अनेक जुळी भावंडे एकसारखी दिसतात, त्यामुळे त्यांना ओळखताना गोंधळ उडताना अनेकदा आपण पाहतो. मात्र एकच नाव असल्यामुळेदेखील गोंधळ निर्माण झाल्याचे तुम्ही पाहिले आहे का? आत्ता ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे अरमान मलिक या नावामुळे अनेकांचा गैरसमज निर्माण झाला आहे.
अरमान मलिक हे नाव ‘बिग बॉस ओटीटी ३’ मुळे सध्या बरेच चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वात सामील झालेला हा स्पर्धक युट्यूबरदेखील आहे. त्याने दोन लग्न केल्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. मात्र या सगळ्यामुळे प्रसिद्ध गायक अरमान मलिकला त्रास सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
गायक अरमान मलिकने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणाचा खुलासा केला आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे, “मी आत्तापर्यंत गप्प होतो; मात्र आता परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. एक युट्यूबर आहे, ज्याचे आधी नाव हे संदीप होते मात्र नंतर त्याने त्याचे नाव बदलून अरमान मलिक असे केले. सध्या तो ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ मध्ये स्पर्धक आहे. आमचे नाव एकच असल्याने बराच गोंधळ निर्माण झाला आहे. आमच्या दोघांना एकच व्यक्ती समजून लोक मला त्याच्याऐवजी मला टॅग करत आहेत. मला इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की माझा या व्यक्तीबरोबर किंवा त्याच्या जगण्याच्या पद्धतीबरोबर कोणताही संबंध नाही. या गोंधळामुळे मी आत्तापर्यंत कमावलेल्या नावाला, माझ्या इज्जतीला धोका पोहचत आहे. ज्या लोकांनी आजपर्यंत मला पाठिंबा दिला आहे, ते लोकांना हे गोंधळात टाकणारे आहे. मी कोणाला त्यांचे नाव बदलण्यापासून आणि माझे जे नाव आहे तेच स्वत: साठी घेण्यापासून रोखू शकत नाही पण मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या लोकांना एवढीच विनंती आहे की या व्यक्तीच्या संबंधित कोणत्याही पोस्ट मध्ये मला टॅग करू नका. मला यातून बाहेर येण्यासाठी मदत करा. तुम्ही समजून घेतल्याबद्दल आणि तुमच्या पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद. अरमान मलिक.” नावामुळे गोंधळ निर्माण झाल्याने आपल्याला त्रास होत असल्याचे गायक अरमान मलिकने या पोस्टद्वारे सांगितले आहे.
This had to be said. #ArmaanMalik pic.twitter.com/GB7HjuijtP
— ARMAAN MALIK (@ArmaanMalik22) July 8, 2024
दरम्यान, बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वात असणारा अरमान मलिक उर्फ संदिप हा युट्यूबर असून अनेकदा त्याच्या दोन लग्नामुळे चर्चेत असतो. तो पायल मलिक आणि क्रितिका मलिक या दोन्ही पत्नींसोबत राहतो. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात तो आपल्या दोन्ही पत्नींसह आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर बहुपत्नीत्वाचा वाद चांगलाच रंगला होता. आता या परिस्थितीत लोक गायक अरमान मलिकला टॅग करत असल्याने त्याला त्रास सहन करावा लागला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd