आलेले नाहीत, यावरही संजय राऊत यांनी खरपूस टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना मराठी चित्रपटसृष्टीवर टीका केली. ते म्हणाले, “महाराष्ट्रात मिंधे सरकार आहे. गुन्हेगारी स्वरुपातून निर्माण झालेले हे सरकार असून विधानसभेतील अनेक गुन्हेगारांना या सरकारने अभय दिला आहे. ईडी, आर्थिक गुन्हे शाखा, प्राप्तिकर विभागाने ज्यांना गुन्हेगार ठरविले, असे अनेक लोक सरकारमध्ये आहेत. त्यामुळेच सरकारची मानसिकता गुन्हेगारी स्वरुपाची आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणात नेमके हेच झाले आहे. कावेरी नाखवा यांना ज्या प्रकारे वरळीच्या रस्त्यावर वारंवार गाडीखाली चिरडण्याचा प्रकार झाला, हा एखादा नशेमध्ये असलेला नराधम आणि पैशांची व सत्तेची नशा असलेला व्यक्तीच करू शकतो. एका मराठी महिलेची ज्यापद्धतीने रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली आणि मुंबई पोलिसांना तीन दिवस आरोपी सापडत नाही, हे कुणाला खरे वाटेल का? त्याच्या शरीरातील नशेचा अंमल वैद्यकीय तपासणीत येऊ नये, यासाठी त्याला तीन दिवस लपवून ठेवण्यात आले.”

“वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्डशी संबंध”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

कुठे गेली मराठी सिनेसृष्टी?

“पीडित कुटुंब मराठी अभिनेते जयंत वाडकर यांचे नातेवाई आहेत. आता कुठे गेली मराठी सिनेसृष्टी? एरवी आपली मते व्यक्त करणारे किंवा सामाजिक कार्यात दिसणारे कलाकार कुठे गेले? त्यांनी बोलले पाहीजे. मराठी सिनेसृष्टी टाळकुटेपणा करत आहे. सिनेसृष्टीतील आपल्या एका सहकाऱ्याचे नातेवाईक अशाप्रकारे रस्त्यावर चिरडल्यानंतर तुम्ही मूग गिळून गप्प बसता. तुमच्यात मराठी बाणा आहे तरी का?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Worli Hit And Run Case : मिहीर शाहच्या मित्राची ‘ती’ एक चूक अन् पोलिसांनी आवळल्या साऱ्यांच्याच मुसक्या! अटकेचा घटनाक्रम वाचा

संजय राऊत पुढे म्हणाले, “सीसीटीव्ही चित्रणातून आरोपीने कोणत्या बारमध्ये कशाप्रकारे नशा केली, याचे पुरावे समोर आले आहेत. अपघात झाल्यानंतर आरोपीचा पिता त्याला पळून जाण्याचा सल्ला देतो आणि चालकाला आरोपी करतो. त्याच्यामुळे हे संपूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे. या आरोपीला फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी. हा खटला जलदगती न्यायालयात चालला पाहीजे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ubt leader raise serious question on marathi film industry over worli hit and run case kvg