गेल्या काही वर्षांत अनेक पंजाबी गायक आणि गायिकांनी गाण्याबरोबरच अभिनय क्षेत्रातही आपलं कसब आजमावलं आहे. दलजीत दोसैन, अॅमी वर्क, गुरु रंधावा यांच्या पावलावर पाऊल ठेवत तरुणाईत लोकप्रिय असलेली गायिका ध्वनी भानुशाली हिनेही अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘कहाँ शुरू कहाँ खतम’ या विनोदी चित्रपटात ध्वनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. घरच्यांनी आपल्याला न विचारता लग्न ठरवलं म्हणून ऐन मांडवातून पळून जाणाऱ्या तरुणीच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार असून ‘जी करदा’ आणि ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटांमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता आशिम गुलाटी नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘कहाँ शुरू कहाँ खतम’ या चित्रपटाच्या निमित्ताने ध्वनी आणि आशिम यांची नवी जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ध्वनी आणि आशिमसह या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, राकेश बेदी, सोनाली सचदेव, राजेश शर्मा, अखिलेंद्र मिश्रा, चित्तरंजन त्रिपाठी, विक्रम कोचर, हिमांशू कोहली आणि विकास वर्मा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच, या चित्रपटाच्या माध्यमातून सौरभ दासगुप्ता हे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. त्याचबरोबर ‘लुका छुपी’ आणि ‘मिमी’ या चित्रपटांचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ऋषी विरमणी यांच्यासोबत या चित्रपटाचे लेखन केले आहे. २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल अभिनेत्री ध्वनी भानुशाली आणि अभिनेता आशिम गुलाटी यांनी ‘लोकसत्ता’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

हेही वाचा >>>फरहान अख्तर-अधुनाच्या घटस्फोटावर मुलींची प्रतिक्रिया काय होती? अभिनेता खुलासा करत म्हणाला, “त्यांनी भावनिक धक्का…”

‘कहाँ शुरू कहाँ खतम’ या चित्रपटाबद्दल बोलताना आणि आपल्या पात्राविषयी सांगताना, या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर काम केलं असल्याने खूप उत्सूक असल्याचं ध्वनीने सांगितलं. ‘मी या चित्रपटात मीरा या तरुणीची भूमिका केली आहे. मीरा ही सामान्य घरातली आणि आपल्या परिवारावर प्रेम करणारी मुलगी आहे, पण जेव्हा तिच्या घरच्यांकडून लग्नासाठी जबरदस्ती केली जाते, तेव्हा मनाविरुद्ध पुढील आयुष्य जगण्यापेक्षा लग्नाच्या वेळी मांडवातून पळून जाते. पळून गेल्यानंतर तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींची ही रंजक कथा आहे’ असं तिने स्पष्ट केलं.

तर या चित्रपटात क्रिशची भूमिका साकारणाऱ्या आशिम गुलाटीनेही त्याची व्यक्तिरेखा ही आई – वडिलांचे ऐकणाऱ्या आदर्श तरुणाची असल्याचे सांगितलं. एका लग्नात क्रिश आणि मीराची भेट होते, त्यानंतर या दोघांमधली प्रेमकथा कशी फुलत जाते याचं चित्रण ‘कहाँ शुरू कहाँ खतम’ या चित्रपटात करण्यात आलं आहे, असं त्याने सांगितलं. या चित्रपटाचा दिग्दर्शक सौरभ दासगुप्ता अत्यंत मेहनतीचं असल्याचं त्याने सांगितलं. सौरभ त्याच्या चित्रपटातील पात्रांची कथा उत्तमप्रकारे मांडतो. कोणत्या कलाकारांकडून कसं काम काढून घ्यायचं हे त्याला पक्कं माहिती आहे, प्रत्येक दृश्यचौकटीचा त्याचा अभ्यास असतो, अशा शब्दांत दिग्दर्शकाचं कौतुक त्याने केलं. हा चित्रपट त्याचं स्वप्न असून मी त्या स्वप्नाचा एक भाग आहे याचा मला आनंद वाटतो, अशी भावनाही त्याने व्यक्त केली.

हेही वाचा >>>भाऊचा धक्का नव्हे तर…; या आठवड्यात रितेश देशमुख घेणार नाही सदस्यांची शाळा, काय आहे कारण?

‘कहाँ शुरू कहाँ खतम’ या चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रिया पिळगावकर, राकेश बेदी यांसारख्या अनुभवी कलाकारांबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल ध्वनी म्हणाली, ‘ते दोघंही उत्तम आणि अनुभवी कलाकार आहेत. त्याचबरोबर एक उत्तम माणूस आहेत. पात्र कसं साकारायचं आणि त्यासाठी कोणत्या प्रकारे तयारी केली पाहिजे हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. त्यांच्या तुलनेत मी फारच नवखी आहे, पण त्यांनी मला तसं कधीही जाणवू दिलं नाही. पहिल्याच टेकमध्ये त्यांचं दृश्य चोख होतं. शिवाय, चित्रीकरण सुरू असताना मध्येच एखादा संवाद विसरले तर ते दृश्य कसं पूर्ण करायचं अशा खूप महत्वाच्या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या’. रंगभूमीवर काम न करू शकल्याची खंत वाटते… आशिम शाळेत असल्यापासून नाटकातून काम करतो आहे. ‘मी सातवीला असल्यापासून शाळेतील नाटकांमध्ये काम करत होतो. त्यावेळी मला नाटक ही गोष्ट खूप आवडायला लागली. त्यानंतर शाळेत एक नाट्य दिग्दर्शिका आल्या होत्या. त्यांनी मला शालेय शिक्षण संपल्यावर त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी बोलावलं होतं. त्यांनी मला तीन दिवसांतच नाटकातून काढून टाकलं. त्यानंतर पुन्हा रंगमंचावर काम करण्याची संधी नाही मिळाली, पण मला पुन्हा नाटकात काम करायला नक्की आवडेल’ असं म्हणत नाटकात काम करू न शकल्याची खंत आशिमने व्यक्त केली.